Saturday, January 22, 2011

मांजर

मी खूप लहान असतांना बालसुलभ हट्ट करून आमच्याकडे एक पोपट आणला होता. त्याला काहीबाही बोलायला शिकवण्याचाही प्रयत्न केला. दुर्दैवाने त्याने महिन्याभरातच मान टाकली. (त्याची कबर अजून आमच्या जुन्या वाड्यात आहे. त्या प्रसंगापासून मी कुठलाही प्राणी आपण होऊन पाळण्याचा प्रयत्न केला नाही. कारण भीती- ’पुन्हा पोपट व्हायचा.’

मात्र एक प्राणी नंतर मजेशीररित्या पाळला गेला. मांजर. हीचे नावच होते ’मांजर!’ किटी वगैरे भानगड नाही. (हे नाव आता इतके अंगवळणी पडले आहे की दुसर्‍या कोणत्याही मांजराला ’मांजर’ म्हणावे वाटत नाही.) तर हे असे मांजर आम्ही पाळले आहे, हा दावा आमच्या कॉलनीतले किमान दहा कुटुंब करू शकतात. या मांजराचे निरीक्षण करता करता मला कधी हा प्राणी आवडू लागला, ते कळलेच नाही. यापुढील वर्णन माझ्या मांजराचे असले, तरी ते सर्व मांजरांना सारखेच लागू पडत असावे, असा माझा कयास आहे.
आमच्या या प्राण्याचे एकंदर व्यक्तिमत्व हे घरातल्या एखाद्या बिघडलेल्या मुलीसारखे असते. केव्हाही वेळीअवेळी घरात येणार. घरातली यच्चयावत माणसे आपल्याकडे पाहत आहेत याची पूर्ण जाणीव असूनसुद्धा खुशाल दुर्लक्ष करून आपल्या आवडत्या जागेवर जाऊन बसणार. दिवसातून दहा वेळा आपले अंग चाटुनपुसून साफ करणार. गल्लीतल्या उनाड बोक्यांना विनाकारण नादी लावणार इत्यादि. सकाळी आणि संध्याकाळी बरोबर चहाची वेळ झाली, म्हणजे मांजर अंगाला आळोखेपिळोखे देत घरात हजर. त्यानंतर जो कुणी उभा असेल, किंवा खुर्चीवर बसला असेल त्याच्या पायाशी लाडीक चाळे, मधूनच एखादे मंजूळ "म्यांव" वगैरे. ही सगळी लाडीगोडी दुधासाठी आहे, हे आपल्याला कळत असूनही आपण उगाच त्याच्या डोक्यावर हात फिरवायचा. कारण एवढी एकच वेळ असते जेव्हा मांजर निवांतपणे आपल्याला डोक्यावर हात फिरवू देते. (मांजराचे डोके विलक्षण मऊ असते.) एकदा आईने दुधाची ताटली पुढे केली, की त्याचा आपला संबंध संपला. नंतर डोळे मिटून दुधावर ताव मारायचा, एकदा मस्तपैकी मिशीवर जीभ फिरवायची आणि मजेत चालू लागायचे. पोट भरलेल्या मांजराचे लाड करणे केवळ अशक्य. तुम्ही तिच्या नुसते जवळ गेलात तरी 'Mind your own business' असा एक तुच्छ कटाक्ष टाकून मांजर चालू पडते.

खरं तर अजून एक दुसरी वेळ असते. हिवाळ्याच्या दिवसात सकाळी आठ वाजता ’गोव्याच्या बीचवर सनबाथ घेत पहुडलेल्या विदेशी ललनेप्रमाणे’ मांजर घराच्या मागच्या ओट्यावर ऊन खात बसलेली असते. अशा वेळी मांजर आपल्या अंगाचे असे काही मुटकुळे करते की तिचा एकही पंजा बाहेर दिसत नाही. आपण तिच्याजवळ जायचे. तिला हे फारसे पसंत पडत नाही, पण उठून दुसरीकडे जाण्याचा अंमळ कंटाळा आल्याने ती आपल्याला हात लावू देते. आपण डोक्यावर हात फिरवावा. ती डोळे बंद करते. आपण मानेवर, पाठीवर हात फिरवल्यावर ती कंठातून ’गर्रर्रर्र....’ असा काहीसा आवाज काढते. हा आवाज पसंतादर्शक असतो की नापसंतीदर्शक, ते मला आजवर कळलेले नाही. थोड्या वेळाने मांजरालाही आपला उबदार हात आवडू लागतो. मग मांजर उगाच मान तिरपी करून "आता इकडे जरा खाजव, कानाच्या मागे.. आता जरा गळ्याला.." असे सिग्नल्स देते. आपल्याला न्हावी असल्याचे फिलींग येऊ लागते.

मांजर प्रचंड स्वार्थी प्राणी आहे. एकदम कामापुरता मामा. पण एवढ्या एकाच गोष्टीसाठी मला मांजर फार आवडते ! मांजर आपल्या नैसर्गिक प्रेरणांशी प्रामाणिक असते. त्याने आपली Dignity सोडलेली नाही. कुत्रा जसा माणसाच्या आहारी गेला आहे, तसे मांजर गेलेले नाही. कुत्र्याच्या डोळ्यात असंख्य वेळा दिसतात, तसे आशाळभूत भाव मांजराच्या डोळ्यात मला कधीच दिसलेले नाहीत. खरं तर मराठी भाषेत ’आशाळभूत’ हा शब्द आपले अस्तित्व टिकवून आहे, तो केवळ ’कुत्रा’ या प्राण्यामुळे !
मांजराने रस्त्यात येणे अशुभ मानले जाते. पण मांजराला जीवे मारले तर फार मोठे पाप लागते, अशी समजूत आहे. खरं तर मांजराचा कुठल्याही देवाकडे वशीला नाही. मांजर कुठल्या देवाचे वाहन नाही. पुराणकथांमधे त्याचे फार उल्लेख नाहीत. तरीही मांजराला मारण्याचा आपल्याकडे इतका बाऊ का करतात, हे मला अजून कळलेले नाही.

कारण काहीही असो, मांजराला मारता येत नाही हे किती चांगले आहे; नाही?

Thursday, January 20, 2011

रुटीनचे व्यसन

रात्रीचे ३ वाजलेले असतात .. कितीदा हि कुशी बदलून पहिले तरी काही झोप येत नसते... डोक्यात खूप काही विचार चालू असतात.. बरेचसे चांगले नसतात.. डोक्यातले विचार घालवण्यासाठी तुम्ही उठून पाणी पिता, मोबाईल चेक करता उगीचच इतक्या रात्री कोण फोन किंवा मेसेज करणार आहे ... ?? त्यानंतर तुम्ही परत काही वेळ झोपायचा प्रयत्न करता ... काही उपयोग होत नाही .. आणि मग अचानक आई ला फोन लावतो.. तिचा दिवस असतो ... त्यामुळे ती काही बाही कामे करत असते.. फोन केल्यावर हेल्लो म्हणायच्या ऐवजी ती विचारते झोपली नाहीस का अजून ? किती वाजले ?? मी म्हणते काही नाही ग.. असाच झोप येत नव्हती.. मग ती इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगायला लागते.. पण आपण त्यातले काही ऐकत पण नसतो.. नुसतेच हो हो म्हणत असतो.. अन मग कंटाळून आईला म्हणतो कि ठीक आहे चल मी ठेवते फोन .. झोपते.. नेमके फोन ठेवता ठेवता आई म्हणते कि काळजी करू नकोस होईल सगळे व्यवस्थित, नको इतकी काळजी करूस... ! अन मग फोन समाधानाने ठेवत आपण झोपून जातो.. एकही कुशी न बदलता.. कसे जमते आई ला ते ?? कसे कळते तिला कि exact कुठले शब्द ऐकायचे आहेत आपल्याला.. !
संध्याकाळी ऑफिस मधून घरी आल्या आल्या .. येऊन टेबल वर बसलेली मी.. चहा प्यायची इच्छा आहे पण बनवायची नाही आहे .. म्हणून तशीच मी बसलेली.. तेवढ्यात रुममेट येते.. आणि म्हणते चल मी मस्त चहा करते प्यायचा आहे का तुला.. ? मी आपल्याच विचारात मग्न काही बोलतच नाही... १० मिनिटाने ती चहाचा कप ठेवते अन जाते निघून तिच्या रूम मध्ये.. थोड्या वेळाने ती परत येते मी आपली तिथेच बसलेली .. ती येते अन म्हणते चल बाहेर जाऊयात कुठेतरी .. मी काही न बोलता बाहेर पडते तिच्याबरोबर.. पूर्ण वेळ आम्ही काहीही बोलत नाही .. घरी आल्यावर एकमेंकींना गुड नाईट करतो अन जायला लागतो आपआपल्या रूम मध्ये.. जाताना हक मारून रुममेट म्हणते.. "dont worry you'll be fine.. " अन अचानक जग परत नॉरमल वाटायला लागते.. कधी अनोळखी असणारी रुममेट जिवाभावाची मैत्रीण होऊन जाते.. अनोळखी देशात ती कधी आपली family होऊन जाते.. तिला कसे कळते कधी शांत बसले पाहिजे आणि मी काय विचार करत आहे हे न सांगता तिला कसे कळते... !
साधारण ७-८ महिने झालेले असतात तुम्हाला बोलून.. पण कधी काळी ज्यावेळी फक्त कॉलेज आणि परीक्षा याच नको असलेल्या गोष्टी होत्या .. अश्या काळातला तुमचा खूप चांगला मित्र.. पण नंतर करिअर च्या मागे लागल्यावर कुठेतरी मागे पडलेला मित्र.. असाच कुठल्यातरी निवांत रविवारी आठवण येते त्या सगळ्या जुन्या दिवसांची आणि मग आपण फोन हातात घेतो .. फोन लागतो.. हेल्लो म्हटल्या म्हटल्या तो तुमचा आवाज ओळखतो .. आणि इतका खुश होतो कि वाटतात कि ते सोनेरी दिवस परत आले आहेत.. त्याच्याशी बोलायला काही उरलेले तर नसते.. पण इतके दिवस कुठे होतास विचारण्याऐवजी तो जिथे सोडले होते तिथून उचलल्यासारखे बोलायला लागतो.. अन सगळे अंतर गळून पडते .. तुम्ही तसेच जुने मित्र बनून जाता परत एकदा.. कॉलेज च्या कट्ट्यावर दंग करणारे.. तिथे का हेवेदावे, अहंकार मधे येत नाही.. कडू आठवणी ऐवजी आपण चांगल्या आणि मनाच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या आठवणी का बोलायला लागतो .. अचानक.. सगळे समज गैरसमज कसे काय गळून पडतात ?? वर्तमान बद्दल काही माहिती नसले तरी भूतकाळ कसे काय इतके जोडून ठेवतो .. !
गाडी पंक्चर झालेली असते म्हणून तुम्ही एखाद्या दिवशी ट्रेनने जात असता .. अचानक ऑफिस मधला नेहमी कॉर्रीडोर मध्ये किंवा एलीवेटर किंवा लंच रूम मध्ये दिसणारा माणूस दिसतो.. तुम्ही त्याला हजारदा पाहिलेले असते पण कधी बोललेलो नसतो फक्त कधीतरी हसून निघून गेलेला असता.. अचानक त्याला बघून तुम्ही हसता.. अन मग तो बोलायला सुरु करतो काही बाही .. नावांची देवाण घेवाण होते.. ऑफिस मध्ये पोचेपर्यंत तुम्ही बोलत राहता .. आणि तुमचा स्टेशन येते .. उतरता उतरता तुम्ही म्हणता त्याला कि चल भेटू परत अन तो तुम्हाला सांगतो नाही आज माझा शेवटचा दिवस आहे .. आणि अचानक तुम्हाला त्याचे वाईट वाटते.. ज्याचे इतके दिवस नाव पण माहित नव्हते आणि तुम्ही कधी बोलला पण नव्हता .. तर त्याच्या जाण्याचे दुःख का असावे मला ? असे नुसते रोज हसून आणि काही न बोलता नाती कशी जोडली जातात .. आणि त्या माणसाला जाणून घ्यायची इच्छा का निर्माण होत राहते ?? येता जाता दिसणारा तो अनोळखी माणूस कधी तुमच्या आयुष्याचा भाग होतो ते तुम्हाला कळत पण नाही . आणि तुम्ही स्वतःवरच चिडता कि का इतके दिवस आपण कधी बोललो नाही त्याच्याशी .. पण असले प्रश्न नेहमीच अनुत्तरीत राहतात नाही का .. !
माणसाला रुटीनचे व्यसन असते .. एखादी गोष्ट नीट झाली नाही तर पुरा दिवस काहीतरी चुकल्यासारखे असे वाटण्यात जातो .. मग आई- बाबांबरोबर राहताना कधी न जाणवलेले आई चे अस्तित्व अचानक रुटीन मध्ये कुठे येते, कॉलेज मध्ये असताना रुटीनचा भाग असलेला जिवाभावाचा मित्र कधी रुटीनच्या बाहेर पडून भूतकाळ होतो, रुममेट म्हणत असताना रुटीन मध्ये कधी family होते कळत नाही ... तसेच काहीसे रुटीन जरा बदलेले कि नकळत घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी अचानक समजायला जाणवायला लागतात .. पण आपण फक्त परत त्या रुटीनलाच धरून चालायला लागतो .. नाही का ???

Saturday, January 15, 2011

रूममेट !

सकाळचे साडेसात.

तू आपल्या बेडवर अजगरासारखा अस्ताव्यस्त पसरलेला आहेस.
ओठाच्या कोपर्‍यातून ओघळलेला मुखरस तुझी कळकट्ट उशी भिजवतो आहे. हेही तसे रोजचेच.
गेल्या काही शतकांत साबणाचा स्पर्शही न झालेला तुझा टॉवेल अर्धा बेडवर, अर्धा जमिनीवर असा लोळतोय.

गेली तीन वर्षे सातत्याने हेच दृष्य मला सकाळी उठल्यावर दिसते आहे. त्याला कारणही आहे म्हणा.
तुझी सातत्याने नाईट शिफ्ट, आणि माझी सकाळची. मी निघण्याच्या तासभर आधीच तर तू येऊन झोपलेला असतोस ! संध्याकाळी मी रूमवर येतो, तेव्हा तू जेवायला मेसवर आणि तिकडून परस्पर कामावर. आपण दोघेही जागृतावस्थेत असे रविवारीच थोडेफार येतो एकमेकांच्या वाट्याला. तेही, मी ट्रेकवर आणि तू तुझ्या मैत्रीणीच्या गावाकडे गेलेला नसशील तर !

तीन वर्षे झालीत मला या रूमवर येऊन. माझ्या आधीपासून तू इथे राहतोस. माझ्या आधी जो इथे रहात होता, त्याच्याही आधीपासून तू इथेच आहेस असे कळले. या रूमच्या रंगहीन, जुनाट भिंतीइतकाच तूसुद्धा या रूमचा अविभाज्य भाग असावास, असे मला कायम वाटत आले आहे. घरमालकही तुझ्यावर कधी गुरकावतांना दिसत नाही. तुझ्या निर्ढावलेपणाला तोसुद्धा सरावला असावा.
आज मात्र मला तुझी चीड येत नाहीये. मला आठवताहेत, ते या रूममधले माझे सुरूवातीचे दिवस. नव्या जॉबची नवलाई, नवी स्वप्ने घेऊन माझा या नव्या शहरातला पहिला प्रवेश. आणि एका दूssssरच्या नातेवाईकाने एका स्वस्तातल्या इस्टेट एजंटकरवी मला मिळवून दिलेली ही रूम. (मी त्याच्याकडे मुक्काम टाकेन की काय अशी भीती असावी बिचार्‍याला !) त्यादिवशीसुद्धा झालेले तुझे पहिले दर्शन फारसे सुखावह नव्हते. सावळा, लुकडा आणि सर्वसामान्य किंवा कुरूपात जमा होणारा आपला देह घेऊन दुपारी केव्हातरी अंघोळ करून तू आपल्या अडीच इंच व्यासाच्या आरशात बघत दाढी कोरत होतास. निव्वळ साबण चोपडलेले तुझे गालफड खर्र खर्र असा त्रासदायक आवाज करत होते. रूमभर एक कुबट वास भरून राहिलेला होता, आणि कचरासुद्धा. नंतर मला त्याची सवय झाली, हा भाग अलाहिदा !

तू शब्दश: नि:संग आहेस.
तुला कपड्यांचा साबण विकत घेतांना मी कधी पाहिलेले नाही. माझा कपड्यांचा साबण तरी वापरत असशील, अशी एक वेडी आशा माझ्या मनात आहे.
अंघोळीचा साबण मात्र घेतोस विकत ! गोदरेज नंबर वन. तो बहुधा दाढीमुळे आवश्यक असावा.
तुझी टूथपेस्ट ही द्रौपदीच्या थाळीसारखी असते. संपता संपत नाही.
तुझे मोजून तीन ड्रेस दिसतात मला. आणि एक चौथा आहे, पण तो फक्त मैत्रिणीला भेटायला जातांना घालत असतोस.
याशिवाय तुझ्याकडे एक चप्पल, एक ऍक्शनच्या स्पोर्ट शू ची पेअर, एक सोलापुरी चादर, एक ’रंग ओळखा’ टॉवेल, तेल, कंगवा, आणि एक पुस्तकांनी भरलेली ट्रंक एवढी जंगम मालमत्ता आहे. त्यातली पुस्तके कोणीही पाहिलेली नाहीत. मीसुद्धा.

एकंदर आर्थिकदृष्ट्या तुझे फारसे बरे चाललेले दिसत नाही. तुला चहाशिवाय अन्य जिन्नस हॉटेलात किंवा टपरीवर घेतांना कोणी पाहिलेले नाही. तू स्वत:बद्दल फार कमी बोलतोस. किंवा एकूणातच घुम्या आहेस. तुझे माझे फारसे जमणार नाही, असे मला आधी वाटले होते. दुर्दैवाने माझा हा तर्क पडताळून पाहण्याइतकाही आपला सहवास कधी घडला नाही. तीन वर्षात आपण फक्त तीन वेळा सोबत हॉटेलात जेवलो. (ते तीनही माझे वाढदिवस होते !) हॉटेलात माझ्या मित्रांशीही तू कामाशिवाय एक शब्द बोलला नाहीस.
याशिवाय एक सिनेमा पाहिला, जो अति टुकार असल्याने आपण इंटरव्हलमधून बाहेर पडलो, आणि माझ्या बाईकवर शहरभर भटकत राहिलो. तुला त्या दिवशी पहिल्यांदा आणि शेवटचेच आनंदात पाहिले मी ! तुझ्या एरवीच्या निर्विकारशा सामान्य चेहर्‍यावर ’आनंद’ ही भावना मोठी देखणी दिसत होती. (आदल्या दिवशी नक्कीच तुझ्या मैत्रिणीने काही आनंददायक सांगीतले असावे, असा तर्क मी केला.) त्या दिवशी रात्री दीड वाजता तुला कॉफी पिण्याची लहर आली चक्क ! मग आपण रेल्वे स्टेशनवरच्या ’कमसम’ मधे जाऊन बसलो, पहाटे चारपर्यंत. तिथे तू मला तुझ्या मैत्रीणीचे नाव सांगीतलेस. तिची आणि तुझी लव्ह स्टोरीसुद्धा थोडक्यात (दीड तासात) ऐकवलीस. मला झोप येत असल्याचे बघून तू आवरते घेतलेस. बिल देऊन मी बाईक काढली आणि आपण परतलो. अरे हो- तुला साधी बाईकसुद्धा चालवता येत नाही !

बस्स.
तीन वर्षातल्या आपल्या दोघांच्या अशा एवढ्याच आठवणी. बाकी सगळी नुसती निरीक्षणे.
त्या कॉफीवाल्या दिवसानंतर, खरं तर रात्रीनंतर तू पुन्हा आपल्या कोषात गेलास ते आजतागायत. नंतर आणखीही काही घडले असावे कारण एव्हाना तू अगदीच अबोल-- खरं तर मुका झाला आहेस. मी तुला कधी तुझ्या समस्यांबद्दल विचारले नाही, आणि तू स्वत:हून काही सांगायचा तर प्रश्नच नाही.
मी विचारायला हवे होते का??

असे असूनही, आपले एक नाते तयार झाले. आपण मित्र आहोत का? बहुधा नाही.
"रूममेट्स" हेच त्या नात्याचे नाव.
आपण नकळत एकमेकांची काळजी घेतो. अगदी सहजच.
आणि गरज नसेल तेव्हा दखलही घेत नाही एकमेकांच्या अस्तित्वाची.
मला हे फार आवडते. तू, मी आणि ही टीचभर रूम मिळून एक स्वयंपूर्ण, एकजिनसी असे विश्व तयार झाले आहे- जे कुठल्याही बाह्य प्रेरणेशिवाय सुरळीत चालत असते. मानवी ह्रदयासारखे जणू.

आपल्यात काही अलिखीत करार झाले आहेत. मला सकाळी घाई असते म्हणून तू बाथरूम मोकळे ठवतोस. मी गेल्यावर अंघोळ- तयारी करतोस. (यात बहुधा तुझीही सोय आहेच.) याबदल्यात मी रूम आवरून ठेवतो.
माझा पेपर तुला दररोज वाचायला मिळतो.
तुझा अडीच इंच व्यासाचा आरसा एव्हाना मीसुद्धा विनासायास वापरू लागलो आहे.
मी कधी तुझ्या ट्रंकेतल्या पुस्तकांची, तुझ्या मैत्रिणीची, तुझ्या जॉबची चौकशी करत नाही. तूसुद्धा माझ्या दर रविवारच्या एकट्याने गड-किल्ले भटकण्यात कधी फारसा रस दाखवला नाहीस.
माझ्या बाईककडे आणि कधीकधी दारात येणार्‍या शेळीकडे तू त्याच कोरड्या समभावाने बघतोस. तू चुकूनही माझ्या मोबाईलला हात लावला नाहीस.
हल्ली हल्ली तू मला आवडू लागला आहेस !

तुझी आठवण नक्कीच येईल.
हो, मी ही रूम सोडून जातो आहे. आठवडाभरापुर्वीच ठरले खरं तर. तुला सांगणारही होतो.. पण आपली भेट कुठे होते रे? एकाच छपराखाली राहणारे दोन अनोळखी जीव आहोत आपण.
काल ड्यूटीवरून आल्यावर मी सामान पॅक करायला घेतले, तेव्हा विचारायला हवे होतेस तू. किंवा मी तरी सांगायला हवे होते.
आज रविवार. त्यामुळे तुला वाटले असणार की मी नेहमीसारखी भटकण्याची तयारी करतो आहे. तू काहीच विचारले नाहीस !

आता सकाळी दहा अकरा वाजता उठशील तेव्हा तुला हे पत्र मिळेल. या पत्रावर ठेवलेले माझे FasTrack घड्याळ चुकून इथे राहिलेले नाही. ते तुझ्यासाठीच ठेवले आहे. मला माहित आहे, ते तुला फार आवडते म्हणून. तुझ्या मैत्रिणीला भेटायला जातांना कायम मागुन घ्यायचास.
तू माझ्याकडून- दिवसभरासाठी का होईना, पण हक्काने मागून घेतलेली अशी ही एकच वस्तू !
आपण दोघांनी शेअर केलेल्या अवकाशातल्या काही क्षणांची यानिमित्ताने तुला आठवण येईल, अशी एक (वेडी?) आशा ठेऊ का?

मिस करेन तुला. फोन कर. पेपर नको असल्यास त्या पोर्‍याला सांग तसे.
परत या शहरात आलो, तर नक्कीच भेटेन तुला.

मला खात्री आहे, तू याच रूममधे असशील, तेव्हाही !



तुझाच-

रूममेट.

Wednesday, January 12, 2011

स्वप्न आणि आयुष्य

खूप काही व्हायला खूप काही दिवस जायला लागतात असे काही नाही आहे ना ? म्हणजे काही काही वेळेला एकाच क्षणामध्ये मध्ये किती गोष्टी होऊन जातात .. ज्याचा आपल्याला पत्ता पण लागत नाही .. आणि जेव्हा त्या गोष्टी घडल्यामुळे झालेला परिणाम दिसायला लागतो आयुष्यामध्ये तसा खूप उशीर झालेला असतो.. म्हणजे तुम्ही मागे वळून बघू शकता पण फारसे काही बदल करू नाही शकत.. मुळात जे काही झाले ते तुमच्या चुकीमुळे झाले असे नसेल.. पण त्यावेळी एखादी बरोबर गोष्ट अचानक चुकीची वाटायला लागते.. माहित नाही का पण काय विचार केला होता आपण असा विचार करायला लागतो आपण .. आणि माहित नाही ते बरोबर आहे का चूक आहे कारण प्रत्येक विचाराच्या मागे त्यावेळची परिस्तिथी खूप प्रमाणात अवलंबून असते.. आणि चुका लक्षात आल्यावर मागे वळून बघण्यापेक्षा पुढे जाताना करायचे बदल विचारात घेतले पाहिजेत ना खरतर .. पण असे घडत नाही .. आपण त्यात अजूनच गुरफुटत जातो .. आणि अचानक एका संध्याकाळी लक्षात येते आयुष्य निघून गेले.. इतक्या गोष्टी ठरवल्या होत्या करायच्या .. काहीही पूर्ण करू नाही शकलो.. पण दुसर्याच्या चष्म्यातून बघताना गोष्टी खूप वेगळ्या दिसत असतात.. कदाचित.. वरवर आपण सुखी दिसणारी माणसे किती मनाने खचलो आहोत .. किती ओझ्यामध्ये राहत आहोत .. कशाचे भान नसते ना राहिलेले आपल्याला.. अन काय मिळवायचा आटापिटा करत असतो आपण आपल्याला तरी उमगलेले असते का ते कुणास ठाऊक.. आता माझ्या आयुष्यातला कितीतरी अश्या गोष्टी आहेत ज्या मी का केल्या याची उत्तरे मागे वळून बघताना कधीही मला मिळत नाहीत अन लहान होतो वेडे होतो म्हणून काही गोष्टी सोडून देता येतात पण अखं आयुष्य आपण असे नाही जाऊ देऊ शकत.. अन असा विचार करता करता परत बरेच वर्षे उलटून जातात.. म्हणजे आपण जगायला कधी लागतो असे म्हणायचे..

म्हणजे नेहमीच सगळ्यांना असे वाटत असते कि आपण जसे जसे मोठे होवू तसे चांगले जीवन कसे जगावे कळत जाईल तर याच्या बरोबर उलटे होत जाते का ??? अजून काय होते.. म्हणजे तसे बघायला गेले तर मोठे झाल्यावर बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत.. पण जशी जशी मागच्या प्रश्न्याची उत्तरे मिळत जातात तसे तसे प्रश्न पण वाढतच जातात कि .. त्यांचा मेळ लावायचा असे ठरवले तर जीवन जगणे म्हणजे फक्त आपण अस्तित्वात असण्यासारखे आहे.. बाकी काही जगणे राहतच नाही ना मग ??? आणि खरच जीवनात आयुष्य शोधायचे असेल तर प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत का ? आहेत ते आयुष्य प्रश्नांना सोडून जगले पाहिजे.. आणि खरच असे जगता येते का? प्रश्न समस्या यांना जर आयुष्यात स्थान दिलेच नाही तर जीवनामध्ये आयुष्य राहील का ? म्हणजे जर प्रश्न, प्रोब्लेम सगळे हातात हात घालून चालत असतील तर त्यातच आपण आयुष्य का नाही शोधात.. पण इतके लांब का पाळतो त्यापासून.. आणि त्यातल्या कितीतरी गोष्टी आपल्याला नेहमीच हव्या असतात पण मिळाल्या कि त्या का आपल्या नाही राहत? म्हणजे ते काहीतरी दुसर्याचे स्वप्न पूर्ण केल्या सारखे का वाटत राहते.. आणि माझे मलाच प्रश्न पडायला लागतात कि हेच स्वप्न मी पहिले होते का ? आणि पहिले असले तर ते आता पूर्ण झाले आहे मग आता काय करायचे ? नेहमी माणसाने स्वप्न पाहिली पाहिजेत न .. तसे असेल तर मग मला माझ्या पुढच्या आयुष्यातली स्वप्न का नाही हात धुवून मागे लागून पूर्ण करायची आहेत.. असे का आहे ?

काही काही गोष्टी कळणे म्हणजे खूप अवघड असते तसेच काही गोष्टी समजल्या पाहिजेत असा अट्टाहासच असायची गरज नाहीय पण काही काही गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत.. तुम्ही तुमच्या आयुष्याचे काय करायला चालला आहात? किंवा त्यामध्ये काय जगत आहात .. ? हा पण विचार असला पाहिजे... असे नाही आहे कसे जगले पाहिजे हा विचार करता करताच आयुष्य संपून गेले पण .. तरीही .. काहीतरी असले पाहिजे आयुष्यामध्ये ज्याच्या मागे तुम्ही मनापासून लागला आहात.. आणि ते स्वप्नपूर्ती चा ध्यास तुम्ही घेऊन जगत आहात..

प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असल्या तरी आपण एकाच बाजूचा नेहमी विचार करतो न .. ? मग तसेच काहीसे आहे प्रत्येक गोष्टीचे.. तुम्हाला हवी ती बाजू तुम्ही बघू शकता.. त्यातून पुढे जाऊ शकता.. आणि जी बाजू धरून आपण चाललो आहोत तेच मिळवणे अतिंम सत्य असेल तर .. त्याचा आनंद नक्कीच मिळत राहील आयुष्यात .. पण जर अतिंम ध्येय काय आहे हेच कळायला आयुष्य निघून गेले तर तो माणूस जगलाच नाही म्हणायचे का ? प्रत्येक गोष्टीच्या वेगवेगळ्या बाजू आहेत.. आणि त्याचा विचार करण्यापेक्षा.. आपण आयुष्य ठरवलेले जास्त चांगले नाही आहे का ?