Wednesday, November 9, 2011

तीन देवदुत

HIV Rehabilitation centre ला जायचा माझा तो पहिलाच दिवस होता. एड्‍स हा स्पर्षानी होत नाही, डास चावण्यानी होत नाही हे सर्व माहिती असून मनाची तयारी व्हायला बरेच दिवस लागले. एका मित्राकडून माहिती मिळाली होती की इथे फ़क्त लहान मुलंच ठेवतात.

या मुलांची आई/वडिल वा दोघेही एड्‌स्‌नी दगावलेले होते व या मुलांनासुद्धा त्याची लागण झालेली होती. माझ कस स्वागत होईल ? या ठिकाणी. मला मुलांशी बोलण जमेल का ?सर्वच प्रश्न होते. जे मुल काही दिवसात मरणार आहे, त्या मुलाशी कस वागायच ? त्या मुलाची मनःस्थिति काय असेल ? काहीच कल्पना नव्हती. माझा अंदाज होता मुलं बेडवर पडुन असतील.

आधी संचालिकांशी मित्रानी ओळख करुन दिली, मी विचारल की "मुलांना ती एड्‌स्‌ची पेशंट आहेत हे माहीती आहे का ?" त्या म्हणाल्या "काहींना माहिती आहे काहिंना नाही"

आम्ही मुल होती त्या हॉलमधे गेलो. ३ वर्षापासून १४ वर्षापर्यंतची मुल इथे होती. एकमेकांशी खेळणारी व थट्टा मस्करी करणारी ती मुल पाहिल्यावर ही मुल HIV झालेली असतील अस वाटतच नव्हत. माझा मित्र इथे वरचेवर येत होता त्याची ओळाख होती. मुल लगेच त्याच्या भोवती "अंकल अंकल" करत गोळा झाली. माझी ओळख करुन दिल्या गेली व मी गोष्ट सांगणार आहे अस मित्रानी परस्पर डिक्लेअर केल. मुलं गोष्ट म्हणल्यावर माझ्या भोवती गोळा झाली.

कोणत्याही परिस्थितीत असलेली मुलं गोष्ट म्हणल्यावर कशी उत्तेजित होतात ते मी तीथे बघितल. मग बिरबल-बादशहा, पंचतंत्र वगैरे मधल्या गोष्टी सांगितल्या.

हळू हळू मुलांच्या ओळखी करुन घेतल्या. ईशान ७-८ वर्षांचा, मोठा गोड मुलगा पण सर्वांना फ़ार चिडवायचा. त्याचे डोळे अचानक चमकायला लागले. ओठाच्या कोपर्‍यातुन थोड हसु यायला लागल. आणि त्यानी मला विचारल

"काका तुम्हाला भुताच्या गोष्टी येतात का ?"

बाकी मुल खु खु करुन हसायला लागली. मला समजेच ना हासायला काय झाल. माझा मित्र म्हणाला "ईशान चुप." ईशानचा व इतर मुलांचा चेहरा पडला.

भुताची गोष्ट सांगुन मला या मुलांना घाबरवायच नव्हतं. व नाराजपण करायच नव्हतं. मी मित्राला म्हणालो

"अरे असु दे"

आणि ईशानला म्हणालो " पण ईशान मला येत नाही रे भुताची गोष्ट. तुच सांग बर तुला येत असेल तर"

परत त्याचा चेहरा उजळला. तेच मिश्किल हसु परत ओठावर आल.

"काका, तुम्ही भुत पाहिलय ?"

आता तर बाकी मुलं जास्तच हासायला लागली. ईशाननी त्यांना गप्प केल.

"नाही रे मी नाही पाहिल भुत"
"काका तुम्हाला भुत पाहायचय का ?"
मी म्हणालो हो पाहिन की
"पण तुम्ही खुप घाबराल. ते भुत खुप डेंजर दिसतय"
"नाही घाबरणार दाखव"

आता तर सर्व मुल खुपच हासायला लागली. माझी उत्सुकता खुपच वाढली होती. काय बर दाखवतायत ही मुलं. काही तरी माझी फ़िरकी घेणार हे नक्कीच होत.

ईशान रेखाकडे बघुन म्हणाला.
"रेखा जरा लवकर वर जा आणि भुताला तयार कर."

रेखा जरा मोठी मुलगी, ती लगेच वरच्या मजल्यावर गेली. आणि थोड्याच वेळात ईशान मला घेऊन निघाला. सर्व मुलांचा लोंढा आमच्या मागे.

वरच्या मजल्यावर एका पडद्या समोर मला उभ केल आणि ईशान म्हणाला

"काका पडदा बाजुला करा. डेंजर भुत दिसेल तुम्हाला."

मला थोडा अंदाज आलाच होता. त्यामुळे पडद्याला हात लावताना मला खुप भिती वाटते अस मी नाटक करत होतो. मुलांकडे बघुन घाबरलेला चेहरा करत होतो आणि मुल खदखदून हासत होती. थोड्या वेळानी मी पडदा बाजूला केला. पलिकडे एक मोठा आरसा होता व त्यात माझ प्रतिबिंब दिसत होत. माझा मस्त पोपट केला होता त्या छोट्यांनी.

एकमेकांना आनंदानी टाळ्या देत व मिठ्यामारत त्यांनी त्यांचा आनंद साजरा केला. माझी फ़िरकी घेतली म्हणुन मी खोट खोट रडुन दाखवल. आणि मोठा माणुस आपल्या चिडवण्यानी रडु शकतो म्हणुन मुलं पोट धरुन हासत होती. एका प्रसंगानी माझी व त्यांची गट्टी जमली.

मग तीथेच बसुन आम्ही खुप गप्पा मारल्य़ा. शशांक छान गाणी म्हणायचा. रवी तबला वाजवायचा. कोणत्यातरी संगीताच्या क्लासमधे ते शिकत होते. शशांकचा आवाज इतका मधुर होता व रवीची बोटं तबल्यावर इतकी सफ़ाईनी फ़िरत होती की मी तर थक्कच झालॊ. ईशान तर लहान असुन सर्व मुलांना सहज कंट्रोल करु शकत होता.

हा चालू पोरगा तर मोठा नेताच होणार याबद्दल माझी मनोमन खात्रीच पटली.

आम्ही एकमेकांशी बोलताना इतके रंगुन गेलो, मुल माझ्या मांडीवर बसली होती. काही माझ्या खांद्यावर भार देऊन माझ्याशी बोलत होती. फ़ार गोड वातावरण होतं. संगीताची मैफ़िल झाल्यावर, ईशाननी मला एक एक मुलाची ओळख करुन देत त्यांची खासियत सांगायला सुरुवात केली. मग पिंकी छान नाच करते, मोहन कोणत्याही पक्षाचा आवाज काढतो वगैरे सर्व व ती मुलं मला त्यांच वैशिष्ठ दाखवत होते. परत शशांकनी एक गाणं म्हणल.

मी सहजच त्या मुलांना विचारल की तुम्हाला कोण व्हायचय ? कोणी "वैमानीक, कोणी डॉक्टर" "कोणी नर्स", कोणी काही कोणी काही उत्तर दिली. मी ईशान, रवी व शशांकला विचारल या तीघांनी मला काहीच उत्तर दिल नाही.

मी परत जायला निघालो. ही तीन मुल एकमेकांमधे काही तरी बोलत होती. मी गेटपाशी आलो. मुलांचा हात हालवून निरोप घेत होतो आणि ईशाननी "काका एक मिनीट" म्हणुन मला थांबवल. ते तीघेही जवळ आले. मी खाली वाकलो. त्या तीघांनीही माझ्या गालाची पापी घेतली व निरोप दिला.

परत ईशान म्हणाला "काका एक मिनट,"

त्यानी मला बाजूला नेल व मला म्हणाला

"काका तुम्ही विचारलत की मोठेपणी तुम्ही कोण होणार ? तेव्हा आम्ही उत्तर दिल नाही.

कारण काका आम्हाला माहीती आहे की आम्ही कधीच मोठे होणार नाही.

मोठ होण्याआधीच आम्ही आमच्या आई-बाबांसारखे एड्‌स्‌नी मरुन जाणार आहोत."

मी त्या तिघांना जवळ घेतल. त्या तिघांच्या गालाची पापी घेत मी म्हणालो

"नाही रे अस मुळीच नाही. आता बघ या रोगावर लवकरच औषध येणार आहे. आणि तुम्ही लवकरच बरे होणार आहात. मला तुम्हाला मोठ झालेलच बघायच आहे"

माझ्या बोलण्यातला फ़ोलपणा मला स्वतःला जाणवत होता.

मागे न बघता मी भराभर पायर्‍या उतरुन रस्त्यावर आलो आणि गाडित बसलो.

माझे खरे खुरे अश्रु मला त्या मुलांना दाखवायचे नव्हते

मी वरचे वर HIV Rehabilitation centre ला जात होतो. मी सर्वच मुलांशी बोलत होतो पण खर तर मला ईशान, शशांक व रवी जास्त आवडत होते. हल्ली ही तीनही मुलं वरचेवर आजारी पडत होती. कधी थंडी वाजून ताप यायचा, कधी काही, कधी काही चालू असायच. पण तोंडावरचा आनंद मात्र तसाच होता.

त्यांची तब्बेत बरी असली की मग माझ्याशी खुप गप्पा मारायचे. गाण्यांचा कार्यक्रम व्हायचा. माझा वेळ फ़ार मजेत जायचा. कधी मी त्यांना बाहेर बागेत घेऊन जायचो.

हळू हळू मुलं कोमेजत चालली होती. पारिजातकाच्या फ़ुलांच आयुष्य काही तासांचच असत, पण ते आपला सुवास दूरवर पसरवतं. कॊणालाही मोहवेल असाच तो वास असतो. जेव्हा ते फ़ुल टवटवीत असत तेव्हा पाहाणार्‍याला मोह पाडेल असच त्याच रुप असत. ही फ़ुलं हातात घ्या एक खोल श्वास घ्या मनावर असलेल टेंशन, कितीही दुःख, सर्व दूर होत. मन आनंदानी भरुन जात. ह्या गोड बाळांच्या सहवासात माझ असच व्हायच. ईशानच हासणं, माझ्या गळ्यात हात टाकुन बोलणं, माझ मन आनंदी करायच आणि रवी व शशांकच संगीत त्या शांत मनावर एक फ़ुंकर मारायच.

रवी व शशांक कोणत तरी गाण गुणगुणत असायचे व ईशान त्याचं हास्य ओठावर ठेउन फ़िरत असायचा. पण तरी त्यात हल्ली एक गंभीरपणा जाणवायचाच. मुलं हल्ली जरा जास्तच गंभीर होत होती. त्यांच्या मित्रांमधल कोणी जास्त आजारी असलं की रडवेली व्हायची. काय त्यांच्या मनात येत होत काय माहिती ? थोड डोक दुखल तर लगेच कपाळाला बाम लावून, गोळी घेऊन दोन तास झोपणारा मी, मला कस समजणार त्यांच दुःख ?

त्यांच्या मित्राच्या, सुनिलच्या निधनानी तर ही मुलं जास्तच गंभीर झाली होती. त्या दिवशी माझ्याजवळ आली, काही न बोलता नुसतीच उभी होती. मी त्यांना जवळ घेतल. मुसमुसत रडत होती. काय त्यांच मी सांत्वन करणार होतो ? माझ्याकडे शब्दच नव्हते. ईशान म्हणाला "काका सुनिल सारखा सारखा ’ माझ्या नातलगांना बोलवा ’ म्हणत होता. आमच्या जवळ खुप रडायचा. म्हणायचा की ’ नातलगांना म्हणाव की जवळ येऊ नका लांबूनच माझ्याशी बोला. पण एकदा तरी भेटायला या ’ पण काका त्याला भेटायला कोणीच आल नाही " हे सांगताना प्रथमच त्याचा आवाज रडवेला व केविलवाणा झाला होता. तो पुढे म्हणाला "काका मला पण वाटत की ......." पुढे तो बोलुच शकला नाही. मी पण विचारल नाही पुढे. आणि परत हा विषय काढला तर तो यावर कधीच बोलला नाही.

एकदा मुलांना बागेत घेऊन गेलो होतो. इतर मुलांमधे ही मुलं खर तर सहज मिसळुन जायची. कोणाही अनोळखी मुलांशी ओळख काढुन त्यांच्याशी खेळायची या मुलांना सवय होती. आज सुद्धा अशीच ही मुल बागेत एका बाजुला क्रिकेट खेळात होती. पण त्यांच खेळात लक्ष नाही हे जाणवत होत. एका कोपर्‍यात एक जोडप बसल होतं आणि ते आपल्या मुलांचे लाड करत होते. हे तिघेही ते लाड बघत उघे होते. मी जवळ गेलो त्यांना जवळ घेतलं. काहीही न बोलता मुलं परत खेळायला लागली. मधेच खेळ सोडुन हे तिघेही एकमेकांशी बोलत उभे होते. मी जवळ गेलो तरी त्यांच लक्ष नव्हत.मी मुलांशी बोलताना गुढघ्यावर बसुन त्यांच्या उंचीच होऊन बोलतो त्यामुळे माझ्या उंचीच, मोठेपणाच, त्यांच्यावर प्रेशर येत नाही व मुलं मोकळेपणी बोलतात असा माझा अनुभव आहे. मी तसाच गुढघे टेकुन त्यांचात मिसळलो. आणि काय बोलतायत ऎकत होतो. एका गाण्यावर ते बोलत होते.

मी शशांकला म्हणालो "काय रे तुम्ही फ़क्त संगीतावरच बोलता की दूसर काही बोलता ?" शशांक म्हणाला "मला आणि रवीला संगीतच आवडत. अस वाटत की कानात सतत एक संगीत ऎकु येतय. या संगीतातच बुडुन जावस वाटत. काका देव आम्हाला न्यायला येईल तेव्हा अस संगीत वाजवतच येईल का ? तस असेल तर मग काहीच हारकत नाही. त्याच्या बरोबर आनंदात जाईन " ईशान म्हणाला "काका, मला मात्र सतत हासत राहाव अस वाटत. मला आतुन हसु येत. मी खोट हासतच नाही. देव जर हासत हासत आला न काका तर मी पण हासतच त्याच्या गळ्यात मिठी मारीन."

मला हे तीनही देवदुत फ़ार मोठे वाटले, त्यांची उंची आकाशा इतकी वाटली. त्या देवदुतांपुढे मी गुढघे टेकुन बसलो होतो. एक फ़ार फ़ार खुजा माणुस.

......निरंजन

Wednesday, November 2, 2011

कुमार




नुकतच मला कोणीतरी विचारल की तुझा आवड्ता पक्षी कोणता मी म्हणालो, "माझा आवड्ता पक्षी कावळा". ऎकणार्‍याच तोंड जरा वेडवाकड झाल.

तुम्हाला सुद्धा विचित्रच वाटत न !

या कावळ्याची व माझी गट्टी झाली तीच मुळी "एक घास काऊचा, एक घास चिऊचा" पासुन.

"कावळ्याच घरट शेणाच व चिमणीच मेणाच" या गोष्टीत, घर वाहुन गेलेल्या त्या कावळ्याला ती चिमणी किती त्रास देते. बिचारा कावळा, मला त्या लबाड चिमणीच केलेल कौतुक कधीच आवडत नव्हत. त्या चिमणीचा मला फ़ार राग यायचा.

किती बिचार्‍या ह्या प्राण्यावर माणसानीसुद्धा अन्याय केलाय. त्याला पार खालच स्थान दिलय.

कावळा म्हणे "मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा दिसतसे
वाहवा तयाची करीती, मजला ते धिक्कारिती लोक हे !"

पहा त्याचा काळा रंग हे एकमेव कारण. त्या लबाड बगळ्याला सुद्धा वरच स्थान. कोणत्याही पक्षानी कपड्यावर घाण केली की लगेच आपण म्हणतो, कावळ्यानी घाण केली. का ? बाकी पक्षी घाण करतच नाहीत का ?

खर तर किती चांगला आहे हा, त्याला तुम्ही काही खायला द्या. तो कधीच एकटा खाणार नाही. काव काव करेल चार मित्रांना बोलावेल व सर्व मिळुन, जे असेल ते, असेल तेव्हढ खातील. हा गुण खर तर माणासानी शिकायला हवा. पंचतंत्रात विष्णुशर्माला सर्व प्राणी पक्षांचे गुण-अवगुण दिसले. पण कावळ्याचा हा गुण त्याला दिसला नाही.

या सर्वाच उट्ट कावळा काढतो ते त्याला पितरांच स्थान दिल जात तेव्हा. तेराव्याला पहा, नेहेमी काव काव करुन सर्व कावळ्यांना जमा करणारा हाच कावळा, कुठे तरी झाडाच्या वरच्या फ़ांदीवर बसलेला असतो व एका डोळ्यानी बघत असतो. कितीही विनवण्या केल्या तरी तो नाहीच बधत. लोकं बिचारे काव काव ओरडातात, काय काय अमिष दाखवत असतात पण जेव्हा त्याला वाटॆल तेव्हाच तो येतो.

लहानपणी पाहिलेले कावळे आठवत नाहीत पण मला आठवतोय ते माझ्या बागेत येणारे कावळे.

मी त्या कावळ्यांना मस्त नाव सुद्धा दिलेली होती. कुमार नावाचा कावळा तर माझा फ़ारच लाडका. आता हे नका विचारु की मला अनेक कावळ्यांमधुन माझा कुमार कसा ओळखु यायचा ते.

कुमार त्याच्या मैत्रीणीबरोबर असायचा व मला खिडकीतुन पाहुन मान वाकडी करायचा व त्याच्या एका डोळ्यानॊ हसायचा. हो हो हसायचाच तो.

आणि हो मला आठवतय तेव्हढे दिवसात त्यानी त्याची मैत्रीण पण बदललेली नव्हती. गॅलरीत मी त्याला खायला द्यायचो. मग तो त्याच्या सर्व कुटुंबाला, त्याच्या मित्रांना बोलवायचा व मी दिलेल साफ़ सुफ़ करायचा. मजा म्हणजे मेलेला उंदिर, कोणतीही घाण खाणार्‍या या पक्षानी कधीच अशी घाण माझ्या गॅलरीत आणली नाही.

कावळा हा चिमण्या व कबुतरांसारखा कधीही घरात येत नाही. त्याला आपली मर्यादा कळ्ते.

एकदा मी माझ्य़ा खोलीत होतो, कुमार व त्याची मैत्रीण खिडकीत येऊन जोर जोरात ओरडत होती. मी जाऊन बघीतल तर त्यांच्या बरोबर त्यांच एक छोट पिल्लु होत. मला दाखवाण्यासाठी त्यांनी ते आणलेल होत. माझ्या आदिवासी मित्रांमुळे पक्षांची भाषा थोडि थोडी मला समजत होती. त्यांच्या ओरडण्याच्या टोनवरुन त्यांना झालेला आनंद कळत होता. मी लगेच दोन बिस्किटाचे तुकडे गॅलरीत टाकले. त्या पिल्लानी माझ्याकडे बघीतल त्याला बहुतेक आई-बाबा सांगत असतील. "हा आपला मित्र बर का "

एकदा शाळॆत इतिहासाचा कंटाळवाणा तास चालु असताना, मला खिडकितुन झाडावर बसलेला कुमार दिसला. त्याच्या मैत्रीणी बरोबर बसुन मस्त चोचीनी पंख साफ़ करत होता. त्याला मी दिसलो, त्याची व माझी नजरा नजर झाली, आणि त्याच्या नजरेत असा काही आनंद दिसला की बस. त्यानी काव काव करुन त्याचे मित्र बोलावले. आणि वर्गाच्या खिडकीत सर्व जमा झाले. मी बाईंच लक्ष नाही अस पाहुन हळुच माझा डबा उघडला आणि चपातीचे तुकडे करुन खिडकीच्या कठड्यावर टाकले. सर्व कावळ्यांनी काव काव करायला सुरवात केली. माझ्यासारख्या कंटाळलेल्या बाकी मुलांनी लगेच डबे उघडले व कावळ्यांना खायला घालायला सुरवात केली. कंटाळवाण्या इतिहासापेक्षा कावळ्यांच काव काव ओरडण किती छान वाटल. आवाज इतका झाला की बाईंना शिकणच जमे ना. अशी मस्त मजा आली.

पण या पक्षाला भावना आहेत हे मात्र मला फ़ार उशीरा समजल.

माझे वडिल ज्यादिवशी गेले, त्या दिवशी स्मशानातुन यायलाच खुप उशिर झाला होता, रात्री खुप वेळ झोपच लागत नव्हती. सकाळी मी एकटाच गॅलरीत उभा होतो. चिमण्या मी खायला दिलेल खात होत्या. शेजारी TV चालु झाला होता. मला बाबांची खुप आठवण येत होती. आणि तेव्हढ्यात कुमार झाडावरुन उडत आला आणि माझ्याजवळ गॅलरीत येउन कठड्यावर बसला. त्यानी माझ्याकडे पाहिल. त्याच्या नजरेतसुद्धा दुःख होत. आज नेहेमीसारखा तो काव काव करत नव्हता. तो कठड्यावरच माझ्याजवळ सरकला. पण परत आपली मर्यादा संभाळुनच. माझ्या नकळातच माझ्या डोळात पाणी आल. तो मुका पक्षी माझ मुक सांत्वन करत होता.

स्मशानात माझ अनेकांनी कोरड सांत्वन केल होत, त्यापेक्षा हे मुक सांत्वन माझ्या मनाला स्पर्ष करुन गेल.

Tuesday, November 1, 2011

अभिमन्यु


लहानपणी काही दिवस आजी बरोबर वृद्धाश्रमात राहाव लागल त्यात अनेक अनुभव मिळाले. त्यातलाच एक.

वृद्धाश्रमात एक शार्मा आजोबा होते. मुळचे उत्तरेतले पण अस्ख:लित मराठी बोलणारे होते. ते रोज गीता, दासबोध वगैरे विषयांवर प्रवचन करायचे आणि मला मात्र रोज रात्री झोप लागे पर्यंत गोष्ट सांगायचे. आणि बाकी आजी आजोबा पण ती गोष्ट मनापासुन एकायचे. एकदा ते मला अभीमन्युची गोष्ट सांगत होते. त्यानी चक्रव्युहात कसा प्रवेश केला आणि कौरव सैन्याची कशी दाणादाण उडवली आजोबा अगदी रंगवून सांगत होते. मी स्वतः अभीमन्यु होतो. प्लास्टीकची पट्टी हातात घेवुन फ़िरवत होतो. अनेक कौरव विरांना मी यमसदनी पाढवत होतो. पण चक्रव्यह काही तुटत नव्हता. कित्येक बाण अभिमन्युला लागले होते. घायाळ झालेला अभिमन्यु लढतच होता. कर्ण, भीष्म, द्रोण, दुर्योधन सर्व वीर (म्हणजे माझे सर्व आजोबाच, लटुपटुची लढाई करत होते) अभिमन्युवर तुटुन पडले.

तेव्हढ्यात आपटे आजोबा आले आणि म्हणाले "शर्मा ब्रीज खेळायला येतोस का?"

मी आजोबांच्या गळ्यात मीठी मारली आणि म्हणालो "आजॊबा नाहि, गोष्ट पुरी करा."

का कोणाला माहिती पण गंभीर चेहर्‍यानी प्रवचन करणारे आजोबा मला मिठी मारुन रडायला लागले आणि सर्व खोलीभर एक शांतता पसरली. आपटे आजोबा म्हणाले चालेल पण एका अटीवर तू सर्व आजी आजोबांना अशी एकदा मिठी मारायचीस. झाल हे सोप काम होत. सर्वांना मिठी मारुन मी परत पट्टी हातात घेतली आणि गोष्ट परत चालु झाली. थॊड्याच वेळात आजोबा म्हणाले "आणि अभिमन्यु मेला"

मी परत आजोबांना मिठी मारली आणि म्हणालो "आजोबा नाही त्याला जिवंत करा, अभिमन्युला नाही मारायच" सगळे हसले.

आपटे आजोबा म्हणाले "अरे थांब गोष्ट तर पुर्ण होवु दे. तो कृष्ण आहे तो येवु दे."

मग ते स्वतः कृष्ण झाले आणि दोन्ही हातात दोन पट्ट्या घेवुन लढायला लागले. कृष्णानी त्यादिवशी खुपच पराक्रम केला सर्व कौरव मरत होते. खुप आरडा-ओरड चालु होती.

ऑफ़िस मधले कर्वे आजोबा धावत आले.
"आरे आपट्या तुला काय मरायच आहे का?"

त्यांनी कृष्णाला आवरायचा प्रयत्न केला पण त्यांना तलवारीचा पाढीत एक रट्टा मिळालाच. आता सर्व कौरव धरातीर्थी पडले होते. आपटे आजोबा माझ्याजवळ आले. मघाशी लढणारे आजोबा आणि आताचे आजोबा खुप वेगळे दिसत होते. त्यांना धाप लागली होती, खुप घाम आला होता. त्यांनी मला जवळ घेतल माझा मुका घेतला आणि डोक्यावर हात ठेवुन म्हणाले "चिरंजीवी भव, यशस्वी भव" हातातल्या दोन्ही पट्ट्या त्यांनी माझ्या हातात दिल्या.

आजॊबा धडपडत जाउन बेडवर पडले. त्यांनी डोळे मिटले. धावपळ झाली. मला खोलीतुन बाहेर जायला सांगीतल. दोन्ही पट्ट्या हातात धरुन मी बाहेर गेलो. थोड्याच वेळात एक ऍब्युल्न्स आली डॉक्टर आले. पण उशीर होत होता. कोणी तरी आजोबांच्या कानाशी लागल.

लगेच मला बोलवल मी आजोबांच्या जवळ गेलो. माझ्या हातात एका संधेच्या पळित पाणी दिल गेल, कोणीतरी म्हणाल की आजोबाला गंगा पाज तुझ्या हातुन पीण्याची त्याची इछा आहे. मी पाणी पाजल. आजोबा माझ्याकडे एकटक बघत होते. थोड्यावेळानी मला कळल, डोळे माझ्याकडेच बघताहेत पण त्यातला माझा कृष्ण निघुन गेलाय.

तुमच्या महाभारतात काय आहे मला महिती नाही माझ्या महाभारतात असच आहे. महाभारत इथेच संपल आणि महाभारत असच घडल.

आजही अभिमन्युच्या बॅगेत त्या पट्ट्या तशाच आहेत. कोणतही संकट येवो, बॅगेच्या तळाशी असलेल्या पट्ट्या तो बाहेर काढतो, डोक्याला लावतो, मनोभावे नमस्कार करतो आणि नवीन उमेदीनी परत लढायला उभा राहातो.

त्याचा कृष्ण्च त्याला नवीन आयुध देतो आणि अभिमन्यु परत लढ्त राहातो. कितीही कौरव येवोत, रावण वा वाली येवो. तो कधीच थकणार नाही, कधीच हरणार नाही.

त्याला खात्री आहे हा चक्रव्युह तोडुन तो नक्कीच बाहेर पडणार आहे.