Saturday, April 9, 2011

निर्णय

कधी कधी नसतेच कुणाला कुणाशी बोलायचे.. कधी कधी कुणाला नसतेच कधी जबाबदारी घ्यायची .. कधी कधी कुणाला नसतेच करायचे बरोबर आहे ते.. कधी कधी कुणाला असतेच सवय चूक करून शिकायची .. कधी कधी कुणाला असतेच भीती छोट्या छोट्या गोष्टींची .. कधी कधी असतेच कुणाला कुणी नसायची सवय .. कधी कधी वाटतेच एकटे रहावेसे असे.. कधी कधी कुणाला जमतच नाही जे अगदी सहज जमणाऱ्या गोष्टी . .. कधी कधी नसतेच कुणाला विसरायचे .. कधी कधी वाटतेच कुणाला असू नयेत काही गोष्टी आयुष्यात .. त्याची काही कारणे नसतात .. पण ते 'च' मात्र असते.. का कुणास माहित .. वाटतच असतात अश्या गोष्टी..
आपल्या आजूबाजूला अश्या कितीतरी गोष्टी होत असतात .. ज्याच्या वर आपण विचार करत असतो आणि आपले एक मत देत असतो किंवा मनात तर नोंदवलेले असे मत असतेच.. काही काही गोष्टींबद्दल च्या मताला काही अर्थ नसतो तर काही काही गोष्टींबद्दल चे मत चुकीचे असण्याची जास्त शक्यता असते.. कधी कधी मते बदलत जातात जसे अनुभव येत जातात.. काही गोष्टी नीट दिसायला लागतात, समजायला लागतात .. तसे मतं ठाम बनत जातात .. बदलत जातात .. माणूस आपल्याला अनुभवावरून काहीतरी आपली मते बनवत जात असतो .. सगळे काही त्याला आलेले अनुभव नसतात.. काही पाहिलेले, ऐकलेले .. नकळत मनावर झालेले .. असे बरेच काही गोष्टी असतात .. पण बरीचशी मते बदलण्यासाठीच असतात कदाचित.. जसे वय वाढत जाईल , जास्त वेगवेगळे अनुभव येत जातील.. काही काही गोष्टी स्वतः बद्दल पण कळायला लागतात.. सगळ्या गोष्टी चांगल्या असतीलच असे नाही पण काही गोष्टी खूप त्रासदायक पण असतात ... कधी कधी विश्वासच बसत नाही कि आपण असे कधी वागलो होतो याचा विचार करून.. तर कधी कधी वाटत राहते आपण इतके मूर्ख कसे काय होतो .. असे पण काही विचित्र जाणीवा असतात .. आपल्याविषयी चे मत म्हणू शकतो आपण ते.. ते पण सारखे बदलत असते.. अर्ध्या वेळेला माहित पण नसते कि काय मत असले पाहिजे.. आयुष्यात आपण हजारो निर्णय घेत असतो.. त्यातले काही चुकीचे असतात काही बरोबर असतात काही आयुष्य बदलून टाकणारे, काही आयुष्य सावरणारे .. काही आयुष्य उध्वस्त करणारे... पण काही काही निर्णय घ्यावे लागतात .. वेळ आली असावी म्हणून किंवा अति झाले म्हणून .. काही निर्णय आपणच लादतो आपल्यावर .. माहित नाही का पण कुठलाही निर्णय घ्यायचा म्हणजे हृद्य आणि डोक कधीही एका बाजूने नसतात .. अगदी तो कसलाही निर्णय असुदेत..
म्हणतात ना टॅास करताना जसे नाणे हवेत फेकले जाते त्या क्षणी माहित असते कि आपल्याला काय हवे आहे .. तसेच काहीसे असते काही निर्णयांचे .. एका क्षणी तुम्हाला जाणीव होते कि आता कुठे पाऊल उचलले पाहिजे.. प्रत्येक वेळी काही चांगले निर्णय नसतात पण ते घ्यावे लागतात.. त्यांच्या बरोबर जगावे लागते आयुष्यभर .. आणि मग वाट बघणे .. एवढेच राहते हातात .. घेतलेले निर्णय किती बरोबर होते आणि चूक होते हे जाणून घेण्यासाठी वाट बघायची... वेळ पण खूप विचित्र गोष्ट आहे .. म्हणूनच कदाचित त्याला 4th dimension म्हणत असतील का ? म्हणजे कसे त्याचे परिमाणच वेगळे असतात नेहमी .. कुठल्याच गणितात न बसणारे..
बस मधून जाताना तुम्ही डोळे मिटून २ मिनिट विचार करायला लागता आणि मग ते असे सगळे घेतलेले निर्णय यायला लागतात डोळ्यासमोर.. घडलेल्या चुका.. त्यातून शिकलेले अनुभव .. खूप साऱ्या आठवणी .. अश्या खूप साऱ्या गोष्टी .. ज्या आपण कुठेतरी आत लपवून ठेवलेले असते.. असे काय असते त्या २ मिनिटाच्या डोळे मिटन्यामध्ये माहित नाही.. पण बाकीचे सगळे आवाज बंद होऊन जातात आणि कुठल्यातरी दुसऱ्या दुनियेत गेल्यासारखे वाटते. आणि डोळे उघडले कि काहीच बदलेले नसते... काही चुकीचे निर्णय .. काही चांगल्या गोष्टी .. काही जिवाभावाची माणसे.. काही रस्त्यामध्ये सुटलेली माणसे.. काही बदलेले चेहरे.. काही बदलेली नाती .. सगळे कसे तेच असते.. काही बदलेले नसते..
मग कधी कधी नसतोच कुणाला विचार करायचा भविष्याचा... कधी कधी नसतेच जगाचे भूतकाळामध्ये कुणाला .. कधी कधी असतेच कुणाला सवय चुकीचे निर्णय घ्यायची.. कधी कधी असतेच चुका करायची सवय .. कधी कधी असतेच कुणाला ..... !

No comments:

Post a Comment