रात्रीचे ३ वाजलेले असतात .. कितीदा हि कुशी बदलून पहिले तरी काही झोप येत नसते... डोक्यात खूप काही विचार चालू असतात.. बरेचसे चांगले नसतात.. डोक्यातले विचार घालवण्यासाठी तुम्ही उठून पाणी पिता, मोबाईल चेक करता उगीचच इतक्या रात्री कोण फोन किंवा मेसेज करणार आहे ... ?? त्यानंतर तुम्ही परत काही वेळ झोपायचा प्रयत्न करता ... काही उपयोग होत नाही .. आणि मग अचानक आई ला फोन लावतो.. तिचा दिवस असतो ... त्यामुळे ती काही बाही कामे करत असते.. फोन केल्यावर हेल्लो म्हणायच्या ऐवजी ती विचारते झोपली नाहीस का अजून ? किती वाजले ?? मी म्हणते काही नाही ग.. असाच झोप येत नव्हती.. मग ती इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगायला लागते.. पण आपण त्यातले काही ऐकत पण नसतो.. नुसतेच हो हो म्हणत असतो.. अन मग कंटाळून आईला म्हणतो कि ठीक आहे चल मी ठेवते फोन .. झोपते.. नेमके फोन ठेवता ठेवता आई म्हणते कि काळजी करू नकोस होईल सगळे व्यवस्थित, नको इतकी काळजी करूस... ! अन मग फोन समाधानाने ठेवत आपण झोपून जातो.. एकही कुशी न बदलता.. कसे जमते आई ला ते ?? कसे कळते तिला कि exact कुठले शब्द ऐकायचे आहेत आपल्याला.. !
संध्याकाळी ऑफिस मधून घरी आल्या आल्या .. येऊन टेबल वर बसलेली मी.. चहा प्यायची इच्छा आहे पण बनवायची नाही आहे .. म्हणून तशीच मी बसलेली.. तेवढ्यात रुममेट येते.. आणि म्हणते चल मी मस्त चहा करते प्यायचा आहे का तुला.. ? मी आपल्याच विचारात मग्न काही बोलतच नाही... १० मिनिटाने ती चहाचा कप ठेवते अन जाते निघून तिच्या रूम मध्ये.. थोड्या वेळाने ती परत येते मी आपली तिथेच बसलेली .. ती येते अन म्हणते चल बाहेर जाऊयात कुठेतरी .. मी काही न बोलता बाहेर पडते तिच्याबरोबर.. पूर्ण वेळ आम्ही काहीही बोलत नाही .. घरी आल्यावर एकमेंकींना गुड नाईट करतो अन जायला लागतो आपआपल्या रूम मध्ये.. जाताना हक मारून रुममेट म्हणते.. "dont worry you'll be fine.. " अन अचानक जग परत नॉरमल वाटायला लागते.. कधी अनोळखी असणारी रुममेट जिवाभावाची मैत्रीण होऊन जाते.. अनोळखी देशात ती कधी आपली family होऊन जाते.. तिला कसे कळते कधी शांत बसले पाहिजे आणि मी काय विचार करत आहे हे न सांगता तिला कसे कळते... !
साधारण ७-८ महिने झालेले असतात तुम्हाला बोलून.. पण कधी काळी ज्यावेळी फक्त कॉलेज आणि परीक्षा याच नको असलेल्या गोष्टी होत्या .. अश्या काळातला तुमचा खूप चांगला मित्र.. पण नंतर करिअर च्या मागे लागल्यावर कुठेतरी मागे पडलेला मित्र.. असाच कुठल्यातरी निवांत रविवारी आठवण येते त्या सगळ्या जुन्या दिवसांची आणि मग आपण फोन हातात घेतो .. फोन लागतो.. हेल्लो म्हटल्या म्हटल्या तो तुमचा आवाज ओळखतो .. आणि इतका खुश होतो कि वाटतात कि ते सोनेरी दिवस परत आले आहेत.. त्याच्याशी बोलायला काही उरलेले तर नसते.. पण इतके दिवस कुठे होतास विचारण्याऐवजी तो जिथे सोडले होते तिथून उचलल्यासारखे बोलायला लागतो.. अन सगळे अंतर गळून पडते .. तुम्ही तसेच जुने मित्र बनून जाता परत एकदा.. कॉलेज च्या कट्ट्यावर दंग करणारे.. तिथे का हेवेदावे, अहंकार मधे येत नाही.. कडू आठवणी ऐवजी आपण चांगल्या आणि मनाच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या आठवणी का बोलायला लागतो .. अचानक.. सगळे समज गैरसमज कसे काय गळून पडतात ?? वर्तमान बद्दल काही माहिती नसले तरी भूतकाळ कसे काय इतके जोडून ठेवतो .. !
गाडी पंक्चर झालेली असते म्हणून तुम्ही एखाद्या दिवशी ट्रेनने जात असता .. अचानक ऑफिस मधला नेहमी कॉर्रीडोर मध्ये किंवा एलीवेटर किंवा लंच रूम मध्ये दिसणारा माणूस दिसतो.. तुम्ही त्याला हजारदा पाहिलेले असते पण कधी बोललेलो नसतो फक्त कधीतरी हसून निघून गेलेला असता.. अचानक त्याला बघून तुम्ही हसता.. अन मग तो बोलायला सुरु करतो काही बाही .. नावांची देवाण घेवाण होते.. ऑफिस मध्ये पोचेपर्यंत तुम्ही बोलत राहता .. आणि तुमचा स्टेशन येते .. उतरता उतरता तुम्ही म्हणता त्याला कि चल भेटू परत अन तो तुम्हाला सांगतो नाही आज माझा शेवटचा दिवस आहे .. आणि अचानक तुम्हाला त्याचे वाईट वाटते.. ज्याचे इतके दिवस नाव पण माहित नव्हते आणि तुम्ही कधी बोलला पण नव्हता .. तर त्याच्या जाण्याचे दुःख का असावे मला ? असे नुसते रोज हसून आणि काही न बोलता नाती कशी जोडली जातात .. आणि त्या माणसाला जाणून घ्यायची इच्छा का निर्माण होत राहते ?? येता जाता दिसणारा तो अनोळखी माणूस कधी तुमच्या आयुष्याचा भाग होतो ते तुम्हाला कळत पण नाही . आणि तुम्ही स्वतःवरच चिडता कि का इतके दिवस आपण कधी बोललो नाही त्याच्याशी .. पण असले प्रश्न नेहमीच अनुत्तरीत राहतात नाही का .. !
माणसाला रुटीनचे व्यसन असते .. एखादी गोष्ट नीट झाली नाही तर पुरा दिवस काहीतरी चुकल्यासारखे असे वाटण्यात जातो .. मग आई- बाबांबरोबर राहताना कधी न जाणवलेले आई चे अस्तित्व अचानक रुटीन मध्ये कुठे येते, कॉलेज मध्ये असताना रुटीनचा भाग असलेला जिवाभावाचा मित्र कधी रुटीनच्या बाहेर पडून भूतकाळ होतो, रुममेट म्हणत असताना रुटीन मध्ये कधी family होते कळत नाही ... तसेच काहीसे रुटीन जरा बदलेले कि नकळत घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी अचानक समजायला जाणवायला लागतात .. पण आपण फक्त परत त्या रुटीनलाच धरून चालायला लागतो .. नाही का ???
एक नंबर, मॅगी.
ReplyDelete