Monday, August 16, 2010

नरक

वपुंचे एक वाक्य आहे , हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणे म्हणजे नरक ! हे पुस्तकाच्या सुरुवातीला सांगितलेल्या गोष्टीमध्ये वाक्य आहे आणि हवा तेव्हा हवा तो माणूस नसणे म्हणजे नरक हे पुस्तकाच्या शेवटी... ! असाच विचार करताना वाटले असे का असावे.. म्हणजे त्या दोन गोष्टींच्या जागा बरोबर आहेत कथेमध्ये पण जर विचार करायला गेलो तर माणसाचा समजुतदारपण वाढला असण्याचे पण एक लक्षण आहे म्हणजे ज्यावेळी अगदीच कॉलेज मध्ये जायला लागलेलो असतो त्यावेळी एकदम मोठे झालो आहोत आपण , आता आपले आयुष्य माझे आहे.. मी काहीपण करू शकतो त्याचे.. हि भावना आलेली असते .. आणि मग आपण छोट्या छोट्या गोष्टी पण प्राव्हेट ठेवायला लागतो उगीचच. सारखे वाटत असते कि आई माझे मित्र आल्यावर माझ्या रूम मध्ये काय करत आहे.. त्यावेळी हेच वाटत असते कि कोणी नको आहे.. आपण आपल्या मस्ती मध्ये असतो .. काही वर्षे जातात हे समजायला कि माणसांशिवाय आपण नाही जगू शकत... आणि ती माणसे जोडायला बऱ्याच गोष्टी करायला लागतात.. खूप साऱ्या तडजोडी कराव्या लागतात. आणि हवा तेव्हा नको असलेला माणूस काढणे सोपे होऊन जाते आयुष्यात पण हवा तेव्हा हवा तो माणूस असणे आपल्याबरोबर इतके सोपे राहत नाही .. आयुष्य जसे जसे पुढे जायला लागते तेव्हा लक्षात येते कि अगदी शाळेपासून ज्याच्याबरोबर आहे त्या मित्राला आता सोडून जावे लागेल पुढचे शिक्षण घेण्यासाठी मग तिथे २-३ चांगले मित्र बनतात वाटत असते कि आता हे राहतील आयुष्यभर आपल्या बरोबर पण नाही परत वेळ येते सगळे सोडून देवून करियर च्या मागे लागायची .. मग बाकीच्या जबाबदाऱ्या वाढायला लागतात.. आणि मग लक्षात येते कि मागे जे काही आपण सोडून आलो आहोत ते त्यावेळी कधी कधी नकोसे पण वाटायचे पण आता ते त्यावेळी नकोसे वाटलेले क्षण पण चालतील पण तो काळ परत यावा.. राहावे त्याच माणसांबरोबर कायमचे असे विचार यायला लागतात .. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो ... आणि मग तो हवा असलेला तिसरा माणूस अजूनच खूप दूर गेलेला असतो.. कदाचित त्याला पण तेच वाटत असत असेलही पण म्हणून जे जगणं आपण स्वीकारले आहे त्यातून मागे फिरणे इतके सोपे कुठे राहिलेले असते.. मग राहते काय फक्त , काही जुन्या अर्धवट आठवणी , काही कायमचे लक्षात राहिलेले निरोप , काही कधीच व्यक्त न केलेल्या भावना , काही कधीच विसरता न येणारे चेहरे.. काही विसरलेले वाढदिवस , काही केलेले आणि पूर्ण न झालेले खूप सारे प्लान्स ... आणि असेच बरेच काही ..!

Thursday, August 5, 2010

तो आणि ती

तिला पक्कं माहित होतं की तो भोळसट आहे. जगातल्या प्रत्येकावर सारखंच प्रेम करणारा असा तो...त्याच्या आयुष्यात आपलं स्थान तरी काय याची तिला खात्री नाही....त्याच्या आजुबाजुला वावरणारे सगळेच त्याच्या जवळचे भासतात...मग आपणंही त्याच गर्दीतले एक तर नाही ना असं तिला सारखं वाटायचं.

कोणालाही दुखावू नये हेच त्याचं तत्व....त्याला भेटणारा प्रत्येक स्त्री-प्ररुष/आबालवृद्ध यांच्याशी जणु त्याचे जन्मांतरीचे नाते असल्यागत आपुलकिने विचारपुस हा करतो...भावनाविवश होऊन काहितरी बोलतो...काही आश्वासनं देतो..पण मग ती आश्वासनं पाळतो ही...त्यासाठी पुढचा-मागचा काहीही विचार करत नाही. हे करता करता अनेक नवे लोक जोडतो...असल्या ह्या जगन्मित्रावर तिचं प्रेम जडलंय....पण तिचं प्रेम एकतर्फ़ी तर नाही ना?

तशी ती खुप बोलकी....सतत बडबड करत असते..प्रत्येक सभारंभ तिच्याशिवाय रंगतच नाही. लोकांना कसं खुलवायचं..बोलतं करायचं हे तिला चांगलंच ठाऊक आहे...प्रत्येक पिकनिकपासून ते गणेशोत्सवापर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमांचं संयोजन ही करत असते. लोकांकडुन काम करवुन घेणं....त्यांना काय हवं नको ते पाहणं हे सगळी काम जणु तिला जन्मजातच येतात. पण तरीही तिला अजुन त्याला काही सांगता नाही आलं...तो कधी काही बोलेल याची तिला खात्री नव्हती...मुळात तिला त्याच्याबद्दलच खात्री नव्हती. आणि ती खात्री करवुन घ्यायची हिंमत तिच्यात नव्हती.

तसा तो तिचा बालपणीचा मित्र...शेजारच्याच घरातला....ती फ़क्त त्याच्यापेक्षा एका महिन्याने लहान. लहानपणापासुन एकत्र खेळले...एकाच शाळेत, कॉलेजात असलेले...एकत्र अभ्यास करणारे...असे ते दोघे.

कॉलेजात असतांना काही मवाली मुलं तिचा पाठलाग करत...ह्याला एकदा कळलं...तो जाऊन त्यांच्याशी बोलला..त्या मवाल्यांनी त्याला चांगलाच चोप दिला...पोलिसकेस झाली....पण हा असा धर्मात्मा की त्याने त्या मवाल्यांना ओळखायल नकार दिला..ती मवाली पोरं एकदम फ़ॅन झालीत त्याची....जिगरी दोस्त...तिच्याकडुन त्यांनी राख्या बांधवुन घेतल्या..माफ़ी मागितली...त्या मवाल्यांना पुढे वडापावची गाडी टाकुन द्यायला ह्याने अनेक खटपटी केल्या..आणि शेवटी ती पोरं मार्गाला लागली..हे त्याचे पहिले समाजकार्य...इथून त्याची गाडी जी सुरु झाली कि आज पाच वर्षांनंतर तर तो तिला भेटेनासा झाला. बघावं तेव्हा घाईत..काहीतरी कामात...ऑफ़िसातुन उशिरा येतो...हल्ली तिच्याशी बोलणंही महिन्यातुन एखादवेळाच होतं.

तिने एकदा हिंमत केलीच.....रात्री ऑफ़िसातुन येत असतांना रस्त्यातच गाठला...
"तुषार .......‍" तिने लांबुन हाक मारली
"जया...." त्याने मागे वळुन पाहिलं..."अगं तु इतक्या रात्रीची कुठुन येतेयेस?"
"येत नाहीये....वाट पाहत होते तुझी...जेवण करुन जरा पाय मोकळे करुन येते असं घरी सांगुन आलीय"
"माझी वाट काय बघायची? अगं फ़ोन करायचा ना मला...बोललो असतो की आपण"
"फ़ोनवर बोलण्यासारखं नव्हतं" अवघडलेपणाला तिने तिच्या फ़टकळपणामधे लपवला.
"असं काय महत्वाचं" त्याला काही कळतच नव्हतं...
"तु लग्नाचा काय विचार केलायेस?"
"काही नाही...का गं? तुला आईने तर नाही ना पाठवलंय माझ्याकडुन माहिती काढुन घ्यायला?"
"नाही...मी स्वत:च आलेय...तुला प्रपोज करायला" पटदिशी ती बोलली.
"हे बघ आताच मी ऑफ़िसातुन थकून भागून येतोय...उगाच पांचट विनोद नकोयेत मला"
"अरे असा काय तु....मी खरंच बोलतेय....तुला काहीच नाही कळत का रे.." तिच्या चेहऱ्यावरचा फ़टकळपणा उतरला होता
"काय?...छे काहीतरीच.......म्हणजे हे कसं शक्य आहे...." तो पुरता गोंधळला
"का...का शक्य नाही?"
"अगं पण हे असं काहीतरी...." त्याला शब्द सुचत नव्हते...त्याने खरंच ह्याबद्दल विचार केला नव्हता.
"असं काहीतरी म्हणजे? तु सांग तुला माझ्याइतकं कोण ओळखतं? अरे मी तुझी बेस्ट फ़्रेंड आहे."
"हो तुच तर आहेस..." हे स्वगत करत होतं...कि तो तिच्याशी बोलत होता ह्याचे त्यालाही भान राहिले नव्हते.
"मग?"
"मग काय...मी बोलतो घरी...सांगतो आईला"
"काय तु आईला सांगशील? काय सांगशील?"
"हेच की तु मला मागणी घातलीस ते"
"मुर्खा....तु आईला हे सांगणार आहेस..."
"मग काय सांगु..."
"आता हे पण मीच सांगु का....तुला स्वत:ची अक्कल नाहीये का?"
"बरं मी सांगतो आईला की मला तु आवडतेस...मग तर झालं?"
"ठीक आहे...पण मी प्रपोज केलंय ते कोणालाही कळता कामा नये..आलं लक्षात?"
"हो...मी बघतो आता काय करायचं ते....एका महिन्यात बार उडवुनच टाकु आपण"

"आई....मला एक बोलायचंय"
"बोल..."
"मला जयाशी लग्न करायचंय"
"काय? तुला लग्न करायचंय? मुर्खा...अजुन सेटल तरी झालास का? अजुन आपण ह्या वन बीएचके मधे राहतोय...आणि म्हणे लग्न करायचंय....बायकोला रहायला जागा नको?"
"जयाच तर आहे....राहिल ती तिच्या आई-बाबांकडे...त्यात काय एव्हढं"
"डोंबलं माझं....अरे तुला काही कळत नाही का अजुन...लष्कराच्या भाकऱ्या भाजतोस आणि एव्हढा लोकांमधे फ़िरतोस...पण साध्या संसाराच्या गोष्टी डोक्यात नाहीत जात तुझ्या.. आधी एक मोठं घर घे...निदान टू बीएचके..मग बघु लग्नाचं"
"कोणाच्या लग्नाचा विषय सुरु आहे?" बाबांनी एंट्री मारली.
"तुमचा चिरंजीव...जयाशी लग्न करायचं म्हणतोय."
"कोण? जया? अरे मग प्रॉब्लेम काय आहे? छानच बातमी आहे की"
"बातमी असु द्या....पण हे सांगा की ती राहणार कुठे? आपलं घर केव्हढं...आधी घर बुक करा कुठे तरी...मग पाहु आपण"

"जया...मी बोललो आईशी काल"
"काय म्हणाली आई"
"म्हणते आधी मोठं घर घे...मग बघु"
"अरे...त्यात काय एव्हढं?"
"म्हणजे...तुला मार्केट रेट माहितेय ना? टु बीएचके म्हणजे निदान चाळीस लाख लागतील"
"अरे...मग आपण दोघं मिळुन घेऊ ना घर....त्यात काय विशेष...आपल्या दोघांना मिळुन मिळेलच कि इतकं लोन"
"अरे हो की....मग जमलंच समज..."

अशा प्रकारे काहीही फ़ारसा त्रास न होता...ती आणि तो लग्नगाठीत बांधले गेले. घर घेतले. पुढे तो हळू समाजकार्यातुन नाव कमावु लागला...कार्यसम्राट हि उपाधी त्याला मिळाली..वर्तमानपत्रांमधे त्याच्या साधेपणाचे किस्से छापुन यायला लागले. त्याने आपल्या पक्षाच्या उमेदवाराला पाठींबा द्यावा म्हणुन मोठमोठी नेतेमंडळी त्याच्याशी जवळीक साधू लागली. हळुहळु त्यालाच निवडणुकीच्या टिकिटांची ऑफ़र यायला लागली. तिला मात्र आता ह्या गोष्टीचा खुप त्रास व्हायला लागला. कुठलेही कसेही लोकं घरात येतात. आणि प्रत्येकाचं चहा-पान करावं लागतं...ऑफ़िसवरुन यावं थकुन-भागुन आणि घरात मरमर काम करावं. वीकएंडला पण आराम म्हणुन नाही अजिबात.

एक दिवस खुपच अति झालं...भेटायला आलेल्या मंडळींसमोर तिने त्याला झापलं. त्याला मात्र कधी नव्हे तो राग आला...सात्विक संतापाने थरथरु लागला तो...त्याने फ़ाडकन तिच्या कानाखाली लगावली. हे जरा अतिच झालं. तिचं आधीच जिवावर आलं होतं..वरुन ही थप्पड...तिने रागाने बॅग भरली आणि निघाली तिच्या माहेरी. सगळी मंडळी नुसता तमाशा बघत होती. काही जास्त न बोलता ती मंडळीही निघून गेली.

दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात बातमी छापुन आली...समाजसेवक म्हणवणाऱ्या तुषार चौगुलेंनी त्यांच्या बायकोला मारहाण करुन घराबाहेर हाकलुन दिल्याची. त्याला आणि तिला सकाळपासुन फ़ोन यायला लागले. तिने तर एक-दोन फ़ोननंतर मोबाईल स्विच करुन ठेवला...पण तो मात्र प्रत्येकाला समजावत बसला...ज्या मंडळींसाठी त्याने बायकोला कानाखाली मारली त्यांच्यापैकीच कोणीतरी बातमी कुठल्या पत्रकाराला दिली होती.

त्याच्यासाठी ही परिस्थिती खुपच गंभीर झालेली होती. दिवसरात्र झोप नाही...नुसते विचार डोक्यात फ़िरताहेत. तिला फ़ोन केला तर तिचा फ़ोन बंद. मग मात्र तिच्या घरी जायचं त्याने ठरवलं. तिने मात्र घरात घेतलंच नाही. उगाच तमाशा नको म्हणुन हादेखील निमुट निघाला.

सैरभैर मनाने इकडे तिकडे फ़िरायला लागला...खुप दिवसांनी असा एकटाच स्वत:बद्दल विचार करत हिंडत होता. एक वेळ आली की विचार नकोच करायला.... जे वाट्टेल ते करु असा निश्चय करुन तो पुन्हा हिंडायला लागला..ऐरवी ऑफ़िसला जायला घरासमोरुन थेट बस...त्यामुळे चालायची सवय नाही...ठाण्यात असुन लोकल ट्रेनचा प्रवास नाही. आयुष्य कसं अगदी साधं सोपं होतं. जगण्यासाठीची लोकांची धडपड नव्यानेच त्याला दिसत होती. आजवर जी मंडळी भेटलीत ती सगळी त्यांची कामं घेऊन यायची..असं वाटायचं की काहीतरी प्रोसिजरल गोष्टींमुळे छोटी-मोठी कामं अडली आहेत..त्यामागे त्यांच्या आयुष्याची भ्रांत कधी जाणवलीच नव्हती. आणि आज ह्या मनस्थितीत मनावरील झापड दुर झाले होते. हातगडी ढकलणारा मजुर...बुटपॉलिश करणारी मुलं...मासळी विकणाऱ्या बायका...हातपाय तुटलेला भिकारी...भाजीपाला विकणारा भैय्या हे सगळेच जवळचे वाटत होते. असं का वाटतंय हे त्यालाही कळत नव्हतं पण कदाचित जगातल्या सगळ्या धडपड करणाऱ्यांशी त्याला आपुलकी वाटत होती.


त्याला घरातुन हाकलल्यानंतर तिला मात्र खुप विचित्र वाटत होतं...चारचौघांसमोर कानाखाली त्याने मारली ही गोष्ट जणु तिच्या डोक्यातुन निघुनच गेली होती..उलट तिलाच आपण काहीतरी वाईट केल्यासारखं वाटायला लागलं. अगदीच राहवलं नाही म्हणुन तिने त्याला फ़ोन केला. त्याने मात्र उचललाच नाही...पॅंटच्या खिशात सायलंटवर असलेल्या फ़ोनचं त्याला भानंच नव्हतं. मग तिने घाबरुन फ़ोन केला तर घरीही नाही....मग तीन-चार मित्रांकडे केला तर तिथेही नाही. मग मात्र ही बावरली. सैरभैर झाली....आणि घरातुन त्याला शोधायला निघाली. मनच ते...काहीही विचार करायला लागलं...दर पाच-एक मिनिटांनी फ़ोन करत होती. तो मात्र अजिबात उचलत नव्हता.

ती रेल्वे-स्टेशनकडे निघाली. अंतर्मन सांगत होते की तो रेल्वेस्टेशनच्या आसपासच असावा...कसं काय ते माहीत नाही...पण वाटतं मात्र तसंच होतं...आणि तोही खरोखरच रेल्वेस्टेशन जवळच होता. प्लॅटफ़ॉर्मची सैर करावी म्हणुन सहज स्टेशनात घुसायचा प्लान होता. तिकिट काढायचं भान तर नव्हतंच.

जाऊन सहज फ़लाटावर उभा राहिला...दुपारच्या वेळीही गर्दी होतीच...तीही त्याच फ़लाटावर पोहोचली होती...तिने त्याला लांबुनच पाहिले..त्याला हाक मारत होती...पण इतक्या गोंगाटात तिचा आवाज पोहोचतच नव्हता....तिने पाहिले...त्याच्याजवळ टीसी येतोय ते...टीसी त्याला काहीतरी विचारत होता..आणि हा मात्र पुरता गोंधळला होता...तिला त्यापरिस्थितीतही हसु आलं त्याच्यावर....पटकन तिने कुपन्स पंच केले....आणि पुन्हा त्याच्याकडे निघाली...बघते तर काय हा हिरो...टिसीशी भांडत होता...आयुष्यात प्रथमच तिने त्याला असं भांडतांना पाहिलं...टिसीबरोबर असलेल्या एकाने त्याला धरले आणि त्याला कुठेतरी घेऊन जायचा प्रयत्न करायला लागला. रेल्वे पोलिस असावा बहुतेक तो..त्याने हात झटकला आणि पळू लागला...तेव्हढ्यात फ़लाटावरुन एक लोकल नुकतीच सुरु व्हायला लागली होती...त्याने ती चालती गाडी पकडली....गाडी थोडी पुढे जाताच त्याला ती दिसली...तिने कुपन हातात धरली होती...त्याने काहीही विचार न करता चालत्या गाडीतुन उडी मारली....तीही विरुद्ध दिशेने...

तिच्यासमोर तो फ़लाटाच्या आणि रेल्वेच्या गॅपमधे जाऊन पडला...ती काहीही करु शकत नव्हती..गाडी वेगाने निघुन जात होती...तोंडातुन एक शब्दही निघत नव्हता...लोकं ओरडत होते. बेशुद्ध होऊन ती जागेवरच कोसळली...

डोळे उघडले तेव्हा ती तिच्या घरीच होती...सकाळ झालेली होती...कोवळी सुर्यकिरणं खिडकीतुन येत होती..किचनमधे वर्दळ तिला जाणवत होती..अंगात त्राण नसल्यागत ती नुसती पडुन राहिली..तितक्यात आई आत आली...
"अगं उठ...आठ वाजलेत सकाळचे...आज ऑफ़िसला नाही का जायचं?"
"काय?" अशा परिस्थितीत आई ऑफ़िसला जायची गोष्ट कशी करु शकते...तिला कळ्तच नव्हतं.
"’काय काय’... काय करतेस आधी उठ...आणि आज ऑफ़िसवरुन वेळेवर ये...तुषारचे आई-बाबा येणार आहेत ना आज लग्नाची बोलणी करायला?"
"काय?" गोंधळलेल्या चेहऱ्यावरचे तिचे भाव बदलत गेले आणि तिच्या चेहऱ्यावर नकळत एक हास्य फ़ुलले..

Wednesday, August 4, 2010

चहाचा भुरका

जागेचे महत्व इतके का असते ...? म्हणजे प्रत्येकासाठी प्रत्येक जागेविशायीच्या भावना वेगळ्या असतात... आणि हे फक्त जागेविषयी आहे असे नाही.. गाणे असते , सिनेमा असतो , एखादा टी- शर्ट, एखादे वाक्य असते ... तर त्या घटनांशी काहीतरी आयुष्यातला भाग गुंतलेला , गुफान्लेला असतो.. आणि तो काही केला आपण नाही विसरू शकत... असे काहीसे असते.. त्यामुळे त्या गोष्टी पण महत्वाच्या झालेल्या असतात.. तसे बघायला गेले तर या सगळ्या निर्जीव आणि काही करू न शकणार्या गोष्टी आहेत .. पण त्या अशा काही आठवणी बरोबर जोडल्या गेल्यामुळे.. त्या पण आपल्या बरोबर बोलायला लागतात .. आणि मग निर्जीव वाटणार्या गोष्टी पण बोलायला लागतात आपल्या बरोबर.. जे सांगणे खरच कठीण आहे कि नक्की काय असते.. पण प्रत्येकाच्या अश्या काही गोष्टी असतात.. चांगल्या काही वाईट.. काही चटका लावून जाणार्या.. अश्या सगळ्या प्रकारच्या.. पण जसा जसा वेळ निघून जायला लागतो .. त्या गोष्टी मागे पडायला लागतात आणि त्यांची जागा दुसर्या वस्तू , गोष्टी घ्यायला लागतात.. आपल्याही नकळतपणे ...आणि मग कधीतरीच असे एकदम आठवून जाते कि अरे काय दिवस होते ते.. प्रत्येकाला पुढे पाळायचे असते .. मग आपण आता या क्षणाचा कधी विचार करतो.. प्रत्येक क्षणाला आपण कसला न कसला पुढचा विचार करत असतो.. आणि मग असे करतानाच आहे तो क्षण पण निघून जातो.. पण जाता जाता ..नकळत काही क्षण अविस्मरणीय बनतात.. आणि मग सारखे वाटते कि अरे यार आपण असे कधी आपण जगू का ? मग तो आपला एक उच्चांक बनतो .. म्हणजे कुठल्या पण गोष्टी झाल्या कि आपण त्या गोष्टीची तुलना करतो.. थोडक्यात आपण भूत , वर्तमान आणि भविष्य एकत्र आणायचं प्रयत्न करत असतो सतत.. आणि कुठेतरी माहित पण असते कि असे होणे किती अवघड आहे पण तो नेमका क्षण परत पकडायचा प्रयत्न आपण सतत करत असतो.. किंवा तसाच माणसाचा स्वभाव असेल.. प्रत्येक क्षणाला स्वतःची अशी काही ओळख आहे.. पण आपण भेटलेल्या सगळ्याच माणसांना कुठे लक्षात ठेवतो ना काही अशीच आपल्या आयुष्यावर ठसा उमटवणारी माणसे आपल्या लक्षात राहतात... बाकीची अशीच जातात कुठेतरी विस्मृतीत .. तसेच काहीसे .. क्षणांचे पण होत असावे .. एखादा क्षण ठसा उमटवून जातो.. आणि मग त्याच्या जोडलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या कायम लक्षात राहतात.. आणि एका बेसावध क्षणी जशी ती माणसे निघून जातात आयुष्यात तसेच ते क्षण पण मागे पडतात.. अर्थात विसरता कधीच नाही येत पण हा पण ते रोजच्या जीवनाचा भाग व्हायचे कमी कमी होत जाते आणि एका दिवशी आपण वेगळ्या चिंता करायला लागलेले असतो.. आणि मग आयुष्यातच्या उतरतीला.. आपल्या नवऱ्याबरोबर चहाचा भुरका घेताना एका निवांत क्षणी येऊन एकदम त्या सगळ्या आठवणी युद्ध करायला लागतात.. हिशोब मांडायला लागतात.. आयुष्यात्च्या शेवटाला... चूक बरोबर याच्यापेक्षा काय करायचे राहून केले हेच जास्त सांगायला लागतात.. आणि मग डोळ्यात एक टपोरा थेंब येऊन आपलेच प्रतिबिंब दाखवतो.. मग लक्षात येते कि भविष्यासाठी असे आपण किती क्षणांना विसरलो आहोत.. , काही काही तर जगायचेच विसरून गेलो .. वातावरणात कशी शांतता पसरते.. तश्यातच चहाचा कपाचा चटका लागतो आणि मग आपण भानावर येतो... !

बार्टर

शांतता का हवी असते माणसाला .. चिंतन मनन करायला कि माणसापासून थोडा वेळ दूर जाऊन परिस्थितीचा विचार करायला .. खरच माणसाला शांतता का हवी असते ? असा विचार करताना जाणवले कि या प्रश्नाचे उत्तर शोधायला पण शांतता हवी आहे मला.. मजेदार आहे ना किती गोष्ट .. म्हणजे माणसाचा स्वभाव वेगवेगळा , त्याच्या मागण्या वेगळ्या , त्याची आजूबाजूची परिथिती वेगळी, पण काही काही गोष्टी जगातल्या प्रत्येक माणसामध्ये कश्या काय सारख्या असू शकतात ना ? असा विम्झीकल विचार करायला लागले कि काहीच सरळ अन साधे सोपे वाटत नाही.. प्रत्येक गोष्टीचा काहीतरी विचित्र अर्थ निघतो आणि प्रत्येक वेळी तो पटेल ,आवडेल किंवा समजेल असे पण नाही..तर शांतता हि गोष्ट म्हणजेच विचित्र आणि मिळायला खूप अवघड.. म्हणजे मारामारी ,महायुद्ध होते इतके महाकठीण आहे .. तरी माणूस प्रत्येक ठिकाणी ती शोधायचा प्रयत्न करतो.. त्याला अजून उमजले नसेल का कि ती तशी फार अवघड गोष्ट नाही आहे मिळवायला फक्त स्वतःहून मागायची गोष्ट आहे... म्हणजे शांतता हवी असेल तर ती शोधायची गरज नसते ती कायमच आपल्याबरोबर असते .. फक्त तिला मिळवताना आपण काही जवळचे गमवणार नाही ना .. याची काळजी प्रत्येक वेळेला घ्यावी लागते.. आणि माझे असेच होते.. नेहमी मी असे काहीतरी प्रयत्नपूर्वक ठरवते जे होऊ नाही द्यायचे पण कधीच नाही यश येत त्यामध्ये.. अगदी माझे असेच होते .. शांतता मिळवताना पण त्याच्या शोधात मी कुठे तर स्वतःच हरवून जाते असे सारखे वाटते आणि मग मला परत येता येत नाही.. रस्ताच सापडत नाही.. मी कुठेतरी दूर जाऊन पोचलेले असते.. अनोळखी प्रदेशात.. माणसे नवीन , जागा नवीन.. जुनी काय असेल तर ती फक्त मी न माझा भूतकाळ .. मग परत सुरु होते माझी लढाई .. आणि माझा अट्टाहास शांतता मिळवण्यासाठीचा ... पण त्यातून कधीच काही मिळत नाही मला.. नेहमी मला असे वाटते राहते कि मी शांततेसाठी बार्टर करत आहे... माझ्या माणसांबरोबर.. आणि शेवटी फारच तोटा करून घेते मी माझा .. आणि ती शांतता या विचारात कुठेतरी हरवून जाते.. आणि मग परत माझा जुनाच ठरलेला नवीन प्रवास सुरु होतो.. परत कुणाशीतरी बार्टर करायचे कुणाला तरी देऊन त्या शांततेसाठी.... !

पाऊस

मस्त पाऊस पडत आहे ....आणि मग अर्थातच डोक्यात पहिला विचार येतो कि मस्त चहा आणि भजी हाणावे आणि असेच लोळत पडून राहावे आजीच्या साडीच्या धुपाटे घेऊन .. पण अचानक लक्षात येते कि चहा आणि भजी करायला आई नाही आहे खायचेच असेल स्वतः उठून करावे लागणार आहे.. आणि मग पडून राहायचे तर लक्षात येते कि ते आजीवाले धुपाटे पण नाही आहे.. आपण कितीतरी हजारो मैल दूर आहोत यासगळ्या पासून... आणि अचानक तो मस्त वाटणारा पाऊस .. रडायला लागलाय कि काय असे वाटायला लागते .. आणि मग काय सगळे परत विचार चक्र सुरु होते कि आपण उच्चशिक्षण का घेतो तर प्रगती करण्यासाठी... आपल्या आई बाबांना खुश ठेवण्य्साठी.. आणि अर्थातच स्वतः पाहिलेली काही स्वप्न पूर्ण करण्यसाठी.. आणि मग थोड्या वर्षाने लक्षात यायला लागते.. सगळी स्वप्न तर डोळ्यासमोर होती.. मग आपण का आलो ते सगळे जग सोडून.. आणि नक्की काय मिळवले हे स्वप्न पूर्ण करून.. फक्त पैसे जास्त कमावणार .. पण खरच ते स्वप्न होते का कधी.. ?? तर नाही.. मस्त आई बाबांना समाधान द्यायचे होते.. किंवा त्यांच्या डोळ्यात ते बघायचे होते.. आणि मग आयुष्यभर त्यांनी सभाळले तसे त्यांना सभालता यावे एवढेच तर समर्थ व्हायचे होते.. मग या कमीत कमी मागण्या पेक्षा माझी स्वप्न मोठी होत गेली कळलेच नाही.. आणि मग मी माझ्यात चक्रात अडकले नाही का ? आणि आता परत फिरणे नाही.. जे ठरवून आले होते ते पूर्ण करावेच लागणार आहे.. आणि अचानक जाणीव झाली कि हे अदृश्य बंधने कधी आली माझ्यावर... जबाबदारी कधी पडली खाद्यावर.. सगळे कसे नकळत घडून गेले.. आणि मग जाणीव झाली कि मी आत मोठी झाली.. कॉलेज मध्ये असताना आई माझी कधी पाऊसात भिजायला नाही आली.. मी सारखे म्हणायचे तिला कि ये तर खर.. तुला काही मजा नाही करायला येत बघ.. पण आता ज्यावेळी मी भिजण्यापुर्वी आजारी पडण्याचा किंवा आजारी पडले तर डॉक्टर च्या बिलाची काळजी करते त्यावेळी माझी मी च मला किती मिस करते कसे सांगू.. ??? वयानुसार मी बदलणार .. परिस्तिथी बदलणार याची जाणीव न्हवती असे कधीच न्हवते.. ते कायमच माहित होते.. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि ते होतच राहणार .. ते कोणी चुकवू नाही शकत.. पण स्वतः लाच आरशात बघताना वाटते कि मी काय विचार करायचे आणि आता काय करायला लागले होते.. ज्यावेळी आई असाच विचार करायची त्यावेळी स्वतःला लाखवेळा बजावले होते कि काही झाले तरी स्वतः ला असे होऊ द्यायचे नाही.. पण माझ्याच नकळत मी कधी अशी झाले कळलेच नाही.. फक्त आनंद , निखळ क्षण सगळे सगळे मागे पडले.. राहिला फक्त नोकरी पैसा जबाबदारी .. चूक बरोबर गोष्टींचा हिशोब... आणि व्यवहार .. !

आवाज शांतता

घरात असेच एकटे बसले कि जाणवते कि आपल्या आजूबाजूला किती आवाज होत असतात सारखे .. आणि आपण त्यातले अर्धे आवाजांकडे लक्ष पण नाही देत.. पण ज्यावेळी घरी कोणी नसते आणि निरव शांतात पसरलेली असते .. त्यावेळी अचानक ते सगळे आवाज जाणवायला लागतात.. आणि मग एकदम वाटते कि आधी हे सगळे कधी का जाणवले न्हवते.. मग मी असाच विचार करत होते.. सकाळी उठल्यावर शेजार्याच्या घरी चालणारा रेडीओ, कुत्र्याचा भुंकणे , लहान बहिणीशी बडबड , बाबांचे फोन वर बोलणे आणि मग आईची स्वयपाकघरात चाललेली गडबड तिला पण एक विशिष्ट्य असा आवाज असतो .. आज अशीच मी एकटी घरी बसलेली .. काही करायला नाही आणि अचानक मी कधीही न ऐकणारे हे सगळे आवाज आज आठवत आहे .. आणि विचार करत आहे कि हे सगळे आवाज असताना मी कधी लक्ष नाही देत पण नसताना असे हे त्रास का देतात आठवून .. काही काळात न्हवते.. मग मला लक्षात आले कि ते आवाज नसतात जे आपण आठवत असतो .. तर ते आवाज करणाऱ्या माणसांना आपण स्मरत असतो.. त्यांचे आपल्याबरोबर असणे त्यांनी आपल्या आजूबाजूला असणे या सगळ्या गोष्टी आपण आठवत असतो .. कारण यातला प्रत्येक आवाज काढणारा एक माणूस आहे .. ज्याच्याशी आपण जुळलेलो असतो .. आणि मग ते सगळे प्रसंग डोळ्यासमोर येऊ लागतात ..मग एक वेळ अशी येते ज्यावेळी आपण फक्त त्या आवाजाबरोबर बर्याच गोष्टी डोक्यात यायला लागतात..
तसेच काहीसे मनसे असताना पण होत असेल का ? म्हणजे आपण माणसात आहोत पण एखादा माणूस असे काही वागतो कि आपल्याला त्याच्या मुले कुणाची तरी आठवण येते.. आणि मग जवळ असलेला माणूस आपण विसरून जातो काही क्षणासाठी का होईना..मग त्या जगातून या जगात परत येताना आपण तो आवाज मनात ठेवतो.. असाच तो आवाज माणसाची ओळख असते आपल्या मनात कोरलेली.. आपण ते कधीच ठरून करत नाही .. ते आपोआप होऊन जाते.. काही काही रहस्य उलगडता येत नाहीत हेच खर.. तसेच एखाद्या माणसाचे अस्तित्व आपल्याबरोबर असणे म्हणजे खरच कधी कधी न उलगडणारे सत्य आहे तर कधी कधी विचार करायची गोष्ट च नाही आहे .. ती अनुभवायची गोष्ट आहे .. मनापासून जगायची गोष्ट आहे .. आणि अशी माणसे आयुष्यात आहेत यासाठी खुश होण्याची गोष्ट आहे..

दृश्य - अदृश्य

ताल सिनेमा बघत होते .. बर्याच दिवसांनी .. तसा मला तो अक्षय खन्नाचे पात्र खूप आवडते .. वास्तवात असे कोणी असणे जरा अवघड आहे.. पण त्यांना छान वाटवले आहे ...अभिनय पण छान केला आहे .. पण तो मुद्दा नाहीच आहे.. असाच विचार करत होते .. ताल मधल्या एका गाण्यात शहीद कपूर आहे .. म्हणजे काही सेकंद साठीच आहे .. पण आहे.. अर्थात हे कळले कधी ज्यावेळी शहीद कपूर मोठा नट बनला.. म्हणजे काय काही काळासाठी तो अदृश्य होता आणि एका वेळेला अचानक दृश्य झाला .. जर तो नुसता असाच डान्सर राहिला असता तर कोणी त्याकडे लक्ष पण दिले नसते .. आपल्या आयुष्यात पण असे होत असेल ना.. म्हणजे कधी कधी अदृश्य असणारी .. बरीच माणसे किवा नाती .. जी कधी काळी अदृश्य होती किंवा आता अदृश्य आहेत.. आणि नंतर दृश्य झाली .. आता माझी रूममेट आहे ती आणि मी ३१ डिंसेबर २००७ ला एकाच वेळी एका ठिकाणी होतो .. पुण्याच्या जे एम रोड वर .. पण त्यावेळी आम्ही एकमेकांना ओळखत पण न्हवतो .. एकमेकांना पास झालो असलो तर ते पण नाही माहित.. आणि नंतर भेटलो हजारो मैल दूर आणि जिवाभावाच्या मैत्रिणी झालो .. पण आता विचार केल्याशिवाय राहवत नाही कि त्यावेळी भेटलो असतो तर काय वेगळे झाले असते.. कदाचित आम्ही कधीच इकडे येऊन चांगल्या मैत्रिणी झालो नसतो किंवा अजून चांगल्या मैत्रिणी झालो असतो.. ! अर्थात तो प्रश्न कायम अनुउत्तरीत राहिल, नाही का ?
मग अर्थात अजून एक विचार आला कि उलटी प्रोसेस होते का ? तर नाही कधीच नाही होत ... कारण एकदा दृश्य झालेली व्यक्ती कधीच परत अदृश्य करता येत नाहीत .. ती व्यक्ती /नाते संपले किंवा निघून गेलीतरी ते नाते कधीच अदृश्य नाही होत.. आठवणी असतात .. आयुष्यातला कुठला ना कुठला भाग त्या माणसाची जोडला गेलेला असतो .. आणि त्यातले काही भाग आनंद देणारे असतात काही चांगल्या वेळाची आठवण करून देणारे असतात.. तर काही असेच डोळ्यात पाणी आणणारे .. पण म्हणून कोणी थांबत नाही ना.. सगळीजण नेहमीच अशीच रोज अदृश्य माणसांना दृश्य करायचा प्रयत्न करत असतात.. तोच तर माणसाचा स्वभाव आहे .. आणि कितीही चांगले वाईट अनुभव आले तरी माणूस काही थांबणार नाही आहे .. हे कायम असेच चालू राहील .. अविरतपणे.. !