Saturday, December 10, 2011

राजकारण: एक आठवण

राजकारण म्हणजे नक्की काय असतं? हा प्रश्न अनेकदा पडायचा. नेत्यांची विधानं/भाषणं..मोर्चे/यात्रा..आंदोलनं असंच लहानपणी वाटे.

मी वृत्तपत्रांमधे राजकारणावर वाचायला सुरुवात केली असेल १९८९ सालापासुन. फ़ारसं काही कळायंच नाही. बोफ़ोर्स वरुन राजीव गांधी कसा काय चोर आहे इतकंच समजायचं. तेव्हा उल्हासनगरला रहायचो. ठाणे मतदारसंघात रामभाऊ कापसेंनी तत्कालीन कॉंग्रेसचे खासदार शांताराम घोलप ह्यांचा पराभव करुन खासदार झाले. कॉंग्रेसविरोधी लाट होती. निवडणुकीच्या स्लोगन्स वगैरे ऐकायची तेव्हा सवय झाली. त्याकाळी निवडणुक प्रचारावर भरमसाठ खर्च व्हायचा (पुढे टी.एन.शेषन निवडणुक आयुक्त झाल्यावर कमी झाला). प्रत्येक भींत रंगवली जायची. स्लोगन्स देत रिक्षा/टेम्पो दिवसरात्र फ़िरत. प्रत्य्के पक्षाचं चिन्ह माहित करुन घ्यायची उत्सुकताही असे.

विधानसभा, लोकसभा, नगरपालिका ह्या सगळ्या निवडणुका एखाद्या क्रिकेट मॅच सारख्या वाटत. निवडणुकांचा हंगामच होता तो.

व्हि.पी.सिंग पंतप्रधान झाले, देवीलाल उपपंतप्रधान. मग आरक्षणाबद्दल ऐकु लागलो. कि आरक्षणामुळे कशी काय देशाची वाट लागणार आहे. लायकी नसलेले लोकं कसे काय पुढे येतील असंच काही. मंडल कमीशनबद्दल लोकं बोलत. कोणी आत्मदहन केलं असं वाचायला मिळे. मी तेव्हा नुकताच अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयात प्रवेश घेतला होता. आमचे शिक्षक त्याकाळचे बहुतेक रा. स्व संघातले होते. शिकवायचे उत्कृष्ट, पण मधुन मधुन आरक्षण, राममंदीर वगैरेंवर बोलायचे. त्यातुनच समज झाला होता की आरक्षण वाईट आणि राममंदीर व्हायलाच पाहिजे वगैरे.

पुढे व्हि.पी.सिंग ह्यांचा पाठींबा भाजपाने काढला. सरकार गडगडले. जनता दलात फ़ुट पडली. चंद्रशेखर ह्यांना राजीव गांधींनी पाठींबा देऊन पंतप्रधान बनवलं. ही बाब तर तेव्हा खुपच नवलाईची वाटली होती..की शेवटी राजीव गांधींचाच पाठींबा घेतला. पण पुढे हळु हळु राममंदीराचीच चर्चा सुरु झाली. तो प्रचार इतका मजबुत होता की आम्हीही "हम कसम राम की खाते है...मंदीर वही बनायेंगे" आणि अशा अनेक घोषणा पाठ करायला लागलो.


त्याच काळात १९९० साली विधानसभेच्या निवडणुकाही झाल्यात. बाळासाहेब, भुजबळ, मनोहर जोशी, सुधीर जोशी ह्यांची नावं ऐकीवात येत. शिवसेना आधीपासुनच माहीत होती त्यांच्या वाघ ह्या चिन्हामुळे. विधानसभेला धनुष्यबाणाचं चिन्ह पाहुन आश्चर्य वाटलं होतं.

अंबरनाथच्या शाळेत जातांना तिथल्या मतदारसंघातले उमेदवारही कळुन येत. शिवसेनेचे साबिर भाई शेख तेव्हा निवडणुकीला उभे होते आणि कॉंग्रेसतर्फ़े कोणीतरी संजय दत्त म्हणुन उमेदवार तिथे होता. आधी तो आम्हाला सिनेस्टार संजय दत्त वाटे.

उल्हासनगरला पप्पु कलानी नगराध्यक्ष झाल्यावर उल्हासनगरचा कायापालट सुरु झाला होता. आणि कलानी लोकप्रियतेच्या शिखरावर होते. उल्हासनगरचं सिंगापुर करायचा त्यांचा इरादा आहे असं ऐकायचो तेव्हा. ९० साली ते आमदारकीला कॉंग्रेसतर्फ़े उभे राहिले तेव्हा त्यांची प्रचाराची फ़ेरी आजही आठवते. एका वेगळ्याच प्रकारच्या बससदृश मोठ्या गाडीच्या टपावर बसुन त्यांची वरात निघे.

अंबरनाथला सेना जिंकली तर उल्हासनगरला पप्पु कलानी. राज्यात थोडक्यात पवारांचे सरकार आले. तेव्हा पवारांच्या कौशल्याबद्दलही बरचं ऐकायला यायचं नक्की काय कौशल्य ते कळायचं नाही. कलानींबरोबरचे त्यांचे संबंधही ऐकायला मिळायचे. विरोधी पक्षनेता म्हणुन मनोहर जोशींची निवड झाली त्याबद्दलही चर्चा चालत की सुधीर जोशी हे जास्त योग्य होते आणि भुजबळांचा तर हक्कच होता.

त्याच काळी आम्ही अंबरनाथला रहायला आलो. आमच्या शाळा अंबरनाथला असल्याने आणि अंबरनाथ हे स्टार्टींग स्टेशन असल्याने बाबांनी अंबरनाथला घर घेतले. अंबरनाथला आल्यावर शिवसेना शाखा म्हणजे काय हे बघायला मिळाले. एका किल्ल्याची प्रतिकृती असलेली शाखा आणि त्यातले दाढीवाले शिवसैनिक ह्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता. माझ्या मित्राचे मामा (पोतनीस काका) शिवसेनेत होते आणि आमच्याच गल्लीत रहायचे. तेव्हा त्यांच्या कहाण्या ऐकायला मिळायच्या. ते कसे कारसेवक म्हणुन अयोध्येला जाणार आहेत वगैरे.

महाराष्ट्रात कॉंग्रेस आली तरी देशपातळीवर वेगळेच वारे होते. राममंदीर आंदोलन जोरात असतांना कॉंग्रेसने चंद्रशेखर ह्यांचा पाठींबा काढुन घेतला होता आणि पुन्हा निवडणुक होणार होती. प्रचार जोरदार सुरु होता. पण त्या प्रचारकाळातच राजीव गांधींचा खुन झाला आणि सगळं वातावरण बदललं. कॉंग्रेसला बऱ्यापैकी जागा मिळाल्या आणि पवार पंतप्रधान होणार अशा वावड्या उठायला लागल्या. महाराष्ट्रात जवळपास ३८ खासदार कॉंग्रेसचे होते. पण त्यांनी पवारांना पाठींबा दिला नाही असं कळलं. सुनील दत्त ह्यांनी तर स्पष्टपणे नकार दिला होता हे त्यांच्या मुलाखतीत कळलं.

त्याआधी एक मोठी घटना घडली...ती म्हणजे शिवसेनेला भुजबळांनी दिलेली सोडचिठ्ठी. भुजबळ लपुन राहिले होते आणि शिवसैनिक त्यांना शोधत होते. अनेक शिवसैनिकांना अटक झाली होती, अनेक शिवसैनिक भुमिगत होते. माझ्या मित्राचे मामाही. भुजबळ म्हणजे सगळ्यात मोठा गद्दार असं वातावरण शिवसैनिकांमधे होतं आणि त्यांना धडा शिकवायची इर्षाही दिसुन येई.

पवार दिल्लीत गेल्यावर सुधाकर नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तेव्हाच राममंदिर आंदोलनातुन बाबरीपतन झाले. ते शिवसैनिकांनी पाडले असं ऐकुन अजुनच चांगले वाटायचे. त्याच काळात मुंबईत दंगली झाल्या. पण अंबरनाथ शांत होते. साबिरभाई हे मुस्लिम असल्याने असावं कदाचित. दंगली पाठोपाठ बॉंम्बस्फ़ोट झाले. पुढे संजय दत्तला अटक झाली. सुधाकर नाईकांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि पवार महाराष्ट्रात परतले.

त्याच काळात पवारांवर आरोप सुरु झाले. मुंडे हे नाव मी तेव्हा पहिल्यांदा ऐकलं. खैरनार, मुंडे बेफ़ाम होते. एन्रॉन प्रकल्प तेव्हा महाराष्ट्रात येणार होता. सुधाकर नाईकही पवारांचे विरोधक बनले होते. कॉंग्रेस मधे निष्ठावंत नावाचा गट असतो तेही त्याकाळात कळलं. पवारांवर आरोप होत होते आणि त्यांची छबी एकदम भ्रष्ट, माफ़ियांचा सरताज अशी बनली. एकुणच पवारविरोधी वातावरण होतं. १९९५ साली झालेली निवडणुक पवार हरले. अवघ्या ८० जागा कॉंग्रेसला मिळाल्या. भुजबळांचा पराभव इर्षेला पेटलेल्या शिवसैनिकांनी करुन दाखवला. बाळा नांदगावकर ह्या अपरिचित चेहऱ्याला निवडुन आणला.

पुढे युतीच्या शासनात आमच्या आसपासचे बरेच शिवसैनिक सफ़ारी घालुन फ़िरायला लागले. बिल्डर बनले कोणी कंत्राटदार...त्याचबरोबर त्यांचा उत्साहही कमी होतांना दिसत होता. ह्याच काळात आम्ही मित्रमंडळीनी शाखेत जायला सुरुवात केली. शिवसेनेच्या...संघाच्या नाही. संघशाखांमधे संध्याकाळी क्रिकेटच्या टाईमाला पकडुन घेऊन जातात आणि कसलेतरी फ़ालतु खेळ खेळवतात म्हणुन आम्ही आधीपासुनच त्यापासुन लांब होतो. मी तेव्हा इंजिनिअरींगला होतो. फ़ारसा वेळ नसे. पण तरी वीकएंड्सला क्रिकेट खेळायचो. आमची टीम फ़ॉर्मात होती.

त्याकाळी अंबरनाथला लोकल गुन्हेगारीमुळे क्रिकेट टुर्नामेंट भरविणे बंद झाले होते. वादावादीतुन कोणी तलवारी बाहेर काढी. आणि मग सगळाच गोंधळ. पण टुर्नामेंट भरवण्यात फ़ायदा खुप होता. घरुन तेव्हा पैसे मिळत नसत. आम्ही ठरवले की टुर्नामेंट भरवायचीच.

पण टुर्नामेंटमधे जर कोणी गोंधळ घातला तर काय? म्हणुन आम्ही पोलिसांकडे प्रोटेक्शन मागायला गेलो. इतक्या शिव्या पोलिसांनी घातल्या असतील तेव्हा...शिव्या देऊन पळवुन लावले त्यांनी...तुम्ही काय इंटरनॅशनल टुर्नामेंट भरवताय काय...की सेक्युरिटी पाहिजे असं म्हणुन हाकललं पोलिसांनी. मग आम्ही शिवसेनेचा सहारा घेतला. सगळे जण रोज शिवसेना शाखेत हजेरी लावायचो. माझ्या मित्राच्या मामांना आम्ही कन्व्हिन्स केलं की टुर्नामेंट भरवणं कसं गरजेचं आहे. मग त्यांनी सगळ्यांना तयार केले, स्पॉन्सर्सचा बंदोबस्त केला आणि त्यातुन आम्ही नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली. त्यातुन आम्हाला क्रिकेट्च्या २ बॅट आणि स्टंम्पस मिळाले. आम्ही खुष होतो. पुढेपुढे शाखेला जाणे कमी झाले. तिथे गेल्यावर कळले स्थानिक राजकारण काय असते ते.

स्थानिक राजकारणात तुम्ही कुठल्याही पक्षात जा. तिथे जर तुमची मोठी गँग असेल तर तुम्हाला वाव मिळणार. त्यामुळे तिथे प्रत्येकजण आपली जास्तीत जास्त पोरं घुसवायच्या नादात असतो. त्यातुनच पदांची वाटणी वगैरे होते. पुढे राष्ट्रवादी स्थापन झाल्यावर माझा एक मित्र मला तिथे घेऊन गेला. त्याला युवक अध्यक्ष करणार होते...तो मला म्हणाला की आपली २०-२५ मंडळी घेउन चल. तुला उपाध्यक्ष करतो. पहिल्या २ मिटींगनंतर मी तिथे फ़िरकलो नाही. अर्धी लोकं बेवडा मारुन आली होती. ही लोकं कोणाचं काम करतील असं वाटलं नाही.

त्यानंतर राजकारण सुटलंच. जे वाचायचं ते पेपर मधे. बाळासाहेब आणि पवार ह्या दोघांनाही पुढे फ़ारसं यश मिळालं नाही ह्याची खंत मात्र उगाच वाटत राहते.

1 comment:

  1. katyavar basun kunachi tari gosht aikalyasarakhe vatale... mast ekdam..! :)

    ReplyDelete