Monday, October 11, 2010

चक्रव्यूह

आयुष्यात स्थिरता येणे म्हणजे नक्की काय असते ? म्हणजे आपण सेटल झालो आहे असे एखादा माणूस कशावरून ठरवतो? समाजाने केलेल्या व्याख्येप्रमाणे सगळे झाले कि का खरच प्रत्येक माणसाच्या सेटल होण्याच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. किंवा प्रत्येकाला वाटणाऱ्या गोष्टी खूप वेगळ्या असत असतील पण कराव्या लागणाऱ्या किंवा करता येणाऱ्या गोष्टी वेगळ्या असत असतील. समाजाच्या प्रत्येक व्याख्याच्या विरुद्ध बंड पुकारणे इतके सोपे थोडीच असते. पण तरी प्रत्येक माणूस आपल्या परीने प्रयत्न करत असतो कि आपण जे काही विचार केला होता आपल्या सेटल होण्याचा त्यातले काहीतरी मिळवले तर आयुष्यभराचे समाधान लाभेल. पण त्या स्वप्नाच्या लिस्ट मधली एक गोष्ट पूर्ण करता आली तरी खूप झाले नाही का ? म्हणजे शाळेत असताना काही कल्पना होत्या कि आपण इतके मोठे झालो कि या प्रकारचा माणूस झालेलो असू किंवा असे व्हायचे आहे. पण आता मागे जाऊन या सगळ्या गोष्टींचा विचार केला कि वाटत खरच मी स्वप्न पाहिलेले मी कोणीतरी होण्याचा खरच पूर्ण झाले आहे का ? का मी कोणीतरी पूर्णतः वेगळी माणूस झाली आहे. अर्थात, ज्यावेळी कोणीतरी होण्याच्या स्वप्न पहिली होती त्यावेळी खूप साऱ्या गोष्टी माहितही नव्हत्या. पण स्वप्न पाहिण्याची स्वभाव गेलेला नाही आहे.. अजूनही मी प्रत्येकवेळी विचार करते कि अजून थोड्या वर्षांनी मी कसला माणूस असेन. मला खरच काही पडली असेल का जगात काय चालू आहे याची का मी पण असेच नॉर्मल स्वतः च्या भोवती एक फुगा करून आयुष्य जगत असेन. खरच मला सामाज्याने दिलेले आयुष्याच्या व्याख्येप्रमाणे जगायचे आहे का? त्यातून कुठले समाधान मिळणार आहे मला. माझा कोणीतरी वेगळ्या होण्याचा अट्टाहास नक्कीच नाही आहे पण तरीही काही स्वप्न आहेत माझी जी नक्कीच त्या व्याख्येत बसणारी नाही आहेत पण खरच मी ती मिळवू शकेन .. जे स्वप्नामध्ये माझे आयुष्य मी रचत आहे ते सत्यात उतरवण्याची ताकद राहील का माझ्याकडे ? जो माणूस मला व्हायचे आहे ते खरच बनण्याची माझी हिम्मत होईल का ? आता जी काही मी आहे ते मी स्वप्न पहिले होते का नाही माहित नाही मला पण अशी अवस्था परत न येण्यासाठी खरच मी ती स्वप्न मिळवेन का ? कुठल्याच गोष्टी तुम्ही कितीही प्लान केल्या तरी सत्यात येईपर्यंत ते स्वप्नच असते. आणि सत्यात येणारी प्रत्येक गोष्टी तुमच्या स्वप्नात असेल असे पण नाही.
मला ना स्वतः ला हरवून परत मिळवायचे आहे. हरवलेली मी आणि शोधणारी मी असे काहीतरी मला माझे रूप पाहिजे आहे. पण मोठे होणे तसे छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी पण आपल्या हातात राहत नाहीत नाही का ? लहानपणी आपण कितीदा आई चा हात सोडून पळालो असेन त्यावेळी ती किती सोपी आणि मजेदार गोष्ट होती पण आता कोणीही हात धरलेला नाही आहे तरी अदृश्य बंधने सोडून देणे किती अवघड होऊन जाते. अदृश्य बंधने वाटणारी हि बंधने सुरुवातीला आनंदाचा स्त्रोत वाटत असतात न हळूहळू ती आपले आयुष्य मांडणारी समीकरणे होतात कळतच नाही. अश्यावेळी खरच हरवल्यासारखे होते पण आईचा हात सोडून हरवणे नाही तर अभिमन्यूला चक्रव्यूह तून बाहेर निघणे माहित नसताना तो कसा हरवला असेल तसे काहीतरी. म्हणजे तुम्हाला माहित असते कि आपल्याला माहित नाही आहे यातून परत कसे यायचे आहे पण तरी आपण ते स्वीकारतो आणि एका क्षणी बाहेर निघणे केवळ हरवणे असते. मला असे वाटते कि सगळ्या जास्त त्रास कशाचा होत असेल तर ज्यावेळी परिस्तिथीच बरेचसे निर्णय तुमच्यासाठी घेते. मग ती असणारी मनापासून जपलेली स्वप्न कुठेतरी स्वप्नच राहून जातात. आणि एक नवीन माणूस तयार होत जातो आपलाच जे पूर्णपणे वाईट आहे असे नाही पण जे आपल्याला हवे होते ते पण नाही आहे नाही का ?