Saturday, April 9, 2011

गाण्याचे शब्द

कधी कधी प्रत्येक गाण्याला आपला असा स्वतः चा काही अर्थ असतो.. अन तो अर्थ त्या गाण्याला असेल असे नाही.. कदाचित गाण्याचे शब्द काहीतरी वेगळेच म्हणणारे असतील पण ते गाणे ज्या काही आठवणी घेऊन येतात किंवा आपल्या साठी अर्थ बनून राहिलेले असते ते खूप काही वेगळे असते .. तसेच गाणे लिहिताना कवीला उमगलेला त्या कवितेचा अर्थ खूप काही वेगळा असेल, कवितेचे गाणे होताना किंवा करताना संगीतकाराला उमगलेले गाणे वेगळेच.. आणि कवितेवरून गाणे झाल्यावर त्याच्या जन्मदात्याला वाटणाऱ्या भावना खूप वेगळ्या असतील.. तसेच गाणे ऐकणारी हजारो लोक त्यांनी किती वेगळे अर्थ काढले असतील एकाच गाण्याचे.. अन मग लक्षात येते कि एकाच गाण्याला, त्याच सारख्या शब्दाला इतके अर्थ कुठून आले तर ते लक्ष कानांनी दिलेले किंवा उमगलेले अर्थ आहेत.. आता "कभी कभी" गाणे लिहिताना गुलझार नक्की कशाचा विचार करत बसले होते.. त्यांना कसे सुचले ते गाणे.. तेच गाणे म्हणताना, त्याच्यामध्ये अभिनय करताना अमिताभ ला काय उमगले असेल .. आणि तसेच आता ते गाणे ऐकताना मला वाटणारे त्याचे अर्थ किती वेगळे असतील , आहेत...
गाण्याचे अर्थ एकदाच डोक्यात बसतात असे काही नाही.. परिस्थितीवर पण त्यांचे अर्थ बदलत राहतात ..
अश्या बर्याच गोष्टी असतात ज्या नेहमी आपल्या भोवती होत असतात पण कधी त्याची जाणीव झालेली नसती किंवा आपण इतके कधी लक्ष्य दिलेले नसते त्या गोष्टींकडे.. नेहमी जाणार्या बस मध्ये दिसणारी माणसे..आपण म्हणतो कि प्रत्येक माणूस वेगळा पण हि सगळी सृष्टी कुठल्या धाग्याने बांधली गेली आहे.. प्रत्येक गोष्टी मध्ये काही साम्य आहे, ते साम्य कशातही असू शकते.. अगदी वेगळेपण असण्यामध्ये पण साम्य असू शकते.. पण ते साम्य शोधून काढायचे असते का असेच आपल्या समझून जाते .. कधी कळते आपल्याला या सगळ्या गोष्टी ? गाणे एक असताना त्याचे असंख्य अर्थ निघतात .. अन कदाचित अनेक गाणी एकच अर्थ सांगतात..
मुळात नातं गाण्याशी नसतेच ते प्रसंगांशी असते .... आता ''आयुष्यावर बोलू काही '' ऐकताना विश्वास पाटीलांची '' पानिपत '' आठवतं याला काय अर्थ आहे ? भिडलं ते पानिपत मग वाचताना कानी पडलेल्या सुरांनी शब्द साठवले ते इतिहासाचे.. आपली गाण्यांची साठवण अशीच प्रासंगिक असावी ... गाणंच काय पण आपण जपत वा मिरवत असलेलं प्रत्येक नातं त्या वस्तु ,वास्तू ,व्यक्ती ,वेस या विविधतेपेक्षा घटनांशीच असतं म्हणजे पर्यायाने स्वतःशीच ...! अंतर्मनात कुठला सूर कुठल्या नावाने उमटलाय काय सांगावं? माणसं वेगळी असतात ते खंर पण ती एकानावाने माणूस म्हणूनच ओळखली जातात हे महत्वाचं ... गुण, अवगुण सारे सारखेच ...सूर सारखे ..इतिहास सारखा ... पुराणिक बुवा पुराण सांगत राहतो ,,कोणाला राम पावेल कोणाला सीता ..! कोणाला गीता एकू येईल ,कोणाला तापा ,बाण , किंकाळ्या ...कोणाला मयसभा मानवेल कोणाला इंद्रप्रस्थ ...! वेगळेपण स्वागतार्हच पण त्यात खरेपण मात्र सारखं असलं पाहिजे ...म्हणजे मुखवटे गळून पडतील नि निरनिराळ्या भाव -सुरांची असेनात का पण गाणी सुरेल होतील .. मला गाणी आवडतातच ,शब्द भावातातच ,सूर भिडतातच , या गाण्याच्या पार्श्वभूमीवरच मी आठवणी साठवते ..गाणी नसती तर माझा पावसावर आणि भाउकतेवर विश्वास बसला असता ?

with thanks from Mrudgandha

निर्णय

कधी कधी नसतेच कुणाला कुणाशी बोलायचे.. कधी कधी कुणाला नसतेच कधी जबाबदारी घ्यायची .. कधी कधी कुणाला नसतेच करायचे बरोबर आहे ते.. कधी कधी कुणाला असतेच सवय चूक करून शिकायची .. कधी कधी कुणाला असतेच भीती छोट्या छोट्या गोष्टींची .. कधी कधी असतेच कुणाला कुणी नसायची सवय .. कधी कधी वाटतेच एकटे रहावेसे असे.. कधी कधी कुणाला जमतच नाही जे अगदी सहज जमणाऱ्या गोष्टी . .. कधी कधी नसतेच कुणाला विसरायचे .. कधी कधी वाटतेच कुणाला असू नयेत काही गोष्टी आयुष्यात .. त्याची काही कारणे नसतात .. पण ते 'च' मात्र असते.. का कुणास माहित .. वाटतच असतात अश्या गोष्टी..
आपल्या आजूबाजूला अश्या कितीतरी गोष्टी होत असतात .. ज्याच्या वर आपण विचार करत असतो आणि आपले एक मत देत असतो किंवा मनात तर नोंदवलेले असे मत असतेच.. काही काही गोष्टींबद्दल च्या मताला काही अर्थ नसतो तर काही काही गोष्टींबद्दल चे मत चुकीचे असण्याची जास्त शक्यता असते.. कधी कधी मते बदलत जातात जसे अनुभव येत जातात.. काही गोष्टी नीट दिसायला लागतात, समजायला लागतात .. तसे मतं ठाम बनत जातात .. बदलत जातात .. माणूस आपल्याला अनुभवावरून काहीतरी आपली मते बनवत जात असतो .. सगळे काही त्याला आलेले अनुभव नसतात.. काही पाहिलेले, ऐकलेले .. नकळत मनावर झालेले .. असे बरेच काही गोष्टी असतात .. पण बरीचशी मते बदलण्यासाठीच असतात कदाचित.. जसे वय वाढत जाईल , जास्त वेगवेगळे अनुभव येत जातील.. काही काही गोष्टी स्वतः बद्दल पण कळायला लागतात.. सगळ्या गोष्टी चांगल्या असतीलच असे नाही पण काही गोष्टी खूप त्रासदायक पण असतात ... कधी कधी विश्वासच बसत नाही कि आपण असे कधी वागलो होतो याचा विचार करून.. तर कधी कधी वाटत राहते आपण इतके मूर्ख कसे काय होतो .. असे पण काही विचित्र जाणीवा असतात .. आपल्याविषयी चे मत म्हणू शकतो आपण ते.. ते पण सारखे बदलत असते.. अर्ध्या वेळेला माहित पण नसते कि काय मत असले पाहिजे.. आयुष्यात आपण हजारो निर्णय घेत असतो.. त्यातले काही चुकीचे असतात काही बरोबर असतात काही आयुष्य बदलून टाकणारे, काही आयुष्य सावरणारे .. काही आयुष्य उध्वस्त करणारे... पण काही काही निर्णय घ्यावे लागतात .. वेळ आली असावी म्हणून किंवा अति झाले म्हणून .. काही निर्णय आपणच लादतो आपल्यावर .. माहित नाही का पण कुठलाही निर्णय घ्यायचा म्हणजे हृद्य आणि डोक कधीही एका बाजूने नसतात .. अगदी तो कसलाही निर्णय असुदेत..
म्हणतात ना टॅास करताना जसे नाणे हवेत फेकले जाते त्या क्षणी माहित असते कि आपल्याला काय हवे आहे .. तसेच काहीसे असते काही निर्णयांचे .. एका क्षणी तुम्हाला जाणीव होते कि आता कुठे पाऊल उचलले पाहिजे.. प्रत्येक वेळी काही चांगले निर्णय नसतात पण ते घ्यावे लागतात.. त्यांच्या बरोबर जगावे लागते आयुष्यभर .. आणि मग वाट बघणे .. एवढेच राहते हातात .. घेतलेले निर्णय किती बरोबर होते आणि चूक होते हे जाणून घेण्यासाठी वाट बघायची... वेळ पण खूप विचित्र गोष्ट आहे .. म्हणूनच कदाचित त्याला 4th dimension म्हणत असतील का ? म्हणजे कसे त्याचे परिमाणच वेगळे असतात नेहमी .. कुठल्याच गणितात न बसणारे..
बस मधून जाताना तुम्ही डोळे मिटून २ मिनिट विचार करायला लागता आणि मग ते असे सगळे घेतलेले निर्णय यायला लागतात डोळ्यासमोर.. घडलेल्या चुका.. त्यातून शिकलेले अनुभव .. खूप साऱ्या आठवणी .. अश्या खूप साऱ्या गोष्टी .. ज्या आपण कुठेतरी आत लपवून ठेवलेले असते.. असे काय असते त्या २ मिनिटाच्या डोळे मिटन्यामध्ये माहित नाही.. पण बाकीचे सगळे आवाज बंद होऊन जातात आणि कुठल्यातरी दुसऱ्या दुनियेत गेल्यासारखे वाटते. आणि डोळे उघडले कि काहीच बदलेले नसते... काही चुकीचे निर्णय .. काही चांगल्या गोष्टी .. काही जिवाभावाची माणसे.. काही रस्त्यामध्ये सुटलेली माणसे.. काही बदलेले चेहरे.. काही बदलेली नाती .. सगळे कसे तेच असते.. काही बदलेले नसते..
मग कधी कधी नसतोच कुणाला विचार करायचा भविष्याचा... कधी कधी नसतेच जगाचे भूतकाळामध्ये कुणाला .. कधी कधी असतेच कुणाला सवय चुकीचे निर्णय घ्यायची.. कधी कधी असतेच चुका करायची सवय .. कधी कधी असतेच कुणाला ..... !