Monday, October 11, 2010

चक्रव्यूह

आयुष्यात स्थिरता येणे म्हणजे नक्की काय असते ? म्हणजे आपण सेटल झालो आहे असे एखादा माणूस कशावरून ठरवतो? समाजाने केलेल्या व्याख्येप्रमाणे सगळे झाले कि का खरच प्रत्येक माणसाच्या सेटल होण्याच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. किंवा प्रत्येकाला वाटणाऱ्या गोष्टी खूप वेगळ्या असत असतील पण कराव्या लागणाऱ्या किंवा करता येणाऱ्या गोष्टी वेगळ्या असत असतील. समाजाच्या प्रत्येक व्याख्याच्या विरुद्ध बंड पुकारणे इतके सोपे थोडीच असते. पण तरी प्रत्येक माणूस आपल्या परीने प्रयत्न करत असतो कि आपण जे काही विचार केला होता आपल्या सेटल होण्याचा त्यातले काहीतरी मिळवले तर आयुष्यभराचे समाधान लाभेल. पण त्या स्वप्नाच्या लिस्ट मधली एक गोष्ट पूर्ण करता आली तरी खूप झाले नाही का ? म्हणजे शाळेत असताना काही कल्पना होत्या कि आपण इतके मोठे झालो कि या प्रकारचा माणूस झालेलो असू किंवा असे व्हायचे आहे. पण आता मागे जाऊन या सगळ्या गोष्टींचा विचार केला कि वाटत खरच मी स्वप्न पाहिलेले मी कोणीतरी होण्याचा खरच पूर्ण झाले आहे का ? का मी कोणीतरी पूर्णतः वेगळी माणूस झाली आहे. अर्थात, ज्यावेळी कोणीतरी होण्याच्या स्वप्न पहिली होती त्यावेळी खूप साऱ्या गोष्टी माहितही नव्हत्या. पण स्वप्न पाहिण्याची स्वभाव गेलेला नाही आहे.. अजूनही मी प्रत्येकवेळी विचार करते कि अजून थोड्या वर्षांनी मी कसला माणूस असेन. मला खरच काही पडली असेल का जगात काय चालू आहे याची का मी पण असेच नॉर्मल स्वतः च्या भोवती एक फुगा करून आयुष्य जगत असेन. खरच मला सामाज्याने दिलेले आयुष्याच्या व्याख्येप्रमाणे जगायचे आहे का? त्यातून कुठले समाधान मिळणार आहे मला. माझा कोणीतरी वेगळ्या होण्याचा अट्टाहास नक्कीच नाही आहे पण तरीही काही स्वप्न आहेत माझी जी नक्कीच त्या व्याख्येत बसणारी नाही आहेत पण खरच मी ती मिळवू शकेन .. जे स्वप्नामध्ये माझे आयुष्य मी रचत आहे ते सत्यात उतरवण्याची ताकद राहील का माझ्याकडे ? जो माणूस मला व्हायचे आहे ते खरच बनण्याची माझी हिम्मत होईल का ? आता जी काही मी आहे ते मी स्वप्न पहिले होते का नाही माहित नाही मला पण अशी अवस्था परत न येण्यासाठी खरच मी ती स्वप्न मिळवेन का ? कुठल्याच गोष्टी तुम्ही कितीही प्लान केल्या तरी सत्यात येईपर्यंत ते स्वप्नच असते. आणि सत्यात येणारी प्रत्येक गोष्टी तुमच्या स्वप्नात असेल असे पण नाही.
मला ना स्वतः ला हरवून परत मिळवायचे आहे. हरवलेली मी आणि शोधणारी मी असे काहीतरी मला माझे रूप पाहिजे आहे. पण मोठे होणे तसे छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी पण आपल्या हातात राहत नाहीत नाही का ? लहानपणी आपण कितीदा आई चा हात सोडून पळालो असेन त्यावेळी ती किती सोपी आणि मजेदार गोष्ट होती पण आता कोणीही हात धरलेला नाही आहे तरी अदृश्य बंधने सोडून देणे किती अवघड होऊन जाते. अदृश्य बंधने वाटणारी हि बंधने सुरुवातीला आनंदाचा स्त्रोत वाटत असतात न हळूहळू ती आपले आयुष्य मांडणारी समीकरणे होतात कळतच नाही. अश्यावेळी खरच हरवल्यासारखे होते पण आईचा हात सोडून हरवणे नाही तर अभिमन्यूला चक्रव्यूह तून बाहेर निघणे माहित नसताना तो कसा हरवला असेल तसे काहीतरी. म्हणजे तुम्हाला माहित असते कि आपल्याला माहित नाही आहे यातून परत कसे यायचे आहे पण तरी आपण ते स्वीकारतो आणि एका क्षणी बाहेर निघणे केवळ हरवणे असते. मला असे वाटते कि सगळ्या जास्त त्रास कशाचा होत असेल तर ज्यावेळी परिस्तिथीच बरेचसे निर्णय तुमच्यासाठी घेते. मग ती असणारी मनापासून जपलेली स्वप्न कुठेतरी स्वप्नच राहून जातात. आणि एक नवीन माणूस तयार होत जातो आपलाच जे पूर्णपणे वाईट आहे असे नाही पण जे आपल्याला हवे होते ते पण नाही आहे नाही का ?

Sunday, September 26, 2010

बूमऱँॻ

साथ देणे म्हणजे नक्की काय असते ? कितीतरी वेगवेगळे अर्थ आहेत या शब्दामध्ये .. म्हणजे साथ हवी कुणाची तरी याची जाणीव होत नाही तोपर्यंत साथ देणे पण समजत नाही असे वाटते मला... पण साथ देणे याचा अर्थ कळायला बरेच दिवस जातात असे म्हणायला काही हरकत नाही .. म्हणजे आपण सगळे इतके सहज घेतो ना .. लहान असताना आई बाबांची साथ मिळत असते नेहमी.. नंतर मित्र - मैत्रिणी येतात.. ते सगळे असताना कधी जाणीव नसते झालेली कि हे सगळी लोक अशीच नाही आहेत आपल्या आयुष्यात तर ते आपल्याला साथ देत आहेत.. आणि मग आपण पण नकळत त्यांना साथ देत असतो.. पण या शब्दांची जाणीव नक्की होते कधी..ज्यावेळी तुम्ही खूप एकटे पडून जाता.. किंवा सगळे सोडून कुठेतरी दूर जाता.. मग लक्षात यायला लागते कि आपल्या बरोबर असणारी माणसे अशीच न्हवती आपल्या आयुष्यात .. त्यांच्या असण्याला काहीतरी नाव होते.. , मनात जागा होती.. , यांचे अस्तित्व कुठेतरी आपल्या आयुष्याशी जोडले गेले होते.. जे अचानक विस्कळीत झाले आहे.. असे काहीतरी.. म्हणजे आई बाबांबरोबर जवळ आपण आपले अर्धे आयुष्य जगतो.. पण त्या अर्ध्या आयुष्याचे महत्व कळायला अर्धा मिनिट पण लागत नाही एकदा तुम्ही लांब गेलात कि.. मित्र - मैत्रिणींचे पण काही वेगळे नाही आहे.. नुसते काही नेहमीचे शब्द जरी वापरत आली तरी असे वाटायला लागते कि किती गोष्टी आपण मागे टाकून आलो आहोत.. कितीतरी असेच राहून गेले आहे... काही काही गोष्टी अर्धवट आहेत.. तर काही पूर्ण कराव्या लागल्या आहेत.. माहित नाही .. असे अर्धवट सोडून दुसरे काहीतरी सुरु करणे किती चूक बरोबर पण गेलेल्या आयुष्याची किंमत ते गेल्यावरच कळते.. हे किती दुर्दैव असावे ना .. !
काही काही गोष्टी कळायला त्या आधी सोडाव्या लागतात असे म्हटले तर .. खरच इतकी मोठी किंमत मोजायची गरज असते .. ?? सगळे कसे मग बूमऱँॻ वाटायला लागते ना ? प्रत्येक वेळी आपण केलेल्या गोष्टीचा आपण हिशोब बरोबर करत असतो.. सगळ्याची किंमंत आहे ...आपल्या कडे असणाऱ्या गोष्टींची किंमत कळायला पण किंमत मोजावी लागते.. यापेक्षा अजून काय वाईट असू शकते.. पण कधी कधी मला असे पण वाटते कि त्यावेळी माहित असते कि एखादा माणूस आपल्या फक्त साथच देत नाही आहे तर स्वतःची सुख दुःख वाटत आहे ..आपल्याबरोबर तर खरच काही फरक पडला असता .. अन जर तो पडला असता तर त्याने चांगली गोष्ट साध्य झाली असती कि वाईट .. खरच जर- तर च्या गोष्टी नेहमीच व्यसन वाटत आल्या आहेत मला.. आपण आपल्याच मनाला समजून घालायचे एक रामबाण औषध वैगरे वाटते मला ते..कारण कुठल्याही वाक्यात जर-तर घातले कि हवे ते निष्कर्ष काढतात येतात.. आणि मनाची समजून हि घालता येते.. पण खरच विचार केला तर ते सगळे नुसते मृगजळ सारखे तर असते.. !
साथ देणे आणि साथ निभावणे पण कितीतरी वेगळ्या गोष्टी आहेत.. पण दोन्ही चे महत्व कळायला खूप वेगवेगळे अनुभव यावे लागतात .. प्रत्येक गोष्टीला असणाऱ्या दोन बाजू नेहमीच ट्रिकी असतात... कुठली बाजू आपल्याला पहिली अनुभवायला येईल तसे सांगणे अवघड पण.. माझ्या मते साथ हवी याची जाणीव आधी होत असावी... मग ती मिळावी म्हणून माणूस साथ निभावायला लागतो... जे इतके सोपे नक्कीच नाही आहे पण जर साथ मिळवायची इच्छा असेल तर त्याच्या दिशेने सोडलेले बूमऱँॻ तर असते.. ! परत येणाऱ्या निष्कर्ष ची वाट बघणे... एवढेच ते काय आपल्या हातात... !!!!

Tuesday, September 21, 2010

माणूस

माणसाची माणसे असतात कि माणसांचा माणूस असतो .. ??? कधी कधी विचार करायला गेलो तर आपण किती एकटे असतो या जगात.. कधी विचाराने, कधी माणसांमध्ये, कधी माणसामुळे, कधी घटनांमुळे अशी बरीच कारणे असतात ... त्या एकटेपणा मागे.. पण प्रत्येक वेळी आपण त्यातून परत यायचा प्रयत्न करत असतो .. आपल्याला एकटे राहायचे नसते.. किंवा एकटे राहणे वाईट गोष्ट आहे हे कोणी ठरवले असेल .. ??? आपण आपल्याला शोधणे इतके का वाईट असते का ?? कितीतरी प्रश्न पडतात.. खरच एकटे असताना माणसाला त्याच्याच विषयी किती नवीन गोष्टी सापडतात .. कितीतरी गोष्टी आपण कुठेतरी लपवून ठेवलेल्या असतात . कितीतरी माहित नसतात .. माणसात राहणारा आणि माणसांविषयी विचार करून एकटा राहणारा पण किती वेगळी व्यक्तिमत्वे आहेत ना ? माणसांमध्ये राहणारा माणूस माणसांचा होतो आणि एकटा राहणार्‍या माणसाची माणसे असतात असे म्हणता येईल का ? मोठी मोठी लोक माणसांचा माणूस असतात असे म्हटले तर गल्लीतला एकटा राहणारा म्हातारा सुध्दा गल्लीचा असतोच कि .. अगदी सगळ्यांचा .. कशावरून ठरते तुम्ही माणसांचे आहात का माणसे तुमची आहेत.. का प्रत्येक माणसामध्ये दोन्ही बाजू असतात .. कुठेतरी ... फक्त कधी कुठली डोक बाहेर काढते तर कधी कुठली . ? आपण समाजात राहताना इतका माणसांचा विचार करतो .. पण दुसरे ज्यावेळी सेम विचार करत असतात त्यावेळी आपण त्याच्यासाठी समाजातला भाग झालेलो असतो .. म्हणजे आपण दोन्ही भागात असतो .. माणूस बदलला कि .. विचार बदलला.. !
नेहमी आपल्याला चांगली बाजू दाखवून लोकांच्या नजरेत मोठे व्हायचे असते.. त्याची ओढ कुठेतरी "माणसांचा माणूस" होण्याचा प्रयत्न तर नसावा .. त्याला प्रत्येकाची अनुमती हवी असते .. किंवा त्याची असणारी माणसे काय विचार करतात हे त्याला कुठेतरी खूप जास्त महत्वाचे असते .. म्हणजे "माणसाची माणसे" खूप आधी येतात आयुष्यात .. पण माणसांचा माणूस होणे म्हणजे बर्‍याच गोष्टी आल्‍या. अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोठे होणे आले . चुका करायचा अधिकार नाही कारण लक्ष नेत्रांचा पहारा आहे .. असे काहीतरी होऊन जाईल का ? समाज आपल्याला घडवतो तसेच आपण समाज घडवत असतो ... त्याचा भाग बनून .. त्यामुळे आपण नेहमीच दोन्ही बाजूला असणार आहे .. या सगळ्या गोष्टी कधीच जाणवल्या नसतात .. लहान असताना अचानक आपण मोठे होतो.. सगळ्यांचा नजरा निरखून आपल्याकडे बघत असतात .. पहिले थोडे घाबरत, नंतर थोडे सावरत आपण कसे या समाजाचे दोन्ही बाजू बनून जातो कळत पण नाही .. अश्यावेळी दुःख करावे कि आनंद साजरा करावा हाच मोठा प्रश्न होऊन बसतो ... हे मात्र खर .. !

Saturday, August 28, 2010

अवतार

महानता त्याच्या रोमारोमात भिनलेली आहे... अशक्य असं काही नाहीच....खरंतर जगाचे सगळे रेकॉर्ड्स त्याच्या नावावर व्हावे.... पण त्याचे त्याला काहीही अप्रुप नाही.......डेक्कन क्वीन फ़ुल स्पीडने डोंबिविली स्टेशनवर येत असते....त्याच दिशेच्या टोकाला हा उभा असतो....गाडी आली तेव्हाच हा रेस सुरु करतो....आणि पळत सुटतो....गाडी स्टेशन पार करण्याच्या आधी ह्याने दुसऱ्या टोकाचा ब्रिज चढुन....दुसऱ्या प्लॅटफ़ॉर्मवर जाऊन तिथुन धावत डेक्कन क्वीनच्या आधी प्लॅटफ़ॉर्म पार करुन....खाली रुळावर उतरतो आणि डेक्कन क्वीन जाण्याच्या आधी तिला क्रॉस करतो....

सांगा आता हा मनुष्य जगातला सर्वात वेगवान माणुस नाही का? पण दिखाऊपणा त्याला अजिबात आवडतच नाही....तो धावता धावता तीन तासात डोंबिविलीहुन पुण्याला सहज जातो...आरामात...आणि फ़ुकटात....घाम येऊन त्याचे कपडे खराब होतील असंही नाही.

एकदा त्याने शंभर दिवसांचा उपवास ठेवला होता...तीन महिने अन्न-पाण्यावाचुन राहिला...आणि एकदा एका लग्नाला बुफ़े जेवणाच्या वेळी तो तीन तास जेवत होता....शेवटी सगळं संपलं म्हणुन थांबला.

त्याला जगातल्या सगळ्या भाषा अवगत आहेत...तो नुसताच बोलु शकत नाही तर प्रत्येक भाषेच्या साहित्यावर लेक्चर देऊ शकतो. कुठलाही अंक त्याने एकदा पाहिला की तो विसरत नाही. त्याला संपुर्ण लॉग टेबल पाठ आहे १३ डिजीट्स पर्यत.

तो अनेकदा माउंट एव्हरेस्टवर जाऊन आलाय....जाऊन काय म्हणायचं...त्याच्या शिखरावरुन खाली येतांना तो धावत धावत आलाय.

खरंतर कलियुगात झालेला कल्की अवतार तो हाच. पण मला सोडुन कोणालाही ते कळालेले नाहीये. जगात असलेला त्याचा एकमेव मित्र...म्हणजे मी. त्याच्याकडे इतक्या गोष्टी करण्यासारख्या आहेत की त्याला मित्र जमवायला वेळच मिळत नाही. अवतार असला तर काय झालं....काळाची बंधनं त्याला मनुष्यरुपात पाळावीच लागतात.

पण ह्या अवतारामधे कल्कीला नक्की काय करायचं आहे हे अद्याप कळालेलंच नाहीये. त्याला मी अनेकदा विचारायचा प्रयत्न केला..पण म्हणतो की खरंच त्याला कळालेलं नाहीये. त्याच्यामते तो जे ही करेल त्याने मनुष्यजातीचा उद्धारच होईल.

त्याच्याशी मी नेहेमी चर्चा करतो...समाजाच्या अवनितीबद्दल...भ्रष्टाचाराबद्दल... तो ऐकल्यासारखं करतो आणि लगेच विषय बदलतो. नितीमुल्यांचे अवमुल्यन हा जणु त्याच्यासाठी प्रश्नच नाही. द्वापारयुगात अर्जुनाला गीता सांगतिली, विश्वाचं रहस्य त्याच्यासमोर उलगडलं तसंच कधीतरी मलाही काही उपदेशाचे बोल ऐकायला मिळतील ह्या अपेक्षेत मी नेहेमीच असतो. पण त्याच्या विचारांमधे प्रगल्भता अशी कधी नसतेच. जे असते ते फ़क्त अचाट सामर्थ्याचे प्रदर्शन.

त्यादिवशी तो घरी आला. आम्ही गप्पा मारत बसलो. गप्पा मारता मारता कंटाळा आला म्हणुन म्हटलं की चला जरा लॉंग ड्राइव्हला जाऊन येऊ.

तो गाडी चालवत होता..मी बाजुला बसलो होतो. अचानक समोरुन एक ट्रक भरधाव आला....अपघात अटळ होता...मरण निश्चित दिसु लागले...पण तेव्हढ्यात कल्कीने गाडी अक्षरक्ष: हवेत उंच उडवली आणि ट्रकच्या वरुन आम्ही पुन्हा रस्त्यावर आलो. फ़क्त काही क्षणांतच मरणाच्या दारात जाऊन परतल्यासारखे वाटत होते...हृदयाची स्पंदने वाढली होती...घाम फ़ुटला होता. कल्की ने रस्त्याच्या बाजुला नेऊन गाडी थांबवली. गाडीत असलेली पाण्याची बाटली मला दिली. पाणी पिऊन थोडं बरं वाटलं. एक कृतज्ञतेचा भाव माझ्या मनात दाटुन आला होता..कल्कीचे मी आभार मानु लागलो. खरंतर खुप औपचारिकता शब्दांमधे जाणवत होती....पण मला ते बोलावेसे वाटत होते.

"आज तु जर नसतास, तर माझी दुनियेतुन गच्छंती अटळ होती. तुझे आभार मानावेत तेव्हढे कमीच. खरं सांग तु माझ्यावर इतका कृपादृष्टी ठेऊन का आहेस? जगात तुला दुसरा मित्र मिळालाच नाही कधी?"

"गप रे...फ़ालतु मधे सेंटी नको मारुस. कृपादृष्टी, आभार...कसले मोठे मोठे शब्द वापरतोस रे. आणि आपली मैत्री काय मी निवडली आहे? आपण शेजारी...तुझ्यानंतर १५ दिवसांनी मी जन्मलो, एकत्रच वाढलो...एकत्र खेळलो..दुसरं कधी होतंच कोण?

"कोणीही नव्हतं? शाळा, कॉलेज, शेजारपाजारचे इतकी मुलं...कोणाशीच मैत्री करावीशी वाटली नाही? बघावं तेव्हा आपल्या दुनियेत. आज ह्या झाडावरुन उडी घेतली...उद्या कारबरोबर धावायची स्पर्धा केलीस..तुझं काहीतरी वेगळंच असायचं"

"बरं मग? मला त्यातच मजा वाटते..मी काय करणार?"

"खरं सांगु? तुझ्या बोलण्यावरुन कधीही तु अवतारी पुरुष वाटत नाहीस. अचाट ताकदीचा स्टंटमॅन वाटतो."

"बरं..मग?"

"मग काय? तु मलाच का सांगितलंस की तुच तो अवतारपुरुष कल्की आहे? खरं सांग. प्लिज"

"कसला चिवट आहेस रे तु..मी तुला सांगितलं कारण तु मला सगळ्यात जवळचा आहेस आणि तु हे कोणाला सांगणार नाहीस म्हणुन. माझ्या शक्ती मी तुझ्यापासुन लपवु नाही शकलो कधी."

"पण तुझ्या शक्तींचा उपयोग काय? कार डिलरशिप मधे सेल्स मॅनेजरची नोकरी करण्यात तुला आयुष्य वाया घालवायचं आहे का?"

"पोटापाण्यासाठी करावंच लागतं....आणि शक्तीचा उपयोग म्हटलंस तर आताच वाचवलंय मी आपल्या दोघाना"

"अरे पण इतके लोकं आहेत जगात...गरीबीने पिचलेले, इतके शोषित समाज आहेत. त्यांना काय उपयोग तुझ्या शक्तीचा?"

"किती वेळा हा प्रश्न विचारणार आहेस?"

"जोवर तु उत्तर देत नाहीस तोवर...आणि असली सामान्यांसारखी उत्तरं देऊ नकोस...तुच होतास ना गीता सांगणारा?"

"मग काय तुला पुन्हा गीता ऐकवू?"

"नाही...तु फ़क्त माझ्या प्रश्नांच उत्तर दे."

"तर ऐक मग...तुला जे जग दिसतं ते मला दिसत नाही. आपल्या जाणिवा वेगळ्या आहेत. ज्या ऐहिक दृष्टीकोनातुन सुख-दु:ख बघतोस तो मला हास्यास्पद वाटतो. कोणी गरीब म्हणुन तो दु:खी असं मला वाटत नाही."

"हे तर नुसते शब्दांचे बुडबुडे आहेत...ज्याला दिवसरात्र काबाडकष्ट करुन पोटभर खाताही येत नाही अशी लोकं एकीकडे...आणि ज्यांना जेवण पचत नाही म्हणुन डायट कंट्रोल करणारी लोकं दुसरीकडे...असं का?" माझ्यातला समाजवादी जागा झाला होता.

"बरं...मग तुला काय वाटतं? मी प्रत्येकाच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी? अरे जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा हवा, पाणी ह्यांचा प्रबंध केलाच ना? स्वत:चे अन्न मिळवावे म्हणुन थोडे कष्ट पडले तर मला दोष?"

"प्रश्न नुसत्या अन्न-पाण्याचा नाहीये. श्रमप्रतिष्ठेचा पण आहे. मरमर कष्ट करणारा कष्टकरी...त्याची समाजात काय प्रतिष्ठा असते? लाचारीचं जीवन असतं त्याचं."

"प्रतिष्ठा, लाचारी वगैरे गोष्टी तुम्ही मानवांनी निर्माण केल्यात....आणि त्यात स्वत:ला गुरफ़टवुन घेतलंय..त्यात माझी काय चुक?" प्रथमच काहीतरी गुढ अर्थ असल्यागत कल्की बोलल्याचे मला जाणवले.

"बरं मग एक सांग....तुला स्वत:ला असं अपमानास्पद आयुष्य चालेल?"

"अपमानास्पद? हा शब्द मला लागुच होत नाही. पुन्हा सांगतो ह्या गोष्टी तुम्ही निर्माण केल्यायत. आणि तुम्हाला त्या करता येतात ह्याचं स्वातंत्र्यच मुळात मी दिलंय. नवनिर्मीतीचं स्वातंत्र्य मी मनुष्याला सर्वाधिक दिलंय. त्याचा बरावाईट उपयोग करणं हे तुमच्या हाती आहे...त्यातुनही सृष्टीचा तोल ढळला मी अवतार घेतोच सगळं ठीक करायला. मुळात तु जो विचार करतोयेस ना...तोसुद्धा माझ्याच निर्मीतीचा आविष्कार आहे. मनुष्य ही माझी सर्वोत्कृष्ट निर्मीती आहे."

"एक साधी गोष्ट आहे...तु काहींना खुप दिलंस आणि काहींना काहीही नाही. मेळघाटात कुपोषणाने बळी जातोय...इथे शहरांमधे खाऊन खाऊन लोकं माजलेत. हा पण तुझ्या नवनिर्मीतीचा आविष्कार म्हणायचा की काय?"

"मी दिलं?"

"काही श्रीमंत घरात जन्म घेतात, काही गरीब घरात...काहींना जन्मत: अपंगत्व असतं...हे कशामुळे?"

"हे बघ, मी फ़क्त ह्या सृष्टीचा रचनाकार आहे. मी फ़क्त प्रक्रिया बनवल्या आहेत ज्यामुळे ही सृष्टी टिकुन राहिल. जन्म-मृत्यु हा त्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्या प्रक्रियेमधे काय होतं ह्यात मी तोवर ढवळाढवळ करत नाही जोवर माझ्या सृष्टीला धोका निर्माण होत नाही. गरीब श्रीमंत ह्या मानवनिर्मीत गोष्टी आहेत. अपंगत्वाबद्दल म्हणशील तर जीव जन्माला येण्याच्या प्रक्रियेतही काही अपघात होऊ शकतात, त्यामुळे तसं होऊ शकतं..जन्माला आल्यानंतर जसे लोकं अपघाताने अपंग होतात, तसाच हा काहीसा प्रकार आहे."

"आमच्या जीवनात ये काही होतं त्यावर तुझं काहीही नियंत्रण नाही असं म्हणायचंय तुला?"

"अर्थात...काहीही नियंत्रण नाही. मी सृष्टीची निर्मीती करतांनाच अशी योजना केलीय की सृष्टीतले प्रत्येक सजीव, निर्जीव, वातावरण हे एकमेकांना पुरक ठरुन सृष्टी टिकवुन ठेवतील. मानव हा ह्या सृष्टीत निर्माण केलेला निर्मीतीक्षम जीव. मी पुन्हा सांगतो सृष्टीला धोका निर्माण झाल्यावरच मी ढवळाढवळ करतो"

"तुच म्हणतोस ना...की मानव निर्मीतीक्षम आहे? हो आहोत आम्ही निर्मीतीक्षम...आम्हीच कदाचित आमच्या जीवनात नवनवे प्रश्न निर्माण केले आहेत. सुख-दु:ख सगळे आम्हीच आमच्या जीवनात निर्माण केलेत. आम्ही आमच्या मायावी जगात जगतोय. पण त्या जगाला ठिक करायची क्षमता आमच्यात नाही ना..आम्ही अतिमानवी शक्ती घेऊन अवतार नाही ना घेऊ शकत. ह्या आम्हीच निर्मीलेल्या आमच्या समाज-जीवनाला सुधरवायची क्षमता आमच्यात कुठे दिलीस तु?"

"तुला काय वाटतं? मार्क्स, गांधी कसे निर्माण होतात? तुमच्यातुनच एखादा उठतो आणि सुधार आणतोच ना? मार्क्स-गांधी निर्माण मी नाही करत. तुमच्याच समाजातुन ते निर्माण होतात. तुमच्याकडे क्षमता सगळ्या आहेत, फ़क्त काहींनाच त्याची जाणीव होते, काहींनाच नेमकं काय चाललंय ते कळते आणि ते तुमच्या जगाला सुखकर बनवायचा प्रयत्न करतात."

"म्हणजे आम्ही नेहेमीच कुठल्यातरी गांधीची वाट पाहत रहायची...नाही का?"

"तेच तर म्हणतोय मी...तुमच्या प्रत्येकात गांधी बनायची क्षमता मी दिलेली आहे. तुम्हाला जे बनायचंय ते तुम्ही बना. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही."

"बरं मग तुझं अवतार प्रयोजन काय? मला तर वाटायला लागलंय की देवही आता आमच्या मदतीला येणार नाही."

"माझ्या अवताराचं प्रयोजन? मी मानवजातीच्या उद्धाराला आलेलो नाहीये. धर्माच्या उद्धारासाठी आलोय?

"धर्म मानवनिर्मीत नाहीये?"

"धर्म म्हणजे तुला काय वाटतं?"

"धर्म म्हणजे नीती-संस्कार-आध्यात्म-नियम"

"वरवर पाहता हे तसंच वाटतं...पण ह्यांचा उगम कुठे आहे?"

"कुठे म्हणजे? आमच्या मानव-समाजात लोकांनी एकमेकांशी गुण्यागोविंदाने रहावे म्हणुन आम्हीच निर्माण केलेल्या गोष्टी आहेत ह्या"

"हेच सगळे तुमचे भ्रम असतात. धर्म ही मानवनिर्मीत गोष्ट नाही. मानवच काय ह्या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट सृष्टीच्या नियमांना बांधील आहे. ती तशी रहावी ह्याचा प्रबंध मी आधीच केलेला आहे. त्या प्रेरणा मी प्रत्येक सजीव-निर्जीवामधे टाकलेल्या आहेत. आणि त्या प्रेरणेतुनच धर्माचा उदय होतो. पण मानव ती प्रेरणा विसरत चाललेत...किंबहुना आपल्या नव्या जगात इतके गुरफ़टलेत की त्या प्रेरणा त्यांना महत्वाच्या नाही वाटत. त्यातुनच सृष्टीचा तोल ढळलाय"

"हे जरा विनोदी वाटतयं...इतकी मोठी सृष्टी...इतके ग्रह-तारे..मानवाला ह्या विश्वात स्थान तरी आहे का? तुझ्या सृष्टीचं रुप पाहिल्यावर किती खुजेपणा जाणवतो हे तुला नाही कळायचं...मानवामुळे सृष्टी धोक्यात येऊच शकत नाही...फ़ारफ़ार तर पृथ्वी धोक्यात येईल...आणि त्यामुळे काही फ़रक पडेल अशातला काही भाग नाहीये. आम्ही आधीही नव्हतो आणि नंतरही कदाचित नसु. सृष्टी तर चालतच राहिल"

"तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना?"

"असं कशावरुन?"

"मी म्हणतोय की मनुष्य माझी सर्वोत्कृष्ट निर्मीती आहे आणि तु म्हणतोस की मनुष्यावाचुन सृष्टी चालेल? अरे हे जे ग्रह-तारे दिसताहेत ना तुला...त्या सगळ्यांच्या प्रभावातुन मी पृथ्वी आणि त्यावरील मनुष्यसृष्टी निर्माण केलीय. ह्या पृथ्वीला नष्ट करु देईल मी?"

"मग तु काय करायचं ठरवलं आहेस? तुझं अवतार-कार्य काय?"

"माझं अवतार कार्य? ऐकायची हिंमत आहे?"

"हो..सांग"

"मनुष्यजातीचा अंत."

"काय? आताच तर तु म्हणालास की तुझी सर्वोत्कृष्ट निर्मीती?"

"हो..आजवरची सर्वोत्कृष्ट..पण यापुढे यापेक्षा चांगली निर्मीती होणार नाही असं नाही. मानवी समाजाचा अंत हेच माझं कार्य...एका नवीन जीवाचा उदय व्हायची वेळ आहे ही."

"मग? तो जीव निर्माण झालाय? कुठे आहे?"

"मीच तो. तुला मी अमानवी वाटतोय ना? आहेच मुळात...माझ्यात अनेक अमानवी शक्ती आहेत..माझे अवतारकार्य फ़क्त त्या शक्तींची चाचपणी करणे एव्हढंच आहे."

"म्हणजे आमचा अंत जवळ आहे तर."

"हो..अर्थात त्यासाठी मला काही विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत. तुम्हीच आपापसात लढुन मराल. पण त्याआधी तुमच्या मारामाऱ्यांना पुरुन उरेल असे सजीव सृष्टीत निर्माण करायला हवा."

"म्हणुन त्या नवीन जीवाला इतक्या शक्ती दिल्यात तर"

"फ़क्त तेच एक कारण नाहीये...मानवाला मी थोडे दुर्बल बनवले होते...तो सृष्टीवर खुप अवलंबुन होता...पण आपल्या अस्तित्वासाठी मग तो सृष्टीचेच लचके तोडु लागला. नवा जीव शक्तीशाली असेल. त्याला स्वत:च्या अस्तित्वासाठी सृष्टीला ओरबाडावे लागणार नाही."

"आता ह्यावर काय म्हणावं याला मी? आमच्याकडे किती वेळ आहे?"

"वेळ? मी आधीच सांगितलंय की तुम्ही आपापसातच लढुन मराल...त्याला जितका विलंब करता येईल ते तुमच्या हातात आहे. मी तुमच्या जीवनात ढवळाढवळ करणार नाही."

"ठीक आहे तर मग...चल परत जाऊ...घरी जाऊन निवांत मरायची वाट पाहतो मी"

"पाहिलंस? सत्य जाणुन घ्यायची तुला किती उत्सुकता होती? पण सत्याला सामोरे गेल्यावर कसा हिरमोड झाला तुझा."

"हिरमोड होणारच ना? जगात एकाच शक्तीवर विश्वास होता...तोही उडालाय आज. दु:ख आमच्या विनाशाचं नाहीये. तुच निर्माण केलं आहेस, तुच जीवन दिलंस..आम्हाला संपवायचा अधिकारही तुलाच आहे. पण आम्हाला आमच्यातच लढुन मारायचा काय अर्थ?"

"कारण एकच..मी आणि माझ्यापासुन निर्माण होणाऱ्या नव्या जीवांच्या समोर उदाहरण असावं..कसं जगु नये ह्याची माहिती त्यांना प्रत्यक्ष व्हावी. नाहीतर मानवांसारखे तेही वेद कोणी लिहिलेत ह्यावरुन मारामारी करायचे"

"उपरोध ध्यानात आलाय.. गाडी वळव कल्की...घरी जाऊयात"

कल्कीने गाडी वळवली. परत जातांना मी शांत बसुन होतो. काही बोलायची इच्छाच होत नव्हती. डोक्यात विचारांचे काहुर माजले होते. आज कल्की बरोबर गेलोच नसतो तर बरं झालं असतं असं मला वाटलं..कल्की कडुन खुप अपेक्षा होत्या मला...सगळ्यांनाच तडा गेला...महाभारतातल्या कृष्णार्जुनाप्रमाणे कल्की आणि माझी मैत्री आहे असं मला वाटायचं...मीच त्याचा एकमेव मित्र होतो. पण तो मला आणि माझ्या भाऊबंधाच्या मदतीसाठी आलेलाच नव्हता. उलट आमचा विनाश व्हायची वाट पाहत होता.
पण शेवटी पर्याय नव्हताच. मानवी विनाश टाळायला आता पुन्हा गांधी जन्मणे शक्य नव्हते.
कल्कीला माझ्या मनात काय चाललंय याची पुरेपुर माहिती होती. तो म्हणाला

"दुसऱ्या महायुद्धानंतर... ज्या दिवशी गांधीहत्या झाली....त्यादिवशीच मी हा निर्णय घेतला होता"

Monday, August 16, 2010

नरक

वपुंचे एक वाक्य आहे , हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणे म्हणजे नरक ! हे पुस्तकाच्या सुरुवातीला सांगितलेल्या गोष्टीमध्ये वाक्य आहे आणि हवा तेव्हा हवा तो माणूस नसणे म्हणजे नरक हे पुस्तकाच्या शेवटी... ! असाच विचार करताना वाटले असे का असावे.. म्हणजे त्या दोन गोष्टींच्या जागा बरोबर आहेत कथेमध्ये पण जर विचार करायला गेलो तर माणसाचा समजुतदारपण वाढला असण्याचे पण एक लक्षण आहे म्हणजे ज्यावेळी अगदीच कॉलेज मध्ये जायला लागलेलो असतो त्यावेळी एकदम मोठे झालो आहोत आपण , आता आपले आयुष्य माझे आहे.. मी काहीपण करू शकतो त्याचे.. हि भावना आलेली असते .. आणि मग आपण छोट्या छोट्या गोष्टी पण प्राव्हेट ठेवायला लागतो उगीचच. सारखे वाटत असते कि आई माझे मित्र आल्यावर माझ्या रूम मध्ये काय करत आहे.. त्यावेळी हेच वाटत असते कि कोणी नको आहे.. आपण आपल्या मस्ती मध्ये असतो .. काही वर्षे जातात हे समजायला कि माणसांशिवाय आपण नाही जगू शकत... आणि ती माणसे जोडायला बऱ्याच गोष्टी करायला लागतात.. खूप साऱ्या तडजोडी कराव्या लागतात. आणि हवा तेव्हा नको असलेला माणूस काढणे सोपे होऊन जाते आयुष्यात पण हवा तेव्हा हवा तो माणूस असणे आपल्याबरोबर इतके सोपे राहत नाही .. आयुष्य जसे जसे पुढे जायला लागते तेव्हा लक्षात येते कि अगदी शाळेपासून ज्याच्याबरोबर आहे त्या मित्राला आता सोडून जावे लागेल पुढचे शिक्षण घेण्यासाठी मग तिथे २-३ चांगले मित्र बनतात वाटत असते कि आता हे राहतील आयुष्यभर आपल्या बरोबर पण नाही परत वेळ येते सगळे सोडून देवून करियर च्या मागे लागायची .. मग बाकीच्या जबाबदाऱ्या वाढायला लागतात.. आणि मग लक्षात येते कि मागे जे काही आपण सोडून आलो आहोत ते त्यावेळी कधी कधी नकोसे पण वाटायचे पण आता ते त्यावेळी नकोसे वाटलेले क्षण पण चालतील पण तो काळ परत यावा.. राहावे त्याच माणसांबरोबर कायमचे असे विचार यायला लागतात .. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो ... आणि मग तो हवा असलेला तिसरा माणूस अजूनच खूप दूर गेलेला असतो.. कदाचित त्याला पण तेच वाटत असत असेलही पण म्हणून जे जगणं आपण स्वीकारले आहे त्यातून मागे फिरणे इतके सोपे कुठे राहिलेले असते.. मग राहते काय फक्त , काही जुन्या अर्धवट आठवणी , काही कायमचे लक्षात राहिलेले निरोप , काही कधीच व्यक्त न केलेल्या भावना , काही कधीच विसरता न येणारे चेहरे.. काही विसरलेले वाढदिवस , काही केलेले आणि पूर्ण न झालेले खूप सारे प्लान्स ... आणि असेच बरेच काही ..!

Thursday, August 5, 2010

तो आणि ती

तिला पक्कं माहित होतं की तो भोळसट आहे. जगातल्या प्रत्येकावर सारखंच प्रेम करणारा असा तो...त्याच्या आयुष्यात आपलं स्थान तरी काय याची तिला खात्री नाही....त्याच्या आजुबाजुला वावरणारे सगळेच त्याच्या जवळचे भासतात...मग आपणंही त्याच गर्दीतले एक तर नाही ना असं तिला सारखं वाटायचं.

कोणालाही दुखावू नये हेच त्याचं तत्व....त्याला भेटणारा प्रत्येक स्त्री-प्ररुष/आबालवृद्ध यांच्याशी जणु त्याचे जन्मांतरीचे नाते असल्यागत आपुलकिने विचारपुस हा करतो...भावनाविवश होऊन काहितरी बोलतो...काही आश्वासनं देतो..पण मग ती आश्वासनं पाळतो ही...त्यासाठी पुढचा-मागचा काहीही विचार करत नाही. हे करता करता अनेक नवे लोक जोडतो...असल्या ह्या जगन्मित्रावर तिचं प्रेम जडलंय....पण तिचं प्रेम एकतर्फ़ी तर नाही ना?

तशी ती खुप बोलकी....सतत बडबड करत असते..प्रत्येक सभारंभ तिच्याशिवाय रंगतच नाही. लोकांना कसं खुलवायचं..बोलतं करायचं हे तिला चांगलंच ठाऊक आहे...प्रत्येक पिकनिकपासून ते गणेशोत्सवापर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमांचं संयोजन ही करत असते. लोकांकडुन काम करवुन घेणं....त्यांना काय हवं नको ते पाहणं हे सगळी काम जणु तिला जन्मजातच येतात. पण तरीही तिला अजुन त्याला काही सांगता नाही आलं...तो कधी काही बोलेल याची तिला खात्री नव्हती...मुळात तिला त्याच्याबद्दलच खात्री नव्हती. आणि ती खात्री करवुन घ्यायची हिंमत तिच्यात नव्हती.

तसा तो तिचा बालपणीचा मित्र...शेजारच्याच घरातला....ती फ़क्त त्याच्यापेक्षा एका महिन्याने लहान. लहानपणापासुन एकत्र खेळले...एकाच शाळेत, कॉलेजात असलेले...एकत्र अभ्यास करणारे...असे ते दोघे.

कॉलेजात असतांना काही मवाली मुलं तिचा पाठलाग करत...ह्याला एकदा कळलं...तो जाऊन त्यांच्याशी बोलला..त्या मवाल्यांनी त्याला चांगलाच चोप दिला...पोलिसकेस झाली....पण हा असा धर्मात्मा की त्याने त्या मवाल्यांना ओळखायल नकार दिला..ती मवाली पोरं एकदम फ़ॅन झालीत त्याची....जिगरी दोस्त...तिच्याकडुन त्यांनी राख्या बांधवुन घेतल्या..माफ़ी मागितली...त्या मवाल्यांना पुढे वडापावची गाडी टाकुन द्यायला ह्याने अनेक खटपटी केल्या..आणि शेवटी ती पोरं मार्गाला लागली..हे त्याचे पहिले समाजकार्य...इथून त्याची गाडी जी सुरु झाली कि आज पाच वर्षांनंतर तर तो तिला भेटेनासा झाला. बघावं तेव्हा घाईत..काहीतरी कामात...ऑफ़िसातुन उशिरा येतो...हल्ली तिच्याशी बोलणंही महिन्यातुन एखादवेळाच होतं.

तिने एकदा हिंमत केलीच.....रात्री ऑफ़िसातुन येत असतांना रस्त्यातच गाठला...
"तुषार .......‍" तिने लांबुन हाक मारली
"जया...." त्याने मागे वळुन पाहिलं..."अगं तु इतक्या रात्रीची कुठुन येतेयेस?"
"येत नाहीये....वाट पाहत होते तुझी...जेवण करुन जरा पाय मोकळे करुन येते असं घरी सांगुन आलीय"
"माझी वाट काय बघायची? अगं फ़ोन करायचा ना मला...बोललो असतो की आपण"
"फ़ोनवर बोलण्यासारखं नव्हतं" अवघडलेपणाला तिने तिच्या फ़टकळपणामधे लपवला.
"असं काय महत्वाचं" त्याला काही कळतच नव्हतं...
"तु लग्नाचा काय विचार केलायेस?"
"काही नाही...का गं? तुला आईने तर नाही ना पाठवलंय माझ्याकडुन माहिती काढुन घ्यायला?"
"नाही...मी स्वत:च आलेय...तुला प्रपोज करायला" पटदिशी ती बोलली.
"हे बघ आताच मी ऑफ़िसातुन थकून भागून येतोय...उगाच पांचट विनोद नकोयेत मला"
"अरे असा काय तु....मी खरंच बोलतेय....तुला काहीच नाही कळत का रे.." तिच्या चेहऱ्यावरचा फ़टकळपणा उतरला होता
"काय?...छे काहीतरीच.......म्हणजे हे कसं शक्य आहे...." तो पुरता गोंधळला
"का...का शक्य नाही?"
"अगं पण हे असं काहीतरी...." त्याला शब्द सुचत नव्हते...त्याने खरंच ह्याबद्दल विचार केला नव्हता.
"असं काहीतरी म्हणजे? तु सांग तुला माझ्याइतकं कोण ओळखतं? अरे मी तुझी बेस्ट फ़्रेंड आहे."
"हो तुच तर आहेस..." हे स्वगत करत होतं...कि तो तिच्याशी बोलत होता ह्याचे त्यालाही भान राहिले नव्हते.
"मग?"
"मग काय...मी बोलतो घरी...सांगतो आईला"
"काय तु आईला सांगशील? काय सांगशील?"
"हेच की तु मला मागणी घातलीस ते"
"मुर्खा....तु आईला हे सांगणार आहेस..."
"मग काय सांगु..."
"आता हे पण मीच सांगु का....तुला स्वत:ची अक्कल नाहीये का?"
"बरं मी सांगतो आईला की मला तु आवडतेस...मग तर झालं?"
"ठीक आहे...पण मी प्रपोज केलंय ते कोणालाही कळता कामा नये..आलं लक्षात?"
"हो...मी बघतो आता काय करायचं ते....एका महिन्यात बार उडवुनच टाकु आपण"

"आई....मला एक बोलायचंय"
"बोल..."
"मला जयाशी लग्न करायचंय"
"काय? तुला लग्न करायचंय? मुर्खा...अजुन सेटल तरी झालास का? अजुन आपण ह्या वन बीएचके मधे राहतोय...आणि म्हणे लग्न करायचंय....बायकोला रहायला जागा नको?"
"जयाच तर आहे....राहिल ती तिच्या आई-बाबांकडे...त्यात काय एव्हढं"
"डोंबलं माझं....अरे तुला काही कळत नाही का अजुन...लष्कराच्या भाकऱ्या भाजतोस आणि एव्हढा लोकांमधे फ़िरतोस...पण साध्या संसाराच्या गोष्टी डोक्यात नाहीत जात तुझ्या.. आधी एक मोठं घर घे...निदान टू बीएचके..मग बघु लग्नाचं"
"कोणाच्या लग्नाचा विषय सुरु आहे?" बाबांनी एंट्री मारली.
"तुमचा चिरंजीव...जयाशी लग्न करायचं म्हणतोय."
"कोण? जया? अरे मग प्रॉब्लेम काय आहे? छानच बातमी आहे की"
"बातमी असु द्या....पण हे सांगा की ती राहणार कुठे? आपलं घर केव्हढं...आधी घर बुक करा कुठे तरी...मग पाहु आपण"

"जया...मी बोललो आईशी काल"
"काय म्हणाली आई"
"म्हणते आधी मोठं घर घे...मग बघु"
"अरे...त्यात काय एव्हढं?"
"म्हणजे...तुला मार्केट रेट माहितेय ना? टु बीएचके म्हणजे निदान चाळीस लाख लागतील"
"अरे...मग आपण दोघं मिळुन घेऊ ना घर....त्यात काय विशेष...आपल्या दोघांना मिळुन मिळेलच कि इतकं लोन"
"अरे हो की....मग जमलंच समज..."

अशा प्रकारे काहीही फ़ारसा त्रास न होता...ती आणि तो लग्नगाठीत बांधले गेले. घर घेतले. पुढे तो हळू समाजकार्यातुन नाव कमावु लागला...कार्यसम्राट हि उपाधी त्याला मिळाली..वर्तमानपत्रांमधे त्याच्या साधेपणाचे किस्से छापुन यायला लागले. त्याने आपल्या पक्षाच्या उमेदवाराला पाठींबा द्यावा म्हणुन मोठमोठी नेतेमंडळी त्याच्याशी जवळीक साधू लागली. हळुहळु त्यालाच निवडणुकीच्या टिकिटांची ऑफ़र यायला लागली. तिला मात्र आता ह्या गोष्टीचा खुप त्रास व्हायला लागला. कुठलेही कसेही लोकं घरात येतात. आणि प्रत्येकाचं चहा-पान करावं लागतं...ऑफ़िसवरुन यावं थकुन-भागुन आणि घरात मरमर काम करावं. वीकएंडला पण आराम म्हणुन नाही अजिबात.

एक दिवस खुपच अति झालं...भेटायला आलेल्या मंडळींसमोर तिने त्याला झापलं. त्याला मात्र कधी नव्हे तो राग आला...सात्विक संतापाने थरथरु लागला तो...त्याने फ़ाडकन तिच्या कानाखाली लगावली. हे जरा अतिच झालं. तिचं आधीच जिवावर आलं होतं..वरुन ही थप्पड...तिने रागाने बॅग भरली आणि निघाली तिच्या माहेरी. सगळी मंडळी नुसता तमाशा बघत होती. काही जास्त न बोलता ती मंडळीही निघून गेली.

दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात बातमी छापुन आली...समाजसेवक म्हणवणाऱ्या तुषार चौगुलेंनी त्यांच्या बायकोला मारहाण करुन घराबाहेर हाकलुन दिल्याची. त्याला आणि तिला सकाळपासुन फ़ोन यायला लागले. तिने तर एक-दोन फ़ोननंतर मोबाईल स्विच करुन ठेवला...पण तो मात्र प्रत्येकाला समजावत बसला...ज्या मंडळींसाठी त्याने बायकोला कानाखाली मारली त्यांच्यापैकीच कोणीतरी बातमी कुठल्या पत्रकाराला दिली होती.

त्याच्यासाठी ही परिस्थिती खुपच गंभीर झालेली होती. दिवसरात्र झोप नाही...नुसते विचार डोक्यात फ़िरताहेत. तिला फ़ोन केला तर तिचा फ़ोन बंद. मग मात्र तिच्या घरी जायचं त्याने ठरवलं. तिने मात्र घरात घेतलंच नाही. उगाच तमाशा नको म्हणुन हादेखील निमुट निघाला.

सैरभैर मनाने इकडे तिकडे फ़िरायला लागला...खुप दिवसांनी असा एकटाच स्वत:बद्दल विचार करत हिंडत होता. एक वेळ आली की विचार नकोच करायला.... जे वाट्टेल ते करु असा निश्चय करुन तो पुन्हा हिंडायला लागला..ऐरवी ऑफ़िसला जायला घरासमोरुन थेट बस...त्यामुळे चालायची सवय नाही...ठाण्यात असुन लोकल ट्रेनचा प्रवास नाही. आयुष्य कसं अगदी साधं सोपं होतं. जगण्यासाठीची लोकांची धडपड नव्यानेच त्याला दिसत होती. आजवर जी मंडळी भेटलीत ती सगळी त्यांची कामं घेऊन यायची..असं वाटायचं की काहीतरी प्रोसिजरल गोष्टींमुळे छोटी-मोठी कामं अडली आहेत..त्यामागे त्यांच्या आयुष्याची भ्रांत कधी जाणवलीच नव्हती. आणि आज ह्या मनस्थितीत मनावरील झापड दुर झाले होते. हातगडी ढकलणारा मजुर...बुटपॉलिश करणारी मुलं...मासळी विकणाऱ्या बायका...हातपाय तुटलेला भिकारी...भाजीपाला विकणारा भैय्या हे सगळेच जवळचे वाटत होते. असं का वाटतंय हे त्यालाही कळत नव्हतं पण कदाचित जगातल्या सगळ्या धडपड करणाऱ्यांशी त्याला आपुलकी वाटत होती.


त्याला घरातुन हाकलल्यानंतर तिला मात्र खुप विचित्र वाटत होतं...चारचौघांसमोर कानाखाली त्याने मारली ही गोष्ट जणु तिच्या डोक्यातुन निघुनच गेली होती..उलट तिलाच आपण काहीतरी वाईट केल्यासारखं वाटायला लागलं. अगदीच राहवलं नाही म्हणुन तिने त्याला फ़ोन केला. त्याने मात्र उचललाच नाही...पॅंटच्या खिशात सायलंटवर असलेल्या फ़ोनचं त्याला भानंच नव्हतं. मग तिने घाबरुन फ़ोन केला तर घरीही नाही....मग तीन-चार मित्रांकडे केला तर तिथेही नाही. मग मात्र ही बावरली. सैरभैर झाली....आणि घरातुन त्याला शोधायला निघाली. मनच ते...काहीही विचार करायला लागलं...दर पाच-एक मिनिटांनी फ़ोन करत होती. तो मात्र अजिबात उचलत नव्हता.

ती रेल्वे-स्टेशनकडे निघाली. अंतर्मन सांगत होते की तो रेल्वेस्टेशनच्या आसपासच असावा...कसं काय ते माहीत नाही...पण वाटतं मात्र तसंच होतं...आणि तोही खरोखरच रेल्वेस्टेशन जवळच होता. प्लॅटफ़ॉर्मची सैर करावी म्हणुन सहज स्टेशनात घुसायचा प्लान होता. तिकिट काढायचं भान तर नव्हतंच.

जाऊन सहज फ़लाटावर उभा राहिला...दुपारच्या वेळीही गर्दी होतीच...तीही त्याच फ़लाटावर पोहोचली होती...तिने त्याला लांबुनच पाहिले..त्याला हाक मारत होती...पण इतक्या गोंगाटात तिचा आवाज पोहोचतच नव्हता....तिने पाहिले...त्याच्याजवळ टीसी येतोय ते...टीसी त्याला काहीतरी विचारत होता..आणि हा मात्र पुरता गोंधळला होता...तिला त्यापरिस्थितीतही हसु आलं त्याच्यावर....पटकन तिने कुपन्स पंच केले....आणि पुन्हा त्याच्याकडे निघाली...बघते तर काय हा हिरो...टिसीशी भांडत होता...आयुष्यात प्रथमच तिने त्याला असं भांडतांना पाहिलं...टिसीबरोबर असलेल्या एकाने त्याला धरले आणि त्याला कुठेतरी घेऊन जायचा प्रयत्न करायला लागला. रेल्वे पोलिस असावा बहुतेक तो..त्याने हात झटकला आणि पळू लागला...तेव्हढ्यात फ़लाटावरुन एक लोकल नुकतीच सुरु व्हायला लागली होती...त्याने ती चालती गाडी पकडली....गाडी थोडी पुढे जाताच त्याला ती दिसली...तिने कुपन हातात धरली होती...त्याने काहीही विचार न करता चालत्या गाडीतुन उडी मारली....तीही विरुद्ध दिशेने...

तिच्यासमोर तो फ़लाटाच्या आणि रेल्वेच्या गॅपमधे जाऊन पडला...ती काहीही करु शकत नव्हती..गाडी वेगाने निघुन जात होती...तोंडातुन एक शब्दही निघत नव्हता...लोकं ओरडत होते. बेशुद्ध होऊन ती जागेवरच कोसळली...

डोळे उघडले तेव्हा ती तिच्या घरीच होती...सकाळ झालेली होती...कोवळी सुर्यकिरणं खिडकीतुन येत होती..किचनमधे वर्दळ तिला जाणवत होती..अंगात त्राण नसल्यागत ती नुसती पडुन राहिली..तितक्यात आई आत आली...
"अगं उठ...आठ वाजलेत सकाळचे...आज ऑफ़िसला नाही का जायचं?"
"काय?" अशा परिस्थितीत आई ऑफ़िसला जायची गोष्ट कशी करु शकते...तिला कळ्तच नव्हतं.
"’काय काय’... काय करतेस आधी उठ...आणि आज ऑफ़िसवरुन वेळेवर ये...तुषारचे आई-बाबा येणार आहेत ना आज लग्नाची बोलणी करायला?"
"काय?" गोंधळलेल्या चेहऱ्यावरचे तिचे भाव बदलत गेले आणि तिच्या चेहऱ्यावर नकळत एक हास्य फ़ुलले..

Wednesday, August 4, 2010

चहाचा भुरका

जागेचे महत्व इतके का असते ...? म्हणजे प्रत्येकासाठी प्रत्येक जागेविशायीच्या भावना वेगळ्या असतात... आणि हे फक्त जागेविषयी आहे असे नाही.. गाणे असते , सिनेमा असतो , एखादा टी- शर्ट, एखादे वाक्य असते ... तर त्या घटनांशी काहीतरी आयुष्यातला भाग गुंतलेला , गुफान्लेला असतो.. आणि तो काही केला आपण नाही विसरू शकत... असे काहीसे असते.. त्यामुळे त्या गोष्टी पण महत्वाच्या झालेल्या असतात.. तसे बघायला गेले तर या सगळ्या निर्जीव आणि काही करू न शकणार्या गोष्टी आहेत .. पण त्या अशा काही आठवणी बरोबर जोडल्या गेल्यामुळे.. त्या पण आपल्या बरोबर बोलायला लागतात .. आणि मग निर्जीव वाटणार्या गोष्टी पण बोलायला लागतात आपल्या बरोबर.. जे सांगणे खरच कठीण आहे कि नक्की काय असते.. पण प्रत्येकाच्या अश्या काही गोष्टी असतात.. चांगल्या काही वाईट.. काही चटका लावून जाणार्या.. अश्या सगळ्या प्रकारच्या.. पण जसा जसा वेळ निघून जायला लागतो .. त्या गोष्टी मागे पडायला लागतात आणि त्यांची जागा दुसर्या वस्तू , गोष्टी घ्यायला लागतात.. आपल्याही नकळतपणे ...आणि मग कधीतरीच असे एकदम आठवून जाते कि अरे काय दिवस होते ते.. प्रत्येकाला पुढे पाळायचे असते .. मग आपण आता या क्षणाचा कधी विचार करतो.. प्रत्येक क्षणाला आपण कसला न कसला पुढचा विचार करत असतो.. आणि मग असे करतानाच आहे तो क्षण पण निघून जातो.. पण जाता जाता ..नकळत काही क्षण अविस्मरणीय बनतात.. आणि मग सारखे वाटते कि अरे यार आपण असे कधी आपण जगू का ? मग तो आपला एक उच्चांक बनतो .. म्हणजे कुठल्या पण गोष्टी झाल्या कि आपण त्या गोष्टीची तुलना करतो.. थोडक्यात आपण भूत , वर्तमान आणि भविष्य एकत्र आणायचं प्रयत्न करत असतो सतत.. आणि कुठेतरी माहित पण असते कि असे होणे किती अवघड आहे पण तो नेमका क्षण परत पकडायचा प्रयत्न आपण सतत करत असतो.. किंवा तसाच माणसाचा स्वभाव असेल.. प्रत्येक क्षणाला स्वतःची अशी काही ओळख आहे.. पण आपण भेटलेल्या सगळ्याच माणसांना कुठे लक्षात ठेवतो ना काही अशीच आपल्या आयुष्यावर ठसा उमटवणारी माणसे आपल्या लक्षात राहतात... बाकीची अशीच जातात कुठेतरी विस्मृतीत .. तसेच काहीसे .. क्षणांचे पण होत असावे .. एखादा क्षण ठसा उमटवून जातो.. आणि मग त्याच्या जोडलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या कायम लक्षात राहतात.. आणि एका बेसावध क्षणी जशी ती माणसे निघून जातात आयुष्यात तसेच ते क्षण पण मागे पडतात.. अर्थात विसरता कधीच नाही येत पण हा पण ते रोजच्या जीवनाचा भाग व्हायचे कमी कमी होत जाते आणि एका दिवशी आपण वेगळ्या चिंता करायला लागलेले असतो.. आणि मग आयुष्यातच्या उतरतीला.. आपल्या नवऱ्याबरोबर चहाचा भुरका घेताना एका निवांत क्षणी येऊन एकदम त्या सगळ्या आठवणी युद्ध करायला लागतात.. हिशोब मांडायला लागतात.. आयुष्यात्च्या शेवटाला... चूक बरोबर याच्यापेक्षा काय करायचे राहून केले हेच जास्त सांगायला लागतात.. आणि मग डोळ्यात एक टपोरा थेंब येऊन आपलेच प्रतिबिंब दाखवतो.. मग लक्षात येते कि भविष्यासाठी असे आपण किती क्षणांना विसरलो आहोत.. , काही काही तर जगायचेच विसरून गेलो .. वातावरणात कशी शांतता पसरते.. तश्यातच चहाचा कपाचा चटका लागतो आणि मग आपण भानावर येतो... !

बार्टर

शांतता का हवी असते माणसाला .. चिंतन मनन करायला कि माणसापासून थोडा वेळ दूर जाऊन परिस्थितीचा विचार करायला .. खरच माणसाला शांतता का हवी असते ? असा विचार करताना जाणवले कि या प्रश्नाचे उत्तर शोधायला पण शांतता हवी आहे मला.. मजेदार आहे ना किती गोष्ट .. म्हणजे माणसाचा स्वभाव वेगवेगळा , त्याच्या मागण्या वेगळ्या , त्याची आजूबाजूची परिथिती वेगळी, पण काही काही गोष्टी जगातल्या प्रत्येक माणसामध्ये कश्या काय सारख्या असू शकतात ना ? असा विम्झीकल विचार करायला लागले कि काहीच सरळ अन साधे सोपे वाटत नाही.. प्रत्येक गोष्टीचा काहीतरी विचित्र अर्थ निघतो आणि प्रत्येक वेळी तो पटेल ,आवडेल किंवा समजेल असे पण नाही..तर शांतता हि गोष्ट म्हणजेच विचित्र आणि मिळायला खूप अवघड.. म्हणजे मारामारी ,महायुद्ध होते इतके महाकठीण आहे .. तरी माणूस प्रत्येक ठिकाणी ती शोधायचा प्रयत्न करतो.. त्याला अजून उमजले नसेल का कि ती तशी फार अवघड गोष्ट नाही आहे मिळवायला फक्त स्वतःहून मागायची गोष्ट आहे... म्हणजे शांतता हवी असेल तर ती शोधायची गरज नसते ती कायमच आपल्याबरोबर असते .. फक्त तिला मिळवताना आपण काही जवळचे गमवणार नाही ना .. याची काळजी प्रत्येक वेळेला घ्यावी लागते.. आणि माझे असेच होते.. नेहमी मी असे काहीतरी प्रयत्नपूर्वक ठरवते जे होऊ नाही द्यायचे पण कधीच नाही यश येत त्यामध्ये.. अगदी माझे असेच होते .. शांतता मिळवताना पण त्याच्या शोधात मी कुठे तर स्वतःच हरवून जाते असे सारखे वाटते आणि मग मला परत येता येत नाही.. रस्ताच सापडत नाही.. मी कुठेतरी दूर जाऊन पोचलेले असते.. अनोळखी प्रदेशात.. माणसे नवीन , जागा नवीन.. जुनी काय असेल तर ती फक्त मी न माझा भूतकाळ .. मग परत सुरु होते माझी लढाई .. आणि माझा अट्टाहास शांतता मिळवण्यासाठीचा ... पण त्यातून कधीच काही मिळत नाही मला.. नेहमी मला असे वाटते राहते कि मी शांततेसाठी बार्टर करत आहे... माझ्या माणसांबरोबर.. आणि शेवटी फारच तोटा करून घेते मी माझा .. आणि ती शांतता या विचारात कुठेतरी हरवून जाते.. आणि मग परत माझा जुनाच ठरलेला नवीन प्रवास सुरु होतो.. परत कुणाशीतरी बार्टर करायचे कुणाला तरी देऊन त्या शांततेसाठी.... !

पाऊस

मस्त पाऊस पडत आहे ....आणि मग अर्थातच डोक्यात पहिला विचार येतो कि मस्त चहा आणि भजी हाणावे आणि असेच लोळत पडून राहावे आजीच्या साडीच्या धुपाटे घेऊन .. पण अचानक लक्षात येते कि चहा आणि भजी करायला आई नाही आहे खायचेच असेल स्वतः उठून करावे लागणार आहे.. आणि मग पडून राहायचे तर लक्षात येते कि ते आजीवाले धुपाटे पण नाही आहे.. आपण कितीतरी हजारो मैल दूर आहोत यासगळ्या पासून... आणि अचानक तो मस्त वाटणारा पाऊस .. रडायला लागलाय कि काय असे वाटायला लागते .. आणि मग काय सगळे परत विचार चक्र सुरु होते कि आपण उच्चशिक्षण का घेतो तर प्रगती करण्यासाठी... आपल्या आई बाबांना खुश ठेवण्य्साठी.. आणि अर्थातच स्वतः पाहिलेली काही स्वप्न पूर्ण करण्यसाठी.. आणि मग थोड्या वर्षाने लक्षात यायला लागते.. सगळी स्वप्न तर डोळ्यासमोर होती.. मग आपण का आलो ते सगळे जग सोडून.. आणि नक्की काय मिळवले हे स्वप्न पूर्ण करून.. फक्त पैसे जास्त कमावणार .. पण खरच ते स्वप्न होते का कधी.. ?? तर नाही.. मस्त आई बाबांना समाधान द्यायचे होते.. किंवा त्यांच्या डोळ्यात ते बघायचे होते.. आणि मग आयुष्यभर त्यांनी सभाळले तसे त्यांना सभालता यावे एवढेच तर समर्थ व्हायचे होते.. मग या कमीत कमी मागण्या पेक्षा माझी स्वप्न मोठी होत गेली कळलेच नाही.. आणि मग मी माझ्यात चक्रात अडकले नाही का ? आणि आता परत फिरणे नाही.. जे ठरवून आले होते ते पूर्ण करावेच लागणार आहे.. आणि अचानक जाणीव झाली कि हे अदृश्य बंधने कधी आली माझ्यावर... जबाबदारी कधी पडली खाद्यावर.. सगळे कसे नकळत घडून गेले.. आणि मग जाणीव झाली कि मी आत मोठी झाली.. कॉलेज मध्ये असताना आई माझी कधी पाऊसात भिजायला नाही आली.. मी सारखे म्हणायचे तिला कि ये तर खर.. तुला काही मजा नाही करायला येत बघ.. पण आता ज्यावेळी मी भिजण्यापुर्वी आजारी पडण्याचा किंवा आजारी पडले तर डॉक्टर च्या बिलाची काळजी करते त्यावेळी माझी मी च मला किती मिस करते कसे सांगू.. ??? वयानुसार मी बदलणार .. परिस्तिथी बदलणार याची जाणीव न्हवती असे कधीच न्हवते.. ते कायमच माहित होते.. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि ते होतच राहणार .. ते कोणी चुकवू नाही शकत.. पण स्वतः लाच आरशात बघताना वाटते कि मी काय विचार करायचे आणि आता काय करायला लागले होते.. ज्यावेळी आई असाच विचार करायची त्यावेळी स्वतःला लाखवेळा बजावले होते कि काही झाले तरी स्वतः ला असे होऊ द्यायचे नाही.. पण माझ्याच नकळत मी कधी अशी झाले कळलेच नाही.. फक्त आनंद , निखळ क्षण सगळे सगळे मागे पडले.. राहिला फक्त नोकरी पैसा जबाबदारी .. चूक बरोबर गोष्टींचा हिशोब... आणि व्यवहार .. !

आवाज शांतता

घरात असेच एकटे बसले कि जाणवते कि आपल्या आजूबाजूला किती आवाज होत असतात सारखे .. आणि आपण त्यातले अर्धे आवाजांकडे लक्ष पण नाही देत.. पण ज्यावेळी घरी कोणी नसते आणि निरव शांतात पसरलेली असते .. त्यावेळी अचानक ते सगळे आवाज जाणवायला लागतात.. आणि मग एकदम वाटते कि आधी हे सगळे कधी का जाणवले न्हवते.. मग मी असाच विचार करत होते.. सकाळी उठल्यावर शेजार्याच्या घरी चालणारा रेडीओ, कुत्र्याचा भुंकणे , लहान बहिणीशी बडबड , बाबांचे फोन वर बोलणे आणि मग आईची स्वयपाकघरात चाललेली गडबड तिला पण एक विशिष्ट्य असा आवाज असतो .. आज अशीच मी एकटी घरी बसलेली .. काही करायला नाही आणि अचानक मी कधीही न ऐकणारे हे सगळे आवाज आज आठवत आहे .. आणि विचार करत आहे कि हे सगळे आवाज असताना मी कधी लक्ष नाही देत पण नसताना असे हे त्रास का देतात आठवून .. काही काळात न्हवते.. मग मला लक्षात आले कि ते आवाज नसतात जे आपण आठवत असतो .. तर ते आवाज करणाऱ्या माणसांना आपण स्मरत असतो.. त्यांचे आपल्याबरोबर असणे त्यांनी आपल्या आजूबाजूला असणे या सगळ्या गोष्टी आपण आठवत असतो .. कारण यातला प्रत्येक आवाज काढणारा एक माणूस आहे .. ज्याच्याशी आपण जुळलेलो असतो .. आणि मग ते सगळे प्रसंग डोळ्यासमोर येऊ लागतात ..मग एक वेळ अशी येते ज्यावेळी आपण फक्त त्या आवाजाबरोबर बर्याच गोष्टी डोक्यात यायला लागतात..
तसेच काहीसे मनसे असताना पण होत असेल का ? म्हणजे आपण माणसात आहोत पण एखादा माणूस असे काही वागतो कि आपल्याला त्याच्या मुले कुणाची तरी आठवण येते.. आणि मग जवळ असलेला माणूस आपण विसरून जातो काही क्षणासाठी का होईना..मग त्या जगातून या जगात परत येताना आपण तो आवाज मनात ठेवतो.. असाच तो आवाज माणसाची ओळख असते आपल्या मनात कोरलेली.. आपण ते कधीच ठरून करत नाही .. ते आपोआप होऊन जाते.. काही काही रहस्य उलगडता येत नाहीत हेच खर.. तसेच एखाद्या माणसाचे अस्तित्व आपल्याबरोबर असणे म्हणजे खरच कधी कधी न उलगडणारे सत्य आहे तर कधी कधी विचार करायची गोष्ट च नाही आहे .. ती अनुभवायची गोष्ट आहे .. मनापासून जगायची गोष्ट आहे .. आणि अशी माणसे आयुष्यात आहेत यासाठी खुश होण्याची गोष्ट आहे..

दृश्य - अदृश्य

ताल सिनेमा बघत होते .. बर्याच दिवसांनी .. तसा मला तो अक्षय खन्नाचे पात्र खूप आवडते .. वास्तवात असे कोणी असणे जरा अवघड आहे.. पण त्यांना छान वाटवले आहे ...अभिनय पण छान केला आहे .. पण तो मुद्दा नाहीच आहे.. असाच विचार करत होते .. ताल मधल्या एका गाण्यात शहीद कपूर आहे .. म्हणजे काही सेकंद साठीच आहे .. पण आहे.. अर्थात हे कळले कधी ज्यावेळी शहीद कपूर मोठा नट बनला.. म्हणजे काय काही काळासाठी तो अदृश्य होता आणि एका वेळेला अचानक दृश्य झाला .. जर तो नुसता असाच डान्सर राहिला असता तर कोणी त्याकडे लक्ष पण दिले नसते .. आपल्या आयुष्यात पण असे होत असेल ना.. म्हणजे कधी कधी अदृश्य असणारी .. बरीच माणसे किवा नाती .. जी कधी काळी अदृश्य होती किंवा आता अदृश्य आहेत.. आणि नंतर दृश्य झाली .. आता माझी रूममेट आहे ती आणि मी ३१ डिंसेबर २००७ ला एकाच वेळी एका ठिकाणी होतो .. पुण्याच्या जे एम रोड वर .. पण त्यावेळी आम्ही एकमेकांना ओळखत पण न्हवतो .. एकमेकांना पास झालो असलो तर ते पण नाही माहित.. आणि नंतर भेटलो हजारो मैल दूर आणि जिवाभावाच्या मैत्रिणी झालो .. पण आता विचार केल्याशिवाय राहवत नाही कि त्यावेळी भेटलो असतो तर काय वेगळे झाले असते.. कदाचित आम्ही कधीच इकडे येऊन चांगल्या मैत्रिणी झालो नसतो किंवा अजून चांगल्या मैत्रिणी झालो असतो.. ! अर्थात तो प्रश्न कायम अनुउत्तरीत राहिल, नाही का ?
मग अर्थात अजून एक विचार आला कि उलटी प्रोसेस होते का ? तर नाही कधीच नाही होत ... कारण एकदा दृश्य झालेली व्यक्ती कधीच परत अदृश्य करता येत नाहीत .. ती व्यक्ती /नाते संपले किंवा निघून गेलीतरी ते नाते कधीच अदृश्य नाही होत.. आठवणी असतात .. आयुष्यातला कुठला ना कुठला भाग त्या माणसाची जोडला गेलेला असतो .. आणि त्यातले काही भाग आनंद देणारे असतात काही चांगल्या वेळाची आठवण करून देणारे असतात.. तर काही असेच डोळ्यात पाणी आणणारे .. पण म्हणून कोणी थांबत नाही ना.. सगळीजण नेहमीच अशीच रोज अदृश्य माणसांना दृश्य करायचा प्रयत्न करत असतात.. तोच तर माणसाचा स्वभाव आहे .. आणि कितीही चांगले वाईट अनुभव आले तरी माणूस काही थांबणार नाही आहे .. हे कायम असेच चालू राहील .. अविरतपणे.. !

Saturday, June 12, 2010

Catch 22

"हरन्याला पुलिस नी पकडुन नेलं ना बाप्पा.." कालू वरडत वरडतच येत व्हता.
"का म्हुन?" बाप्पाच्या चेहऱ्यावर माशीही उडाली नाही.
"ते काल नक्सलीनी मारलं व्हतं ना पुलिसले...हरन्या नक्सली हाये म्हनत व्हते"
"नक्सली? हरन्या? काय येडबीड लागले का बे पुलिसले?"
"कोनीतरी पायजे ना बाप्पा....रिकॉर्ड ले.. हरन्या वावरात गेला व्हता रात्री...धरला ना मग त्याले रस्त्यात...जंगल म्हुन वावराचा रस्ता हाये...तर तिथेच धरला पुलिसने..."
"साली आपली तर जिदंगानीच खराब हाये साली...तिथे नक्सली इथे पुलिस..."
"जाव दे...रोजचाच हाये..."
"हा.. एकदा आपल्याले बी पकडुन नेतील ना तोवर राह पहायची"
"सोड ते...मी उद्या तुमसर ले जाउन राहिलो...भाताच्या गिरणीकडे..."
"मी बी येतो ना बे मग...एका गाडीने जाउ..पैसा वाचेल ना बे.."

--------------------------------------------------------------

"साहेब...नक्सली हाये म्हनत व्हते...आमची सगळी गाडी लुटली साहेब...कालुवर वार बी केले..माझ्या डोक्यात दगड घातला....नशीब म्हणुन जित्ता राहिलो"
"नक्सली...?" इंस्पेक्टर
"म्हनत व्हते साहेब..पण नक्सली नसनार ते" कालु बोलला
"तुला काय माहिती बे? कोन नक्सली ते?"
"म्हंजे साहेब...."
"हवालदार ह्याला घ्या आत...आन ह्या बाप्याची जबानी नोंदवा की नक्सल्यांनी लुटले"
------------------------------------------------------------------------------------

"अरे कालु...तु बी इथे"
"आयला हरन्या काय झालं बे तुला...असा थोबडा काम्हुन झालाय.."
"लई मारला ना सायबाने....सालं नशीबच खराब...तुला काम्ह्नुन घातला इथे?"
"आयला लंबी कहानी हाये..."
-------------------------------------------------------

"चला...निघा इथुन...लवकर"
"मायबाप...उठायची शक्ती नाय हाय...लई मारलाय पुलिसने"
"उचला रे ह्यांना...आपलीच मानसं आहेत...."
"मायबाप तुम्ही चौकीवर हल्ला करुन आमाले घेवुन जाताय...पण पुलिस नंतर लय त्रास देईल...आमाले राहु द्या इथेच"
"चल बे...बघतो कोन हात लावतं तुमाले"
--------------------------------------------------------

"हे कुठे आनलं आमाले?"
"ही आपली चौकी हाये बे...डॉक्टर तपासा ह्यांना. आपलीच मानसं आहेत"
-------------------------------------------------------------------
"गोरिलाज..कोम्रेड्स...आज आपल्या फ़ौजेत हरन्या आनि कालु हे दोन कॉम्रेड्स आलेत"
"तुमचे उपकार सरकार..." कालु भावनाविवश हौन बोलला.
"उपकार वगैरे काही नाही कालु...आपण आपल्या बांधवांसाठी लढतोय."
"हो सरकार"
"सरकार नाही...कॉंम्रेडस....आपण सगळे बंधु आहोत."
"हो कामग्रेड"
"हा हा हा...असु दे असु दे"
-----------------------------------------------------------

"हरन्या, कालु...आज तुमचे ट्रेनिंग पुर्ण....पहिल्या कामगिरिवर जायचेय तुम्हाला"
"यस कॉम्रेड"
"तुमच्याच गावात...त्या गद्दार बाप्पाला संपवायचेय."
"काय?"
"हो..हीच परिक्षा आहे तुमची"
----------------------------------------------------

Arkansas

रात्री साडेबारा वाजता फ़ोन आला....सकाळी ३ वाजता एअरपोर्टला जाऊन कार रेंट करायच्या आहेत, ४ वाजता परत येऊन सगळ्यांना घेऊन आरकंसास च्या ओझार्क टेकड्यांकडे निघायचंय...२ दिवस कॅम्पिंग करायचीय. नकार द्यायचा प्रश्नच नव्हता..कारण तसा ऑप्शन दिलाच नाही....नुकताच टॅको बेल मधुन चालुपाज घेऊन आलो होतो. दोन-दोन चालुपाज हादडले...किचनची आवराआवर, डिश वाशर लावता लावता १:३० वाजले आणि मग बेडवर लॅपटॉप घेऊन ऑर्कुटींग सुरु केली. काही पोस्ट वाचता वाचताच झोप आली...आणि तसाच झोपलो. ३ वाजता उठायचे टेंशन होतेच. पण तरीही ४:१५ वाजता फ़ोन आला तेव्हाच उठलो. काही मिनिटातच तयार होऊन खाली उतरलो...बघतो तर आधीच बेंच वर राजीव, विरल, हिरा आधीच पोहोचले होते.

"चला"
"तुझी कार कुठे आहे? "
"मी चावी आणलीच नाही"
"अरे तुला फ़ोनवर सांगितले ना...तुझ्या कारने एअरपोर्टवर जायचयं"
"कधी...मला नाही काही कळलं...मी झोपेत होतो. तुमच्या गाडीला काय झालंय? इथवर आलात ना कारनेच?"
"बरं चला आधीच उशीर झालाय. माझ्या गाडीचा थोडा प्रॉब्लेम आहे इंजिनचा..माहित नाही ७० च्या स्पीडने फ़्रिवेवर पळेल की नाही. पण हरकत नाही. चला जाऊया माझ्याच कारने" राजीवला नेहेमीच परिस्थितीचे भान असते.

मग त्या कारने सरळ एअरपोर्टच्या कार रेंटल्स मधे गेलो. एक ७ सिटर KIA Borrego आणि एक sedan शेवी इंम्पाला रेंट केली. प्रत्येक कार वर दोन दोन ड्रायव्हर्सला टाकले. माझे नाव मी बोरेगो मधेच टाकले. चौघांमधे तीन गाड्या (२ रेंटेड आणि १ राजीवची) वाटल्या. निघण्यापुर्वी फ़ोन करुन प्रत्येकाला तयार रहा आम्ही आलोच असा दम भरला आणि पुन्हा घरी निघालो.

घरी आल्यावर आम्ही निवांतपणे १ तास तयारी केली. लोकांचे फ़ोन येतच होते. आम्ही तयार आहोत. कधी निघायचंय म्हणुन. मग एकदाचे निघालो. गॅस शेगडी, प्रोपेन सिलिंडर, तंबु असं बरंचसं कॅम्पिंगचं सामान कोंबलं. आणि मग एकेकाला घेत घेत निघालो. ३०० मैलांचा ड्राइव्ह होता hot spring पर्यंतचा. hot Springs हे बिल क्लिंटनचं जन्मगावाजवळंच एक छोटं शहर. तिथल्या गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि ओझार्क टेकडीच्या पायथ्याशी आहे. तिथुन पुढे ५० एक मैलावर टेकड्यांनी वेढलेला Lake Ouachita (उचिता) आहे. त्याच्या आसपास भरपुर कॅम्पिंग साईट्स आहेत. कुठेही डेरा टाकुन राहु असा विचार होता.


शहराबाहेर आल्यावर लगेच ब्रेक घेतला. गाडी माझ्या ताब्यात आली. तिथुन टेक्सासची हद्द पार करेपर्यंत बोरेगोची राइड. काय मस्त गाडी आहे...नुसता थोडा अ‍ॅक्सेलरेटर टच केला तरी 70miles च्या वर स्पीड पकडते. पोलिस मामांपासुन सावधान राहत अशी गाडी चालवणं म्हणजे किती संयम पाळावा लागतो याचा अनुभव घेत होतो.शक्य तेव्हा ८५ च्या स्पीडने मामा लोकांचा अंदाज घेत चालवली..काही तासातच टेक्सासची हद्द क्रॉस करुन आरकंसास मधे प्रवेश केला. सीमेवरील टेक्सारकाना ह्या शहरात ब्रेक घेतला. त्याआधी आमच्या गाडीमधे अंताक्षरीचा प्रोग्राम झाला. मी ज्या टीममधे होतो अर्थातच ती टिम जिंकणार होती. प्रंचंड उन्ह पडलं होतं. किरणं रस्त्यावर रिफ़्लेक्ट होऊन डोळ्यात घुसत होती. गाडी चालवतांना बराच डोळ्यांचा व्यायाम केला होता. ब्रेकमधे डोळ्यांवर पाणी मारुन...गाडीची चावी राजीवकडे परत केली. आता आराम करायचा टाइम होता. पुढचा एक तास ड्रायव्हरच्या बाजुला बसुन निवांतपणे आरकंसासची हिरवाई पाहता पाहता hot spring मधे प्रवेश केला. गाडीत गॅस भरला...आणि तडक ब्रॅडी माउंटनकडे कुच केली. लेक उचिताला लागुनच असलेला हा ब्रॅडी माउंटन कॅम्पर्सचे फ़ेव्हरिट ठिकाण आहे.

शहर सोडताच अगदी आपल्या कोकणातल्या रस्त्यांसारखे छोटे छोटे रस्ते दिसु लागले. दुतर्फ़ा गर्द उंच झाडे. इथली झाडं ओळखीची नाही वाटत अजिबात. कुठली असतात माहीत नाही. पण असतात. शेवटी रस्ते चुकत चुकत कॅम्प साईटला पोहोचलो...पाहतो तर काय कॅम्प साईट्स फ़ुल. नो एंट्री. मग तिथुनच माहीती काढत कळलं की १० मैलांवर लेक उचिताच्या अगदी बाजुला जॉप्लिन नावाच्या जंगलात २ कॅम्प साईट्स उपलब्ध आहेत. पण जो आधी येईल त्याला ती साईट मिळेल. मग काय आम्ही सुसाट गाडी सोडली. आमची दुसरी गाडी भरकटलेलीच होती. त्या गाडीचा GPS हि गोंधळला होता. मोबाईलची रेंज गेलेली होती. एका ठिकाणी चुकुन रेंज मिळाली. भरकटेल्यांना रस्ता सांगितला आणि डायरेक्ट जॉप्लिनला यायला सांगितले.

जॉप्लिनला पोहोचलो. दोन्ही कॅम्प साईट्स अजुन उपल्ब्ध होत्या. पहिल्या साईटवर गेलो. लेक उचितोच्या काठावर, पण काठ सरळ नव्हता, उतार होता. मग दुसरी साईट बघायचे ठरविले. पण तोवर जर कोणी आधीच आले आणि दुसरी साईट ह्यापेक्षाही खराब असेल तर काय करायचं ह्या विचाराने अमितला तिथेच उभे केले आणि आम्ही गाडीने दुसऱ्या साईटवर पोहोचलो. अगदी जशी हवी होती तशीच साईट होती. तळ्याकाठची आणि जमीनही बऱ्यापैकी सपाट होती. मग मी तिथेच थांबलो आणि राजीव अमितला घ्यायला पहिल्या साईटवर गेला. अमितला घेऊन परत येतच होता.तेव्हढ्यात त्याच्यामागे एक RV (recreational vehicle, स्वदेशमधे शाहरुख कडे असते तशी व्हॅन) आली. त्या RV मधुन एक अमेरिकन कुटुंब बाहेर आलं आणि अमितशी काहीतरी बोलायला लागलं. ते लोकं जरा वैतागलेली वाटत होती. काय झालं म्हणुन आम्हीही गेलो त्यांच्याजवळ. आणि काय प्रकार घडलाय ते लक्षात आलं. झालं असं होतं की अमित पहिल्या साईटवर उभा असतांना ते लोकं तिथे गेले होते आणि त्यांना अमितने सांगितले की ती साईट त्याने बुक केलीय.म्हणुन ते दुसऱ्या साईटकडे आले पण रस्ता भटकल्याने त्यांना थोडा उशीर झाला. तोवर राजीव अमितला घेऊन दुसऱ्या साईटवर नुकताच पोहोचला होता. इथेही अमितला पाहुन ती मंडळी वैतागली होती. अमेरिकन बायका फ़ारच तापट असतात ह्या बाबतीत. त्या बाईने सरळ कॅम्पसाईटच्या रेंजर्सला फ़ोन केला आणि झाला प्रकार सांगितला. थोड्याच वेळात रेंजर पोहोचला. कशीबशी समजुत काढुन त्यांना पहिल्या साईटवर रवाना केले, पण ह्याच अटीवर की जर ती साईट तोवर जर कोणी बुक केली असेल, तर आम्हाला आमची साईट त्यांना द्यावी लागेल. मोठीच रिस्क होती. सुदैवाने ते कुटुंब परतले नाही. बहुधा त्यांना ती साईट मिळाली असेल.

मग आमची दुसरी गाडीही आली तिथे. सगळं कॅम्पिंगचं सामान त्यातच होतं. तोवर दुपारचे तीन वाजले होते. सगळे थकले होते. पण कॅम्प उभा करणे बाकी होते. आणि भुकही लागली होती. मग २-३ जणांना कार घेऊन शहरात जाऊन पिझ्झा आणि रात्रीच्या जेवणाचे, कॅम्प फ़ायरचे सामान आणायला पाठविले. बाकी आम्ही तिथेच कॅम्प सेटअप करायला थांबलो. काही अनुभवी कॅम्पर्सच्या मदतीने झोपायचे तीन तंबु उभे केले. बऱ्यापैकी जिकीरीचं काम होतं. नंतर किचन प्लॅटफ़ॉर्मवर कॅनोपी चढवली. किचन सेटअप केले. गॅस कनेक्शन जोडले. मग तंबुवर लाईटींग केली. हे करता करता पाच वाजले. अजुन जेवणाचा पत्ता नव्हता. शॉपिंग ला गेलेले गडी अजुन परतले नव्हते. फ़ोनाफ़ोनी सुरुच होती. येतो येतो करता करता सहा वाजता मंडळी परतली. पिझ्झा थंड झाला होता. बऱ्याच जणांची भुकही मेली होती. संधीचा फ़ायदा उठवत मी भरपेट पिझ्झा खाल्ला. पिझ्झा खाऊन बऱ्यापैकी सुस्तावलो. बोट रॅम्प (जिथुन बोटी तळ्यात प्रवेश करतात) जवळ एक कॉमन एरिआ होता. तिथे काही बाकडी होती. त्यावर जाऊन अंग टाकले. दिवसभरच्या मेहनतीचा थकवा तळ्याकाठावरुन थंड गार वाऱ्याच्या झुळकांनी हळु हळु वाहुन जात होता. सुर्यास्तापर्यंत (म्हणजे जवळपास साठे आठ वाजेपर्यंत) मी तिथेच पडुन होतो. अंधार झाल्यावर मात्र कॅम्पवर परतलो. सगळ्या मुली रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागल्या होत्या. आम्हीही मग कॅम्प फ़ायर पेटवला. आणि तळ्याकाठी खुर्ची टाकुन गप्पा मारत बसलो. छोले-भाताचे जेवण झाले आणि मग गुज्जु दांडिया सुरु झाला. रात्री दहा नंतर आवाज करणं जरा रिस्कि होतं कारण आजुबाजुच्या कॅम्प वाल्यांनी तक्रार केली तर आमची गच्छंती अटळ होती. हे अमेरिकन अजुनही संध्याकाळी लवकर जेवुन झोपतात आणि पहाटे लवकर उठतात.सुदैवाने आमच्या बाजुची कॅम्प वाली मंडळीही जोरजोरात गप्पा मारत होती. त्यामुळे आम्हालाही थोडा जोश चढला. नेहेमीप्रमाणे उत्साही मंडळी नाचायला वगैरे लागली. आम्हाला त्यात ओढायला लागली. पण आम्ही धर्मेंद्रचे चाहते. नाच पाहुन लांब पळतो. लोकं का नाचतात हा प्रश्न मला नेहेमीच पडतो, तेव्हाही पडला. पण उत्तर काही मिळाले नाही.

त्यानंतर मात्र थकुन सगळे तंबु मधे शिरले, मला मात्र झोप लागेना...रोज रात्री ऑर्कुट लागतो झोपायला. मग मी लोकांना भुताच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. काही वेळातच सगळी सामसुम झाली आणि मीही निरुपयोगाने डोळे बंद केले. सकाळी सुर्योदय पहायला लवकर उठायचेय असं ठरलंही होतं.

सकाळी उठुन मग सुर्योदय, तळ्यातल्या पाण्यात थोडी मस्ती आणि फ़ोटोसेशन असे कार्यक्रम उरकले. काही उत्साही मंडळींनी नाश्ता बनवायला घेतला. तो करुन आम्ही गाशा गुंडाळायला सुरुवात केली. पुढचे लक्ष होते हॉट स्प्रिंग्स. शहराचे नावच गरम पाण्याच्या झऱ्यावरुन पडले आहे. त्या झऱ्याचे पाणी औषधी असतं असा समज आहे. लोकं मोठ मोठाले कॅन्स घेऊन आले होते पाणी घेऊन जायला. एका गरम पाण्याच्या कुंडात आमचा मित्र त्याचे मोडलेले बोट शेकायला लागला (चप्पल घालुन टेनिस खेळतांना पडला आणि करंगळी मोडुन घेतली). पण पाणी इतके गरम होते की त्याला जास्त वेळ बोट बुडवायला जमत नव्हते. शेवटी त्याच्या मोरल सपोर्ट साठी आम्ही एक गेम खेळलो. प्रत्येकाने आपापले बोट त्या उकळत्या पाण्यात टाकायचे आणि जो सगळ्यात शेवटी बोट बाहेर काढेल तो जिंकला. ह्यात मी बाजी मारली. ह्या गेमचे ४-५ राउंड्स झाले. मला कॉम्पिटीशन द्यायचा खुप प्रयत्न् झाला. पण अर्थातच अयशस्वी प्रयत्न होते ते.

दुपार झाली होती. लंच टाईम..आणि पुढे दिवसभर काय करायचे हाही प्रश्न होताच. मग पेटीट-जीन माउंटन गाठायचे ठरवले. रस्त्यातच पुन्हा टॅको बेल मधे खाऊन निघालो. दोन तासाचा डेंजरस ड्राइव्ह होता. भारतातल्या घाटांप्रमाणेच, पण स्पीड कमीत कमी ताशी ४० मैलांचा ठेवावा लागत होता नाहीतर मागे गाड्या हॉन्क करुन जात. इथे कोणी आपल्याला हॉन्क केले म्हणजे आपला अपमान झाला अशी समजुत बाळगुन गाडी चालवावी लागते. पेटीट-जीन हे अरकंसास मधे वर्ल्ड-फ़ेमस असलेले प्रेमी युगल होते, त्यांना काही कारणांनी डोंगरावरुन उडी मारुन आत्महत्या करावी लागली होती. अमर प्रेमाचे प्रतिक म्हणुन त्या डोंगराला पेटीट-जीन नाव दिले होते. अर्थात ओझार्क टेकड्यांचा एक भाग होता हा डोंगर.

ओझार्क टेकड्या ह्या आपल्या सह्याद्रीसारखा अजिबात नाहीत. सह्याद्री जसा कठीण अग्निजन्य खडकांचा काळाकभिन्न दगडी वाटतो, त्याच्या उलट ओझार्क टेकड्या ह्या सेडिमेंटरी रॉक्सच्या (एकावर एक मातीचे थर जमा होऊन पुढे खडक बनतात) बनलेल्या असतात...अगदी वीटांनी बनलेल्या भींती वाटाव्यात अशा. हजारो वर्षांपुर्वी हिमनगानींना हे खडक छाटुन टाकले होते आणि त्या मार्गावर सेडार फ़ॉल्स नावाचा एक छोटासा धबधबाही निर्माण झालाय.

वर पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले होते. आम्ही तिथल्या टुरिस्ट सेंटरमधुन पॉइंट्स चा मॅप मिळवला आणि गाडीनेच सगळे पॉइंट्स बघितले. हा अनुभव अगदीच सॉलिड होता. अगदी जंगली पायवाटांवरुन गाडी चालवावी लागत होती. दोन्ही बाजुला गर्द झाडी. अमेरिकन गाड्यांना पायवाटांची अजिबात सवय नसते. अगदी कमी स्पीडवर हळु हळु आम्ही डोंगरमाथा फ़िरत होतो. काही काही पॉइंट्स वरुन खालची सपाट खोरी दिसत होती...असले दृश्य भारतात खुपदाच बघायला मिळते, पण आठवण झाली ती एलोराच्या डोंगरावरुन जसे तापीच्या खोऱ्यातील खानदेश दिसतो त्याची. प्रत्येक पॉइंटवर आमचे फ़ोटोसेशन झाले. आणि परतीचा रस्ता धरला. पुन्हा दोन तासाचा बिकट रस्ता पार करुन हॉट स्प्रिंगला पोहोचलो.

साडे नऊ वाजले होते. सगळे रेस्टॉरंट्स बंद. शेवटी पुन्हा टॅको बेल ने आसरा दिला. आणि खाऊन आम्ही रात्री साडे-दहाला आम्ही निघालो. आणखी पाच तासांचा ड्राइव्ह बाकी होता. मी गाडी राजीवला दिली, आणि बाजुला बसलो. प्रचंड थकवा आला होता. मस्त एक झोप काढली. रस्ता सुमसान होता, पण जास्त स्पीडने चालवल्यास मामांची भीती म्हणुन ताशी ७५ मैलांच्या स्पीडला क्रुझ सेट केले आणि राजीव मांडी घालुन बसला. पण असं बसणं म्हणजे झोपेला निमंत्रण. १२ वाजता आमची गाडी इकडे तिकडे लेन च्या बाहेर जाऊ लागली. राजीव झोपेशी झगडत होता. शेवटी एका गॅस स्टेशनवर गाडी थांबवली. गॅस भरला. माझ्याकडे गाडीचा ताबा आला. जनरली ऑर्कुटींग मुळे रात्री जागण्याची माझी सवय, त्यामुळे मी बऱ्यापैकी कंडीशन मधे होतो. अजुन तीन-साडेतीन तासांचा ड्राइव्ह होता. मी क्रुझ वर गाडी न ठेवता नेहेमीसारखा अंदाज घेत ८०-८५ मैलाच्या स्पीडने निघालो. क्रुझ वर गाडी ठेवली असती तर झोप आली असती. त्यापेक्षा नॉर्मल मामा लोकांचा अंदाज घेत गाडी चालवणं सोपं वाटलं मला. रात्री तीन वाजता आम्ही प्लॅनोपासुन ३० एक मैलांवर पोहोचलो होतो आणि आता मात्र माझे डोळे मिटु लागले. हा अनुभव अविस्मरणीय होता. काही सेकंदासाठी डोळे बंद व्हायचे आणि अचानक खडबडुन जागे व्हायचो. गाडी लेनच्या बाहेर कशीही जात होती. सुदैवाने गाडीत इतर सगळे झोपले होते. फ़क्त राजीव बाजुला बसला होता. एकदा तर बाजुच्या रस्ते कामाला गाडी खरचटणार तेव्हढ्यात राजीव ओरडला, माझे डोळे उघडले आणि अगदी थोडक्यात वाचलो. मधे कुठे थांबायलाही जागा नव्हती. सगळेच जागे झाले होते. जीव मुठीत धरुन मग पुढचा अर्धा तास बिचार बसले होते. कधी एकदाचा मी लोकांना त्यांच्या अपार्टमेंटमधे उतरवतोय असं झालं होतं मला. शेवटी तो क्षण आला. गाडीतुन सामान उतरवलं आणि एकाच्या गॅरेजमधे टाकलं. सकाळचे पावणेचार झाले होते. गाड्या परत करायच्या होत्या. सकाळी साडेचारच्या नंतर परत केल्या असत्या तर एका दिवसाचा रेंट भरावा लागला असता. मग तसेच आम्ही चार जण तीन गाड्या घेऊन एअरपोर्टच्या दिशेने निघालो.

एअरपोर्टच्या रिटर्न्समधे कार परत केल्या. आणि घरचा रस्ता धरला. एक मोठी ट्रिप संपली होती. लोकं फ़िलॉसॉफ़िकल बनत होते. मधेच राजीवने गाडी त्याच्या आवडत्या धार्मिक विषयांवर नेली. आणि मग खरा टाइमपास सुरु झाला. पुढचा पुर्ण वेळ मी आणि राजीव भांडत होतो. विषय नेहेमीचेच. वालीला का मारले, सीतेची अग्निपरिक्षा का घेतली, तीला का सोडुन दिले, शुर्पणखेचे नाक का कापले वगैरे वगैरे.
घर कधी आलं ते कळलंच नाही. पण घरी जाताच शांत झोप आली,ऑर्कुटवर कम्युनिटीजवर पोस्ट करायची गरज पडली नाही, कारण त्याची उणीव कार मधे भांडुन पुर्ण केली होती.

Tuesday, May 25, 2010

निवृत्त

[एकसे बढकर एक महारथी पत्रकार जमलेत, पंतप्रधानांची पत्रकार परिषद कव्हर करायला प्रत्येकाचा उत्साह ओसांडुन वाहतोय. अचानक पत्रकार परिषद भरविण्याचं कारण कोणालाच कळेना, त्यामुळे उत्कंठा शिगेला. तेव्हढ्यात पंतप्रधानांचे आगमन. सगळीकडे शांतता. पंतप्रधान माइकपुढे येतात]

पंप्र: मित्रहो... प्रस्तावना करत नाही. मी निवृत्त होणार आहे.
[सगळे अवाक, हे काय भलतंच]
पंप्र: तुमच्या सगळ्यांच्या मनात काय प्रश्न आहे हे मी जाणतो. मी निवृत्त का व्हायचं ठरवलं हेच कळत नाहीये ना?
[पत्रकारांची होकारात्मक शांतता]
पंप्र: माझ वय ८४ वर्ष. गेल्या ६० वर्षापासुन राजकारणात सक्रिय आहे. साध्या कार्यकर्त्यापासुन ते आज पंतप्रधानापर्यंत. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. जीवनात प्रत्येक अडचणींवर संघर्षाने मात करत आज ह्या टप्प्यावर पोहोचलोय. माझं राजकारण हे लोकांसाठी कधीच नव्हतं.
[पत्रकारांमधे खळबळ]
पंप्र: माझं राजकारण हे माझ्या स्वत:साठी होतं. लोकांनी माझंच ऐकावं. मी म्हणेल तसंच व्हावं ह्या अनिवार इच्छेपायी मी शक्य त्या मार्गाने सत्ता माझ्या ताब्यात राहिल याच्याच प्रयत्नात राहिलो. ह्या प्रयत्नात अनेक बरे-वाईट निर्णय जनतेच्या भल्यासाठीही झाले असतील, पण त्यांचा हेतु कधीही निर्मळ नव्हता.
[आजवरचा सगळ्यात स्वच्छ प्रतिमेचा पंतप्रधान असं काहीतरी बोलतोय यावर कोणाचाच विश्वास बसेना. ह्या धक्क्यातुन पत्रकार सावरलेच नाहीत]
पंप्र: गेले ६ वर्ष मी सर्वोच्च पदावर आहे. संपुर्ण बहुमतात. पक्षांतर्गत विरोधकही नाहित मला. जसं हवं तसं राज्य करतोय. ह्याच ६ वर्षांसाठी मी त्याआधीची ५४ वर्ष राजकारण केलं. ईश्वरकृपेने अजुनही मी ठणठणीत आहे. आणखी ४ वर्ष सहज राज्य करु शकेल इतकी उत्तम प्रकृती आहे. पण मग मी निवृत्तीचा निर्णय का घेतोय?
[पत्रकारांची उत्कंठा शिगेला]
पंप्र:काल एक विचित्र घटना घडली. काल स्वप्नात बापु आले. तसाच अवतार, तीच काठी, तोच चष्मा, तेच टक्कल, तेच चमकणारे डोळे. बापु खुप गुश्श्यात दिसत होते. बापु पुढे आले आणि काठीने मला बदडायला लागले. काय चालवलं आहेस हे, म्हणुन मला जाब विचारत होते आणि काठीने मारत होते.

[पंतप्रधान वेडे वैगेरे झालेत याची पत्रकारांना आता खात्री झाली]
पत्रकार: मग म्हणुन तुम्ही पंतप्रधानपद सोडताय का?
पंप्र: बापुंनी मारलं म्हणुन नाही. बापु मला मारत होते. मी चुपचाप मार खात होतो. पण एक क्षण असा आला जेव्हा मस्तकात एक सणक येऊन गेली. मी बापुंची काठी घेऊन त्यांच्या मस्तकावर बेभान होऊन प्रहार करु लागलो. बापु रक्ताच्या थारोळ्यात पडले. मी भानावर आलो. हे राम मी हे काय करुन बसलो? मी बापुंना ठार मारलं? बापुंपासुन प्रेरित होऊन बालपणापासुनच देशसेवेचे व्रत उचललेला मी, त्यांच्या प्रत्येक आदेशाचं पालन करणारा मी, वयाच्या विशीतच बापुंचा सहवास लाभल्यानेच आयुष्यात एक ध्येय घेऊन चालु शकणारा मी, मी बापुंना मारलं? मुळात बापुंवर मला मारायची वेळच का आली? मी घामाघुम होऊन उठलो. उठलो तेव्हापासुन झोपु शकलो नाही. आयुष्यात मी मार्गापासुन कधी ढळलो मला कळलंच नाही. राजकारणाच्या धुंदीमधे मी माझं आयुष्य वाया घालवलं याची मला जाणीव झाली. त्यासाठी स्वप्नात का असेना, मला बापुंना ठार मारावं लागलं होतं. स्वप्नात का असेना बापुंना हाती शस्त्र धरावं लागलं, हिंसा करावी लागली. हे मी सहन करु शकलो असतो, पण माझ्यात जागृत झालेला ६० वर्षांपुर्वीचा गांधीवादी हे कदापि सहन करु शकत नाही. मी प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलंय. मी पद सोडायचं ठरवलंय. मी फ़क्त निर्णय कळवायला ही प्रत्रकार परिषद भरवली होती. ह्यावर एकही प्रश्न मला नकोय. मी राष्ट्रपतींकडे राजीनामा दिलाय.
[पंतप्रधान निघुन जातात. पत्रकारांमधे खळबळ. उत्तराधिकारी कोण हे कळणं तर गरजेचं असतंच. ही पत्रकार परिषद अभुतपुर्व असते. पत्रकार पंतप्रधांनामगे धावतात. पंतप्रधान गांधींच्य समाधीकडे जायला निघालेले असतात. त्यांच्या राजीनाम्याची बातमी वाऱ्यासारखी पसरलेली असते. पंतप्रधान फ़क्त निवृत्तीवर समाधान मानणार की आणखी काही गौप्यस्फ़ोट करणार याबाबत चर्चा सुरु होतात. राजकीय वर्तुळात खळबळ आणि अस्वस्थता]

काही वेळातच ब्रेकींग न्युज झळकते. पंतप्रधानांचा बॉम्बस्फ़ोटात मृत्यु... गांधींच्या समाधीचेही बरेचसे नुकसान.